সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 15, 2014

अशोक पवार


भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ………

अशोक पवार : एक व्यक्ती
या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी 

४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे.

२७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ...

९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. 

७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना 'पडझड' ... देशपांडे कादंबरी लेखन पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानीत करण्यात आले असून रोख पाच हजार रुपये व स्ृतीचिन्ह

१९ जाने, २०१४ - भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या ... साहित्यिक 'अशोक पवार' यांच्या 'पडझड' या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे हा पुरस्कार देण्यात आला.


चंद्रपूर - येथील कादंबरीकार अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा ललित ग्रंथ साहित्यपुरस्कार जाहीर झाला. जानेवारी २०१४ मध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
इळनमाळ - आयुष्यात स्थिरस्थावर होणे हे माणसाचे ध्येय असते. पण अशा अनेकांना स्थिर होण्यास मदत होती तो बेलदार समाज मात्र आजही भटकाच राहिला आहे. दुसऱ्यांची घरे बांधणाऱ्या समाजाच्या माणसांचे हलाखीचे जीवन

पडझड वाचण्यासाठी 
भटक्या जमातीतील वडार जमातीचा जीवनसंघर्ष, त्यांची जगण्याची पद्धत, शिक्षण घेताना पावलोपावली परिस्थितीशी करावी लागलेली तडजोड आणि शेवटी उच्चशिक्षण घेऊनही पदरी पडलेली बेरोजगारी हे त्याच्या जीवनातील वास्तव
--------------------------------------------------
...अन्‌ वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!--


Friday, November 20, 2009
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - घर बांधणे, विहिरी खोदणे, दगड फोडणे आदी कष्टाळू कामे करीत गाढवांच्या पाठीवरून भटकंती करीत पालावरचं जिणं सुरू होतं. दोन पुस्तक शिकल्यानंतर अव्यक्त भावनांना "बिराड"च्या रूपाने शब्दबद्ध करता आले. या शब्दांना महाराष्ट्राने दाद दिली. पण, खऱ्या अर्थाने "बिराड' स्थिरावले ते चंद्रपुरात. 23 जून 2003 तो दिवस आजही आठवतो. या दिवसापासूनच वेदना, तिरस्कार, दुःख, मनःस्ताप, चिरंतन भूक, अंधश्रद्धा यांचा शाप हळूहळू दूर व्हायला लागला, अशा भावना "बिराड'कार अशोक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.

गेल्या सहा वर्षांपासून येथील रहिवासी झालेल्या पवार यांना उद्या (ता. 20) दिल्ली येथे "युवा संस्कृती राष्ट्रीय पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. यानिमित्त भटकंती, पालावरचं जिणं आणि बॅंकेतील बचतगट असा प्रवास करणाऱ्या "बिराड'चा चंद्रपुरातील पहिल्या दिवसाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
23 जून 2003 चा दिवस. डोक्‍यावर उन्ह तापत होती. छातीत धकधक आणि धडधड करणाऱ्या रेल्वेने मी (अशोक पवार) चंद्रपूरला आलो. सोबत प्रकाश परांदे नावाचे मित्र होते. मळलेले कपडे आणि विखुरलेल्या केसांतून उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या. फाटक्‍या चप्पलमुळे रस्त्यावरची आग पायाला झोंबत होती. कुठेतरी रोजगार मिळेल, या आशेने वीटभट्टीवरील काम सोडून मित्र गजानन जानभोर यांच्या आग्रहाखातर इथे आलो होतो. बिराड वाचून जीवाभावाचा आणि मनापासून प्रेम करणारा मित्र भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. फोनवरून नेहमीच बोलणे असायचे. चहापाणी घेतल्यानंतर त्यांनी सहकारी पत्रकार मित्रांची ओळख करून दिली. तिथे प्रमोद काकडे आणि नंदकिशोर परसावार नावाचे दोन मित्र भेटले. त्यांनीच जेवण आणि चप्पलची सोय करून पोट आणि पायाची आग विझविण्यास मदत केली.
अमरावती जिल्ह्यात वीटभट्टीवर काम करीत असताना कधी मातीमुळे कपडे भरायचे, तर भट्टीमुळे हात भाजायचे. या आगीतून बाहेर काढण्यासाठी जानभोर यांनी चंद्रपूरला बोलाविले होते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नेऊन अध्यक्ष बाबासाहेब वासाडे यांची भेट करून दिली. काहीतरी काम द्या, या विनंतीला बाबासाहेबांनी होकार दिला आणि आता नक्कीच बिराड स्थिरावेल, अशी आशा वाटली. लागलीच बॅंकेचे उपव्यवस्थापक रमेश लखमापुरे यांनी तोंडी मुलाखत घेतली. नव्यानेच सुरू झालेल्या बचतगट योजनेमध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती झाली. महिन्याला चार हजार रुपये मानधन ठरले. त्याच दिवशीपासून काम सुरू केले. पहिल्या दिवशी बचतगट म्हणजे काय, याची माहिती देणारी पत्रके वाचून काढली. ऑफीस, कर्मचारी हा प्रकार नवीनच वाटत होता. नोकरीचा पहिला दिवस अख्खा वर्षभरासारखा वाटू लागला. खुर्चीवर बसून टेबलवर पेनने कागदावर लिहिण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सतत भटकंती आणि पालावरचं जिणं जगलेला बिराड खुर्चीवर बसल्याचे पाहून स्वत:लाच स्वप्नवत वाटत होते. चोर, बदमाश ठरलेला मी चंद्रपूरवासी झालो. अस्थिर जीवनाचा शाप घेऊन जन्मलेल्या बेलदार समाजातील माझ्यासारख्याला गाव मिळालं, घर मिळालं. दोनवेळच्या पोटाची सोयही झाली आणि आता सन्मानाने जगू लागलो आहे, असेही पवार यांनी मोठ्या आनंदाने सांगितले.

^^^^^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^^^^^^ 


मुलाखत                                                  
स्वानुभवातून बेड्यांवरील वेदना आपल्या लिखाणातूनमांडणारे प्रसिद्ध साहित्यिक ' बिराड ' कार अशोकपवार यांच्या ' पडझड ' या कादंबरीला अलीकडेच महाराष्ट्र शासनाचा ' हरी नारायण आपटे ' हा एकलाखाचा पुरस्कार मिळाला . पालावरचे आयुष्य , त्यांचा लेखनप्रवास , भविष्यातील योजनात्यानुषंगाने त्यांच्याशी साधलेला संवाद ... 

