चंद्रपुरात
मागीलवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्याचे चटके आतापासून जाणवायला
लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्प चिंताजनक स्थितीत
आहेत. पाण्याची भूजल पातळी ही कमालीची खालावली आहे. अश्यातच चंद्रपूरकरांवर
आता भीषण पाणी टंचाई उद्भवते कि काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात
मागीलवर्षी ६०८.७९ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची टक्केवारी ४७ टक्के
इतकीच आहे. अत्यल्प पावसाने नदी, नाले, धरणे आता पासूनच आटणे सुरू झाले.
शहराला पाणीपुरवठा करणा-या इरई धरणातही पाण्याचा कमीच साठा आहे. टंचाईची
स्थिती बघता प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून,
त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
असे असताना देखील अद्यापही जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप
गंभीर झालेले दिसत नाही. जिल्हा परिषदेचे पाणी टंचाई आराखडा अद्याप सज्ज
झालेला नाही. नवीन विंधन विहीर व कुपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती,
विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, टँकर-बैलगाडीने
पाणी पुरवठा करणे, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी
अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावात करायच्या
असतात. मात्र या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय शासन स्तरावर झालेला
दिसत नाही.