- 
लिखाणास झालेली सुरुवात ते पुरस्कारापर्यंतचा प्रवास , हा अनुभव कसा आहे ? जन्म झाला , तेव्हापासूनच भटकेपणा अनुभवतोय . बाप या गावातून त्या गावात पोटासाठी बिराडघेऊन फिरत होता . नशीब ... चुकून शाळेशी धागा जुळला . थोडंफार शिक्षण मिळालं ... पणपरिस्थितीपायी शाळाही सुटली . बिराडावर आलो नि लग्न केलं . पण आम्हा भटक्यांच्या पाठी काहीना काही समस्या चिकटल्याच असतात . माझ्याही बाबतीत तेच झालं . संसार सुरू असताना मलाक्षयरोग झाला . पत्नी यशोदाही आजारी . अशा परिस्थितीत काय करावं ... ? शेवटी मुलगाअनाथालयाला देऊन टाकला . काहीच दिवसांत यशोदाही जग सोडून गेली . उभं केलेलं बिराड एकाक्षणात खचलं . मीही पुरता खचून गेलो . जीवन नकोसं वाटू लागलं . आत्महत्येचे विचार मनातआले . रेल्वेरूळावर गेलो . काय वाटलं काय माहीत , पण परत आलो . दारूचे व्यसन जडले . चो- याही केल्या . पोलिस ठाण्यात मुक्काम झाले , मारही खाल्ला . कारागृहात असताना चुकून एककादंबरी हातात पडली . तेथूनच वाचनाचं वड निर्माण झालं . क्षितिजापलीकडचं दिसू लागलं . नवंजग कळू लागलं . स्वत्वाची जाणीव झाली . नवी उमेद पेरली गेली . कार्यकर्ता झालो . स्वतःचंचजीवन लिहावंसं वाटू लागलं . ' बिराड ' लेखणीतून उतरली नि २००१ ला प्रकाशित झाली . हालिखाणाचा प्रवास सुरूच आहे . आज ' पडझड ' ला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला . पुरस्काराबद्दलची भावना ? नवी उर्मी मिळाली . यापूर्वीही राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील ३१ पुरस्कार मिळालेले आहेत . ' पडझड' ला मिळालेल्या पुरस्कारामुळे खेड्यातल्या माणसापासून ते प्राध्यापकापर्यंत आणि आमदारापासून तेमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच अभिनंदन केलं . आजपर्यंतच्या जीवनसंघर्षाची दखल घेतली गेली , असे वाटते. पालातून ( बेडे ) सुरू झालेला आयुष्याचा प्रवास आज राज्यशासनाच्या पुरस्कारार्यंत आला , याचेनिश्चितच समाधान आहे . तरीही शोषित , पीडित माणसं हवी तशी पुढे आलेली नाहीत . ती पुढेयावीत , असं वाटतं . 

- 
सध्याच्या यशस्वी प्रवासाबद्दल समाधानी आहात का ? कलावंत वा लेखक कधीच समाधानी नसतो . तो सदैव अस्वस्थ असतो . या अस्वस्थतेतूनच तोनवनिर्मिती करीत असतो . कलावंत वा साहित्यिक समाधानी असणे म्हणजे तो त्याचा मृत्यू आहे ,असं मी मानतो . तसंही मी पुरस्कारासाठी लिहित नाही , तर माणसांसाठी लिहितो . शोषित ,मोडका माणूसच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे . नावलौकिकता , पुरस्कार माणसाला , त्याच्याविचारांना मोठे करून प्रतिष्ठा मिळवून देत असतात , एवढंच . ' बिराड ', इळनमाळ ',  दर कोसदर मुक्काम ' ही माझी पुस्तकं प्रकाशित झाली . राज्यातल्या पाच विद्यापीठांमध्ये तीअभ्यासक्रमाला आहेत . नावलौकिकतेमुळे आनंद झाला . ही नावलौकिकताच माझ्या लिखाणाचीप्रेरणा आहे . या सर्व पुस्तकांत मी माझा  भटक्या - विमुक्तांचा वास्तववादी जीवनसंघर्ष उभा केलाआहे . या भटक्यांचे जीवन सुजाण माणसांनी समजून घ्यावं , एवढीच माफक अपेक्षा आहे . 

- 
आपल्या मते साहित्याची परिभाषा काय ? वास्तवदर्शी जगण्याच्या जीवनसंघर्षातून जे साहित्य बोलीभाषेत जन्माला येतं , तेच साहित्य श्रेष्ठदर्जाचं असतं . त्याला अनुभवाची जोड असावी . अशा साहित्याला कोणतंही स्थळ , काळ आणिकौटुंबिक परिस्थितीची मर्यादा नसते . मात्र , त्यामध्ये विचारांची पारदर्शकता हवी . जे साहित्यदुःखातून निर्माण होतं , तेच वाचकांच्या मनाचा ठाव घेतं . जीवनसंघर्षातून नव्यानं जगण्याचीआंतरिक प्रेरणा मिळते . तीच साहित्यकृती यशस्वी ठरते . 

- 
पालांवरील आयुष्याची पडझड थांबली , असं वाटतं का ? थोडंफार समाधान आहे . पण , पडझड अजून थांबलेली नाही . पोलिस  शासकीय यंत्रणा आजहीया समाजाला दरोडेखोर वा बदमाश म्हणूनच पाहते . या समाजाचं भटकणं अजूनही थांबलेलं नाही .पालांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतंच आहे . आधी तालुकास्तरावर , मग जिल्हास्तरावर , नंतरराज्यसंतरावर आणि आता तर देशस्तरावर या समाजाची भटकंती सुरूच आहे . भटकंतीच्या कक्षाअधिक रुंदावल्या आहेत . शिक्षण जसं पाहिजे तसं त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही . वाढत्याजागतिकीकरणाचा , महागाईचा कमालीचा फटका या समाजाला बसतो आहे . परिस्थिती तीच आहे .शासनपुरेसं लक्ष या समाजाकडे देत नाही . हा समाज शासनाकडे आशेनं पाहतो , पण त्यांच्याअपेक्षा काही पूर्ण होत नाहीत . अनेक समाजबांधवांना तर शासनानं अद्याप आधार कार्डही दिलेलेनाहीत . 

- 
अशावेळी आपली भूमिका ? याच पालांतून अशोक पवार निघाला आहे . असे अनेक अशोक पवार निघावेत , अशी मनीषा आहे .पण , मी एकटा काय काय करणार ? माझ्या परीनं मी स्वतःला या समाजाच्या उत्थानासाठीझोकून दिलं आहे . या समाजाचं जीवन माझ्या लिखाणातून शासनासह सर्वांपर्यंत पोहोचविण्याचंमाझं कार्य सुरूच आहे . 

- 
लिखाणासाठी वेळ कसा देता ? मी चंद्रपुरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक आहे . या नोकरीमुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटला .जगण्यासाठी प्रसिद्धी नको , तर भाकर हवी . मालतीसोबत आयुष्याचं बिराड पुन्हा उभं केलं . तिचीमोलाची साथ आहे . म्हणून लिखाणाला वेळ मिळतो . नोकरीच्या कर्तव्यात कसूर  करता लिहितो. दिवस जरी कामात गेला , तरी रात्र आपली असते . त्यावेळीच मनातलं कागदावर उतरतं . 

- 
पुढच्या योजना ? बस्स , कादंब - यांतून जगण्याचा संघर्ष लोकांपुढे आणणे . आयुष्याची जितकी वर्षे शिल्लक आहेत, तीही लिखाणाला कमी पडतील . या प्रवासात खूप लोकांनी मदत केली . ती यादी इतकी लांब आहेकी जागा कमी पडेल . त्यांच्या ऋणात आहे .
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 
पालावरचं जिणं

गावखोरी पालं उतरली की सरपंच-पाटलाजवळ मुसाफिरी लिहून देयाची. एका गावात तीन दिवसांचे वर राह्यला मुभा नसायाची. कोंबडं, बकरू दिलं की कसं तरी आठ-पंधरा दिवस ब्लॅकने राहाता यायाचं. पालाला पोलिसाचं मात्र खूपच भेव. आजूबाजूला कोठेही चोरी झाली की, पोलिसांची धाड येऊन पडायाची.. यावेळी ‘वाडीवस्ती’त पालावरचे अनुभव सांगत आहेत ‘बिराड’कार अशोक पवार.

भटक्याच्या जगात लक्ष्मण बेलदाराच्या पालात माझा जन्म झाला. माझा बा दगड-मातीने लोकांची घरं बांधून देण्याचा धंदा करायचा. घरासाठी दगडं खूप फोडायचा. ही दगडं माळातून माझी माय पुतळाबाई गाढवाईच्या पाठीवर वाहून गावात कामाच्या जागी आनायाची.


आमच्या बापजाद्यांनी असी आयुष्यभर लोकांची खूप घरं बांधून दिली. लोकांची सेवा केली. स्वत: मात्र बेघरच राहिले. हे मला पडलेलं न उलगडणारं कोडं. माझा बाप तर म्हणायचा, ताजमहल, राजेरजवाडय़ांचे किल्लेसुद्धा आम्ही भटक्या लोकांनीच उभे केले. शेवटी आमच्या वाटय़ाला काय आलं? मजल-दरमजल गाढवाच्या पाठीवर ‘बिराड’ लादून पोटासाठी बोंबलत हिंडने.


काम लागलं त्या गावाला आमचं बिराड जायाचं. गावनांदरीत ‘बिराड’ उतरायचं. दोन बेळ्या रोवून आडवा बासडा बांधायचा. यावरून पाल तानायचं की झालं आमचं घर. भटके लोक एकटे बिराड घेऊन कवाच फिरत नाहीत. दोन-चार बिराडं बारहामीस सोबत राहतातच. तसं आमची दोन-चार बिराडं संगच राह्यची. त्या गावातलं काम झालं की, बिराडं निगायाची दुस-या गावाला कामाच्या शोधात.


गाढवं राखता राखता माझं बालपण जाऊ लागलं. रपाड रानात आम्ही पोरं-पोरी ‘डाबडुब’ लपना-छपनी, नवरा-बायकोचा खेळ खेळायचो. कवा कवा चोर-पोलिसांचाखेळ खेळायचो. मी एकटाच चोर नि समदी पोलिस होऊन कवा-कवा माझ्या मागे लागायाचे. मी कवाच सापडायचो नाही. कवा कवा पालावरची बुजुर्ग मंडळीही आमचा चोर-पोलिसांचा खेळ बघायाची. चोर असावा तर मह्यावानी म्हणायाची. मला नवाजायाची.
आश्राया देवीचा नावकरी म्हणून मी जलमल्यावर देवाला नवस केलेला. माझं नाव ‘आश्रुबा’ मायबापान आवडीने ठेवलेलं. ही पालं आन् ही बिराडं. एवढीच आपली दुनिया हाय. याच्या पलीकडे जगच न्हाय, असं मला वाटायाचं. मी आपल्याच दुनियेत मश्गुल होतो.
मालेगाव, ता. जिंतुर, जि. परभणी नावाचं एक छोटं गाव. त्या गावात बाबानं विहीर बांधायाचं काम घेतलं होतं. गावखोरी आमचं ‘बिराड’ उतरलं तवा मी तेरा-चौदा वर्साचा असन. खुशाल गाढवं राखायाचो. जवळच शाळा होती. चौथीपर्यंत असेल. शाळेत एक मास्तर व मास्तरीन होते. ते जेवायला विहिरीवर यायाचे. दुपारचं जेवायला विहिरीवर आल्यावर मी त्यांच्या आवती-भवती हिंडायाचो. ते कोर फुटका देयाचे. त्यांच्या भाकरीला चव वाटायाची. आपली बेचव जिंदगी घेऊन रोजच दुपारी ते जेवायला आल्यावर त्यांच्या भौती मी कोर फुटक्यासाठी घुटमळायाचो.
एक दिवस मास्तर आन् मास्तरीनच्या मनात काय आलं की, ते सकाळी - सकाळी डायरेक्ट पालावर आले. बाबानं बसायला गोधडी टाकली. मायनं तीन दगडांच्या चुलीवर चहा बनवला. त्याहीनं घोट घोट चहा घेतला. पालावर पहिल्यांदा चहा पेणारे मास्तर आन् मास्तरीन हे पहिलेच लोक मी बघितले. त्याहीनं आईला समजून सांगितलं. आश्रुबाला शाळेत पाठवा म्हणाले.
दुस-या दिवशी लाजत लाजत मी शाळेत गेलो. शाळेत सगळय़ात मोठा मी पहिलीत बसलो. समदी मुलं-मुली मला हसत होती. पहिल्या दिवशी काहीच समजलं नाही; पण मास्तरानं सांगितल होतं शिकून सायब होशील.
मग मी आभ्यास करू लागलो. अबकडपासून उजळनी व पुस्तकतेनं वाचता येऊ लागलं. मास्तर, मास्तरीन नवाजत होते.
मग मास्तरांनी सहाच महिन्यांत सर्व नियम धाब्यावर बसवून माझं नाव एकदम चौथीत टाकलं. त्यांच्या या नियम मोडण्याच्या शौर्यामुळेच मी आश्रुबा पवारचा अशोक पवार झालो. नसता या पालवाल्याच्या जगात आनखीन एक पालं मांडून आयुष्यभर नरकयातना भोगत बसलो असतो.


पालात कशाचा आला लाइट? उजेडासाठी रॉकेलची चिमनी लावायचो. रात्री त्याच चिमनीवर आभ्यास करायाचो. वा-यानं विझू नये म्हणून भगोन्यात ठेवायाचो. जिकडून वारा आला त्याच्या विरुद्ध दिशेने भगुन्याचं तोंड करायाचो. जिवापाड आभ्यास करायाचो. अशातच चौथीची परीक्षा आली. बोर्डाची परीक्षा दिली. त्या गावातलं काम संपलं. बिराड दुस-या गावाला आलं. बाबानं गावनांदरीत पाल उभा केला. माझं मन लागायचं नाही. झाडावर आश्रुबा पवार असं नाव दगडाच्या चिपीन काढायाचो. मोठ्या दगडावर दगडानं नाव कोरायाचो. गाढवं वळायचो. काम नसलं की गावात हिंडायाचो. फाटका-फुटका कागद पडलेला दिसला की, उचलायाचो. जीव लावून वाचायाचो. हॉटेलची, दुकानाची नेम बोर्ड वाचायाचो.


पावसाळा सुरू झाला. शाळा सुरू झाल्या. मास्तराचे शब्द आठवले. शिकून सायब होयाचं. मला शाळेत धाड म्हणून मग बापाच्या मागे तगादा लावला. बाप शाळा शिकू नको म्हनायाचा. गाढवं वळ. हाताखाली काम कर म्हनायचा. मी मात्र शाळेत जायाचा घोशाच धरला. मायनं बापाला समजून सांगितलं. आन मी शाळेत जायाला तयार झालो. बाबाबी मला शाळेत पाठवायला राजी झाला. मास्तरानं समजावून सांगितलं. मग मी वसतिगृहात दाखल होऊन शिकू लागलो. शाळा आडगाव, ता. जिंतुर, जि. परभणी येथे.

उन्हाळ्याच्या आन् दिवाळीच्या सुट्टय़ांत मायबापाचा पाल हुडकत मी बिराडावर जायाचो. राह्याचो. मर मर राबूनही हाता-तोंडाची गाठ पडायची नाही. कवा-कवा कामच लागायचं नाही. माझे भाऊ आन् बहिणी आईसंग गावात भीक मागायला जायाचे. थंड पाण्यावर कवा कवा आलेला दिवस पुढे ढकलायाचे. माझ्या मायबापाच्या हाडाचे सापळे बघून जीव तीळ-तीळ तुटायाचा; पण माझ्या हातात काहीच नव्हतं. मी काय करणार, गुपचिप सहन करणं एवढंच माझ्या हातात होतं. या उपाशी राहण्यापेक्षा, भीक मागण्यापेक्षा शाळा बरी वाटायची. निदान वसतिगृहात भाकर तरी मिळते. पुन्हा मी शाळेत यायचो. नव्या जोमानं अभ्यास करायाचो.वीस-पंचवीस खेडय़ांतली मुलं-मुली आडगावच्या शाळेत यायाची. परिचय विचारताना मास्तर नाव-गाव विचारायचे. माझं तर विंचवाचं बिराड पाठीवर. मी कोनतं गाव सांगणार? मी भटक्या जमातीचा आहे. मला गाव नाही. असं सांगायची ताकद त्या वेळेस माझ्यात नव्हती. प्रत्येकाला घर आहे, गाव आहे. आपल्यालाही गाव असावं, घर असावं. खूप भारी नको, पण झोपडी तरी असावी. आपल्या मायबापांनी स्थायिक राहावं, असं मला मनोमन वाटायचं. पण भारतीय समाज व्यवस्थेने व शासनाने भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पाठीवर लादलेलं अथांग वेदनांचं ओझं म्हणजे बिराड सुटायालाच तयार नाही. मग आपल्याला वाटून उपयोग काय असणार?
पालं म्हणजे आमचं घर. पाल नवा घेतला की दोनेकर्वष टिकायाचा. ऊन, वारा, पाऊस आन् थंडीपासून तो आमचं संरक्षण करायाचा. मला नेहमी या पालाचं आकर्षण वाटायाचं. एक डाव बाबा जवळ पैसा जमला नाही. जुनाच पाल थेगळी लावून, शिवून तेनं उभा केला. पावसाळय़ाचे दिवस होते. पाण्याचा फवारा लागू लागला. पाल जागोजाग गळू लागला. गळते त्या जागी ताट, तांब्या, वाटी तेन आम्ही ठेवायचो. पाऊस आला की आम्ही सहा बहीण भावंडं, आजोबा, बाबा, माय तेन आडवे-तिडवे निजुन रात काढायाचो. याचा पाय त्याच्या पायात जायाचा. त्याचा पाय याच्या पायात यायाचा. दिवसभर गोधडे पांघरून खुंड मुंड होऊन बसायाचो. उन्हाळ्याच्या दिवसात भीक मागून, आनलेलं अनाज उरायाचं. ते वाळू घालून थैल्या भरून ठेवायाचो. ते या दिवसात काढायाचो. खलबत्त्यात कुटून खायाचो.


एक दिवस आमची ‘बिराड’ केळी गावच्या नांदरीत होती. सुसाट वारा व झुंईझप पाऊस सुरू झाला. पालं टराटर फाटून गेली. गुडघ्याइतकं पाणी बिराडावरून वाहू लागलं. आम्ही जीव वाचवून माता माईच्या देवळात आलो. पाऊस जावस्तोर दोन दिवस तिथं थांबलो. पाऊस गेला. वारा थांबला. धावत वापस आलो. पालाच्या चिंधडय़ा झालेल्या. आमचा तवा नवाच पाल होता. बाबा धडधडा रडायला लागला. माय दोन दिवस जेवली नाही. तसेच आम्ही वाहून गेलेले भांडे गोळा केले. आर्धे निम्मेच सापडले होते. पुन्हा नव्यानं काम करून बाबानं पाल घेतला. संसार उभा केला.


गावखोरी पालं उतरली की सरपंच-पाटलाजवळ मुसाफिरी लिहून देयाची. एका गावात तीन दिवसांचे वर राह्यला मुभा नसायाची. कोंबडं, बकरू दिलं की कसं तरी आठ-पंधरा दिवस ब्लॅकने राहाता यायाचं. पालाला पोलिसाचं मात्र खूपच भेव. आजूबाजूला कोठेही चोरी झाली की, पोलिसांची धाड येऊन पडायाची. लेकराबाळांसकट समद्याला बदडायाचे. गाडीत टाकून पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायाचे. न केलेल्या गुन्ह्यांत आडकवायाचे.


तसं पोलिस शाळेत यायचे. मला उचलून घेऊन जायाचे. फलान्या बिस्तान्याचं बिराड दाखव म्हणायाचे. खायाला चॉकलेट देयाचे. सातवी-आठवीपासूनच मी पोलिसाचा दोस्त झालातो. एक डाव माझ्या बापाचा पत्ता त्याहीनं विचारला. मध्यरात्री मी दाखवला. जेवारीचे कणसं चोरल्याचा गुन्हा बाबावर होता. चांदण्या राती पोलिस माझ्या बाबाला एवढं मारू लागले. मव्हा बाप कुत-यावानी आरडत होता. माझं काळीज जळून खाक झालं. मी जाऊन बाबाच्या आंगावर पाडलो. मलाभी खूप ठोकलं. पाठ फोडून काढली. शाळेतभी समदी पोरं मला चोर चोर म्हणून चिडवायाची. पुढं मी पोलिसानी नेलं की जायाचो. पण पाल दाखवायाचो नाही. इकडं-तिकडं फिरवत राह्याचो. पोलिसांची दिशाभूल करायचो. पोलिस मारायाचे. येथून माझ्या मार खाण्याला प्रारंभ झाला. आज माझ्या पाठीत गाठी आहेत. काही ऑप्रेशन करून माझ्या डॉक्टर मित्रांनी काढल्या.


कसा तरी दहावी पास झालो. डीएडला नंबर लागला. अर्धवट डीएड सुटलं. लग्न केलं. बिराडवाल्याच्या जगात पाल मांडला. करू लागलो रोज मजुरी. न संपणारी जिवनाची ससेहोलपट स्वीकारून. भुरट्या चो-या करायला जायाचो. सोबत्यासंग बंब देशी दारू पेयाचो. इकडं लोक चोर समाजायाचे. आम्हाला घर बांधायाचे काम लोक देईना. उपासी मरायाची पाळी आली. घेतलं डोक्यावर बिराड. बसलो रेल्वेत. आलो मुंबईला. ठाणे जिल्ह्यातील वाड्याजवळ कुडुसला रोडाचं काम चालू होतं. आम्ही रोडवर डांबर टाकायाचं काम करू लागलो. पैसा मिळायाचा. पण दोन दिवस काम चालायाचं. चार दिवस बंद राह्याचं. पुढची-मागची बरोबरी होयाची. हातात एक पैसा टिकायाचा नाही. रोडच्या काठाला आमची पालं होती. बाकीच्यांची लहान लहान मुलं बाळं घर राखायला राह्याची. आमचं कोणीच नव्हतं. दिवसभर काम करून संध्याकाळी पालावर गेला की, पालाचा धिंगाना होयाचा. कुतरे-डुकरं समदा पसारा अस्तव्यस्त करायाचे. काय करावं काही सुधारायाचं नाही.


एक दिवस खूप वादळ-वारा, पाऊस सुरू झाला. पालं उडून गेली. आम्हाला जीव वाचवनं आवघड झालं. जो तो आपला जीव घेऊन आस-याच्या शोधात पळाला. मी व ती एका टोलेजंग बंद दार असलेल्या भितीच्या आडोशाला येऊन उभं राहिलो. त्या दिवशी माझ्या डोक्यात विचार आला की, ही माणसं टोलजंग इमारतीत राहतात. लोकांना घरदार आहेत. आपल्याला घरदार का नाही. पाऊस संपला. पुन्हा नवी पाल उभी केली.

मग हळूहळू पुस्तकाकडे वळलो. दारू दूर झाली. पुस्तकं आयुष्यात आली. वाचन सुरू झालं. पुन्हा मुंबई सोडून मराठवाड्यात आलो. आडगावच्या गावखोरी जागा धरली. रोज मजुरी करून जगू लागलो. त्याचबरोबर भटक्या विमुक्तांसाठी काम करू लागलो. आम्ही स्थायिक होण्यासाठी पाच-सात झोपड्या उभ्या केल्या.
एक दिवस तेथे सरकारी दवाखान्याची इमारत उभी करायाची म्हणून गावगुंडांनी आमच्या झोपड्या तोडल्या. आमचं घरटं आमच्या डोळ्यादेखत विस्कटलं. खूप प्रयत्न करूनही झोपडी वाचविता आली नाही. आयुष्यात एक झोपडी या स्वतंत्र देशाच्या मातीत उभी करू शकलो नाही, याचं शल्य कायम मनात आहे. आता तुम्हाला मी माझं कोनता गाव सांगू. प्रत्येक गाव मला माझंच गाव वाटतं. ‘बिराड’ नावाचं आत्मकथन मी पालातच लिहिलं.


पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तवा मी वर्तमानपत्रवाल्यांकडे बातम्या देयाला गेलो नाही. लोकनाथ यशवंत यांना पुस्तक पाठविलं होतं. ज्याच्या कविता मला आवडायाच्या ते लोकनाथ यशवंत, सुनील यावलीकर बिराडावर येऊन गेले. मी, किशोर काळेनी, प्रा. विलास पाटील यांनी पालावर रात्री काढल्या. बंब मासे शिजवून खाल्ले. आता माझे खूप मित्र आहेत. ना. विजयभाऊ बोट्टीवार माझ्या घरी येत राहतात. चर्चेत आम्ही जिवनाचा खूप आनंद घेतो.


‘बिराड’नंतर माझी ‘इळनमाळ’ कादंबरी प्रकाशित झाली. ‘बिराड’ व ‘इळनमाळ’ कादंबरीच्या लेखनासाठी राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’चा ‘संस्कृती’ पुरस्कार मला मिळाला. नुकतीच पारध्यांच्या व्यथा-वेदना मांडणारी ‘दरकोस दर मुक्काम’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या लेखनामुळे भालचंद्र नेमाडेंपर्यंत समद्यांशी माझी मैत्री आहे. आता मी छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतो. दोन वेळेची भाकर मिळते; पण खूप काही राहून गेलं, असं वाटतं. अस्वस्थ होतो. हातात लेखनी घेतो नि लिहत राहतो.


मी बालपणापासून वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत मराठवाड्याच्या मातीत राहिलो. खूप दु:खाच्या अनेक घटना याच मातीत घडल्या तरी मला या मातीबद्दल आकर्षण वाटतं. मी मागे प्रा. विलास पाटलांना भेटायला गेलो होतो. तिथल्या एका गावात पूर्वी आमचं बिराड होतं. तेथे आता वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली दोन दिवस बसलो. ज्या मातीत लोळलो, ती माती कपाळाला लावून घेतली. मनसोक्त रडलो. उठलो आन् पाटलांचा निरोप घेऊन प्रवासाला सुरुवात केली. पुस्तक वाचल्यावर समजेलच भटक्यांच्या जीवनात पालाला किती महत्त्व आहे ते!

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

‘पडझड’चे वेगळेपण..

पालावरील भटक्या विमुक्तांच्या वेदना स्वानुभवातून लिखाणात जिवंत करणारे साहित्यिक ‘अशोक पवार’ यांच्या ‘पडझड’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे हा पुरस्कार देण्यात आला. या कादंबरीचे मर्म उलगडणारा लेख..

भटक्या जमातीतील वडार जमातीचा जीवनसंघर्ष, त्यांची जगण्याची पद्धत, शिक्षण घेताना पावलोपावली परिस्थितीशी करावी लागलेली तडजोड आणि शेवटी उच्चशिक्षण घेऊनही पदरी पडलेली बेरोजगारी हे त्याच्या जीवनातील वास्तव मांडणारी ‘पडझड’ ही कादंबरी मानवी मनाला सुन्न करणारी आहे. ज्या व्यवस्थेत स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते, त्या वडार समाजातील स्त्रीच्या देहाच्या कशा चिंधडया उडतात, याचे रेखाटन वाचकाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच मानवी जीवनातील वास्तविकता मांडणारा कांदबरीकार म्हणून अशोक पवारांची नोंद घेणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षानंतर शोषणाधिष्ठित विचारसरणीमध्ये एका नव्या पद्धतीने जगण्यामध्ये परिवर्तन आले असले तरी तळाखाली जगणा-या भटक्यांचे विचारविश्व मात्र फारसे बदलले नाही. त्यांना या लोकशाहीत मतदानाचा अधिकार आहे; परंतु मतदान करण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र मिळणे कठीण! राजकारणी लोकांनी भटक्यांच्या जगण्यावर अत्याचाराचे सूडयंत्र चालविल्यामुळे त्यांना सन्मानाने जगण्यासाठी ठिकठिकाणी अडचणी येतात. एखाद्या वेळी या भटक्यांनी एकत्रित येऊन बिराडे स्थायिक करण्याचा प्रयत्न केला, तरी गावगुंडांकडून पोलिसांच्या मदतीने त्यांना मरेस्तोवर बदडले जाते, हा लोकशाहीने त्यांच्या वाटयाला घातलेला न्याय आहे. म्हणूनच लोकशाहीधिष्ठित मूल्ये जपणारी आजची पिढी या भटक्यांकडे चोर, दरोडेखोर, बदमाश म्हणून बघण्यात स्वत:ला गौरवास्पद मानते. गावाच्या हागणदारीमध्ये त्यांची पालं उभी होणं, हेच मुळात असांस्कृतिक कृत्य मानणारी ही व्यवस्था आहे.

मुकादमाच्या हाताखाली मजूर म्हणून काम करताना मुकादमानेच पळ काढला तर जोपर्यंत त्याला दिलेले पैसे फिटणार नाहीत, तोपर्यंत ठेकेदार पहारेकरी लावून या वडारांकडून कैद्यांसारखे काम करवून घेणार, हा तिथला कायदा. सारेच वडार एकमेकांच्या दु:खात सहभागी होत असले, तरी खाणारी तोंडे अधिक असल्याने सारेच अर्धपोटी. हाताला काम नसले की, मुलांनी गावातून मागून आणलेल्या भिकेवर कसेबसे पोट भरायचे. या कादंबरीमध्ये येणारा वडार समाजातला तुक्या हा मुलगा उच्चशिक्षण घेऊन नाम्यासारखे साहेब होण्याची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी कष्ट करतो. अनेकदा परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ त्याच्यावर परभणीला वसतिगृहात असताना येते. बरेचदा गोब-याने दिलेली वागणूक आणि मानहाणीचे शब्दही तो पचवतो; कारण त्याला आयुष्य घडवायचे असते; परंतु त्याच्या निर्धाराला, स्वप्नाला शेवटी या लोकशाहीत तडा जाऊन बेकारीच्या रूपाने निराशा पदरी पडते. वडार समाजाची स्वप्नं उधळून लावणारे भीषण वास्तव तुक्याच्या पदरी पडते.
आपण शाळेत शिकत आहोत म्हणजे आपल्या समाजातील इतर अशिक्षित बांधवांपेक्षा वेगळेच काहीतरी रसायन आहोत, ही भावना तुक्याला वेळोवेळी जाणवते. त्यामुळेच गावात एखाद्या प्रसंगी जेवणाच्या पंगती बसल्या की, बांधवांसोबत तो कटोरा हातात घेऊन पत्रावळीतील अन्नाचे कण जमा करण्याच्या वाटेला जात नाही, तर गावक-यांच्या पंगतीत ‘वडार’पण लपवून बसतो; पण ही चोरीसुद्धा एकदा पकडली जाते. गावकरी बेदम मारहाण करतात, तेव्हा तुक्या यापुढे अशी चूक करणार नसल्याचे आई व गावक-यांना वचनही देतो. आपण कुठे चुकलो, गावक-यांच्या पंगतीत बसलो म्हणून की, भटक्या वडारात जन्माला आलो म्हणून, याचे उत्तर इथल्या परंपरेच्या शब्दकोशातही नाही.

आपण उच्चशिशित होऊन नोकरीला लागलो की, समाजाचाही उद्धार करू, अशी तुक्याची आंतरिक तळमळ आहे. आपला समाज स्थिरावला जाऊन परिवर्तनाच्या वाटेत सामील झाला पाहिजे, यासाठी तो लोकांना संघटितही करतो; परंतु सत्ताधा-यांच्या कटकारस्थानापुढे तो एकाकी पडतो. पदरचा पैसा खर्च करूनही कार्यक्रम यशस्वी करणे भटक्यांना किती कठीण जाऊ शकते, याचा प्रत्यय त्याला येतो. मात्र जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी डुकराच्या कपाळावर घण घालून त्याला जिवंत जाळले जाते, त्या वेळी तुक्याचे मन हवालदिल होते. डुकराचे ओरडणे, जीवासाठी त्याची चाललेली धडपड, फडफड शाळेत जाऊन सुशिक्षित झालेल्या तुक्याला बघवत नाही.

त्याला जिवंत पेटवताना जणू काही आपणच त्या जाळात सर्वागाने जळून तडफडत आहोत, असे वाटते. सामान्यातही असामान्य होण्यासाठी त्याची रात्रंदिवस धडपड चाललेली दिसते. वडार जमातीतील माणसांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, त्यांच्या जगण्याची इथल्या लोकशाहीत हेळसांड होऊ नये, तर डोक्यावरील वेदनांच्या गाठोडयाचा भार कुठे तरी हलका व्हावा, ही अपेक्षा पवारांची तुक्या या पात्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळेच माणूस म्हणून जन्माला आलेल्या जिवंत माणसांनी इथल्या सांस्कृतिक मूल्यांनी जी चिरफाड केली, ती मूल्ये माणुसकीच्या माळेत गुंफली जावीत, हा आशावाद तुक्याला मोलाचा वाटतो; कारण शिक्षणाने परिस्थितीत सुधारणा केल्या जाऊ शकतात यावर त्याचा विश्वास आहे. म्हणूनच तो सकारात्मक विचार ऊरी बाळगून परिस्थितीशी दोन हात करीत जगण्यात धन्यता मानतो.

‘आपण कितीही शाळा शिकलो तरी वाण्याबामणाचे थोडेच होणार?’ हा प्रश्न आजही सामान्य माणसाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे. हा प्रश्न केवळ तुक्याच्या आईच्या तोंडीच नाही, तर परंपरेने वाटयाला घातलेल्या परिस्थितीतही सन्मानाने जगू पाहणा-यांना भेडसावणारा आहे. भटक्या जमातीतील लोकांच्या जगण्याची पडझड अजूनही संपलेली नाही. काळ बदलत चलला हे सत्य असले, तरी त्यांची बिराडं आजही गावकुसाबाहेरच आहेत.

हाताला रोजंदारीच्या रूपाने काम मिळाले की शरीर दमेपर्यंत घाम गाळून कष्ट उपसायचे आणि आलेला पैसा सा-यांनी मिळून खाण्यापिण्यामध्ये घालवायचा, ही वडाराची जगण्याची रीत. उद्याची चिंता न करता वास्तव परिस्थितीशी सामना करीत पोटासाठी वणवण भटकणे त्यांच्या पाचवीला पूजलेले, अशा भटक्या समाजात जन्म घेऊन स्वअस्तित्वाचा शोध घेण्यासाठी तुका पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखा तडफडतो; परंतु ही त्याची तडफड कुणाच्याच नजरेत भरत नाही. स्वार्थाध राजकारणीसुद्धा तुक्याने भटक्यांच्या पालावर घेतलेल्या मेळाव्याचा स्वत:साठी उपयोग करून घेतला. किमान या मेळाव्याच्या रूपाने आपल्या बांधवांकडे शासनाचे लक्ष वेधलं जाईल, ही त्याची अपेक्षा असते; परंतु वर्तमानपत्राचे वार्ताहरसुद्धा या मेळाव्याची दखल घेत नाहीत. तुक्याने बाळगलेला विचार राजकारण्यांना असमंजपणाचा वाटल्यामुळे फक्त त्यांचेच फोटो आणि भाषणे वर्तमानपत्रात झळकतात. मेळाव्याचा कुठेही नामशेष नसतो. सामान्य माणूस या समाजव्यवस्थेत टिकू शकत नाही, याची खात्री होताच तो वडारांना सोडून कुटुंबासह शहराचा रस्ता धरतो. शिक्षण पाहून कुणीही आपल्याला शोभेलशी नोकरी देईल, अशी त्याची अपेक्षा असते; परंतु इथेही त्याला भ्रमनिरास होतो. ‘‘आम्ही हे करू, आम्ही ते करू’’ असे परिवर्तनाचा विचार भाषणातून शिरजोरपणे मांडणारे आमदार-खासदारच कृतीतून मात्र गरिबांचे शोषण करण्यास कुठलीही कसर सोडत नाहीत, याचा प्रत्यय पवार शेवटी वाचकांना आणून देतात. ज्या संसदेत मानवाच्या, समाजाच्या, देशाच्या विकासाचे ठराव पारित होतात, त्या संसदेतील भ्रष्टाचाराने देश कसा पोखरला गेला आहे, याची जाणीव शिक्षण घेऊनही बेरोजगार ठरलेल्या तुक्याला होते.

एकंदरीत संवेदशनील भाषेतून वडारांच्या दैनंदिन जगण्यातील संघर्षाचे जे चित्रण अशोक पवारांनी ‘पडझड’च्या रूपाने तुकासारख्या नायकाच्या व्यक्तिमत्त्वातून चितारले आहे. असे कित्येक तुका समाजात वावरताना पावलोपावली भेटतात; परंतु कुणीच त्याची दखल घेत नाही, ही खरी खंत आहे. आयुष्याचे गाठोडे उराखांद्यावर घेऊन जगणारा भटका समाज हा आजही आपल्या मूलभूत गरजांची परिपूर्णता करण्यास असमर्थ ठरताना दिसतो. एकीकडे शेतक-याचा देश म्हणवून घेताना रस्त्यांच्या कडेला अर्धपोटी झोपणा-या माणसांना पाहिले की, आमची मान लाजेने खाली जाते. माणसानेच जर माणसा-माणसामध्ये एवढे भेदभाव करून ठेवले असेल, तर आम्ही आज कोणत्या महासत्ताक देशाची कल्पना करत आहोत, याचाही कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. आजवर अनेक कादंब-यांमधून कादंबरीकारांनी वेगवेगळया समस्यांना हात घालून मानवी जीवनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु पवारांनी मात्र भटक्या बेलदार, पारधी, वडाराच्या जीवनाचा आक्रोश मांडून जे मानवी जगणे आविष्कृत केले ते ख-या अर्थाने जीवनवादी, दखलपत्र आहे, ही बाब नाकारता येण्यासारखी नाही.
वास्तवदर्शी जगण्याशी सांधेजोड करून भटक्यांच्या ख-या जगण्यावर प्रामाणिकपणे बोट ठेवणारी एक कादंबरी म्हणून अशोक पवारांच्या ‘पडझड’चा विचार करावा लागतो; कारण यामध्ये मांडलेला विषय हा केवळ कलावाद्यांचे मनोरंजन करणारा नसून वडारांच्या जीवनातील भीषण सत्याशी जवळीक साधणारा आहे. ज्यांच्याकडे आम्ही स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेताना कुचेष्टेने पाहतो तेच भटके खऱ्या अर्थाने साहित्याचा, मानवी जगण्याचा विषय होऊ शकतात, हे नवं समीकरण पवारांनी ‘पडझड’सारख्या कादंबरीच्या माध्यमातून सिद्ध केल्याचे जाणवते. भटक्यांच्या जगण्याला इथल्या व्यवस्थेने टाळण्याचा विषय न बनवता कवटाळण्याचा विषय करावा, ही आत्मकेंद्री जाणीव या कादंबरीतून प्रत्येकाला येते.- प्रा. डॉ. शुभांगी पाटील
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 

दु:खितांच्या हाती दिली मशाल..

भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या वेदना आपल्या कादंब-यांतून मांडल्या. या समाजाचं दु:ख कवितेतून मांडणा-या ढसाळ यांना त्यांनी केलेला सलाम-

१९९५ मध्ये परभणीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. तिथे मी आणि माझे मित्र गंडले गेलो होतो. संमेलनात पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळता चाळता, बघता बघता ढसाळ यांचं ‘गोलपिठा’ हाती लागलं. तीन दिवस साहित्य संमेलनात राहून घरी गेलो ‘गोलपिठा’चं पान उघडलं. पहिल्या ओळीपासून सुरुवात केली अधाशासारखं ‘गोलपिठा’ वाचलं. ‘गोलपिठा’ने फार अस्वस्थ केलं. हादरून गेलो. जगात आपल्यासारखे अनेक लोक जगतात. आपण कुठल्या युगात जगतोय, असे न सुचणारे प्रश्न मला ‘गोलपिठा’वाचून व आपलं आयुष्य भोगून पडलेले. नंतरच्या काळात जवळजवळ मी त्यांची पुस्तकं वाचली. १९९७ मध्ये मुंबईत एका कार्यक्रमात ढसाळांची भेट झाली. बोललो काहीच नाही. पुढे नागपूरलाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. तेथे ढसाळ यांची मुलाखत बघितली. मुलाखतकार सतीश काळसेकर होते. कादंबरीमध्ये अरुण साधू व भालचंद्र नेमाडे मला आवडतात. नागनाथ कोतापल्ले ही माझे आवडते लेखक आहेत, तर कविता मला नारायण सुर्वे व नामदेव ढसाळांचीच आवडली. सुर्वेच्या व ढसाळांच्या कवितांचा बाज कोणीच तोडलेला मला आठवत नाही व तसं माझ्या वाचण्यात आलं नाही, नामदेव ढसाळांनी शोषित, पीडित, दलित, मोडलेल्या माणसांचं जगणं आपल्या साहित्यात मांडलं.
ढसाळ यांचं लेखन सर्वहारा परिवर्तनाचे विचार पावलोपावली ठेवत जगण्याचं आत्मभान देतं. हे आत्मभान समाजपरिवर्तन, मानवी जीवनातील परिवर्तन आणि वैचारिकतेशी निरगाठ बांधणारं आहे, त्यामुळे त्यांचं लेखन दलित साहित्य प्रवाहातील एक बहुआयामी आणि मैलाचा दगड ठरतो. लेखनासाठी शासनाने त्यांना अनेक वेळा पुरस्कृत केलं तर साहित्य अकादमीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केलं. भारत सरकारने त्यांना साहित्यासाठी पद्मश्री दिलं. सोव्हिएत लँड नेहरू हा पुरस्कारही त्यांना प्राप्त आहे. नकार विद्रोह व माणूसपणाची बिजं त्यांच्या साहित्यात ठासून भरलेली होती. मानवमुक्तीच्या लढय़ासाठी अमेरिकेत ब्लॅक पँथरची निर्मिती करण्यात आली. दलित पँथरच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ढसाळ ‘दलित पँथर’शी अखेपर्यंत एकनिष्ठ राहिले. जातीयवादाच्या विषवल्लीत भारतात माणसाला काहीच किंमत नाही, राजकारणाच्या मैदानात हा कलावंत निवडून आला असता किंवा त्याने संधी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. त्यांची पुस्तकं जगभरात शिकविली जातात. वाचली जातात, त्या माणसाला राजकारण्यात फेल केलं जातं. पुढे येऊ दिलं जात नाही. विचारवंत, दृष्टी असणारा माणूस राजकारणात यशस्वी होणार नाही, तोपर्यंत समूळ परिवर्तन कसं शक्य आहे, असं मला वाटल्यावाचून राहत नाही व त्यात सत्यताही आहे.
शोषितांच्या वास्तव जीवनाची जाणीव नामदेव ढसाळांनी भौतिकवादी आशयाच्या अंगाने आविष्कृत केली आहे. वीतभर पोटाला भरण्यासाठी जीवनभर जी कष्टप्रद संघर्षाची पायवाट चालावी लागते, त्याच जीवनानुभवाची जाणीव नामदेव ढसाळ यांनी मांडलेली दिसते, त्यामुळे कधी अर्धपोटी, तर कधी उपासमार करत जगणा-या शोषित लोकांचं चित्र त्यांनी प्रभावीपणे आपल्या लेखनात चित्रित केलं आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हा मानवाचा मूलभूत अधिकार असला तरी विषमतावादी समाजव्यवस्थेने तो त्यांच्या वाटय़ाला घातलेला नाही. साहित्यात नामदेव ढसाळांनी त्याच्या विरोधात हाक दिली. आयुष्याने नेहमी अस्वस्थ ठेवलेल्या ढसाळ यांची या व्यवस्थेने नेहमी फसगत केली आहे. ती त्यांची एकटय़ाची फसगत नाही, तर पिढय़ान् पिढय़ा शोषणाच्या गर्तेत खितपत पडलेल्या जातीपातीच्या उतरंडीत त्याची बीजे पेरली गेलेली होती आणि आहेत यात दुमत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून त्यांचा लेखनप्रवास सुरू होता. बुद्धाने सांगितले, जे निर्माण झाले ते नष्ट होणार आहे. सर्वानाच एकना एक दिवस मृत्यू आहे. पण नामदेव ढसाळांना आयुष्य कमी मिळाले. अवघ्या ६४व्या वर्षी ते गेले. त्यांच्या जाण्याने दलितच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याची फार मोठी हानी झाली. ती आता कधीही भरून निघणार नाही एवढे मात्र खरे. साहित्यात परंपरागत साहित्याच्या विरोधात बंड करणा-या कवींच्या जाण्याने माझ्यासह अनेकांच्या मनाला चटका लागलेला आहे. बंड करूनच ते शिवसेनेकडे वळले, तेव्हा अनेक जण हादरले होते.
सामाजिक विषमतेच्या मुळावरच घाव घालून मानवी समतेचा जीवनाशय फुलवण्यावर ढसाळ यांची नजर होती. आत्मपिडेचे वेदनामयी गाणे अधोरेखित करताना सामाजिक स्तरावरील विषमतेकडे ते दुर्लक्ष कधीच करत नसत. तो त्यांच्या लेखनाचा गाभा होता. जातीजातीत, वाटलेल्या वाडय़ांत, वस्त्यांत, झोपडपट्टय़ांत विभाजित झालेल्या शोषित समाजाचा ढसाळ एक घटक होते. त्या दलित, पीडित जीवनातूनचत्यांचे जीवन आकाराला आलेले आहे. जातीपातीच्या वणव्यात पिचत चाललेला आर्थिक कुचंबणेने गुदमरलेला, जीवनावश्यक गोष्टींच्या किमान पूर्तीला महागलेला व्यथित, शोषित, पीडित ढसाळांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी होता, हे विशेष आहे. त्यांचे लेखन नेहमी शोषितांच्या बाजूनेच राहिले, त्यापासून तसूभरही ढळले नाही.
माणूस हा नामदेव ढसाळांच्या लिखाणाचा एक जिवंत, जातिवंत घटक आहे. या घटकावर त्यांचा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे जातिभेदविरोधात व शोषित-पीडितवर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसते.लोकशाही कोणत्या गाढविणीचे नाव आहे, अशी पहिली किंकाळी फोडून नामदेव यांनी येथली व्यवस्था हादरून टाकली. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा माणसाला पूर्ण करता येत नाही ते स्वातंत्र्य, ती लोकशाही काय कामाची, हे नामदेव ढसाळांनी आम जनतेला पटवून सांगितले. ‘शेवटी तुझे बोट धरून चाललो आहे मी’ या काव्यसंग्रहात बाबासाहेबांनी हजारो वर्षाच्या इतिहासाला वैचारिक नेतृत्वाने पालथे करून सन्मार्गाने जगायला शिकविले. ज्यांनी कालपर्यंत गुलामीचा, क्रॉस खांद्यावर घेऊन अंधारयात्री होऊन शतकांचा प्रवास गाठला, त्यांना क्रांतिकारी उजेडाची मशाल बहाल करून जगण्याचे नवे आकलन दिले. हे बाबासाहेबांचे कार्यकर्तव्य विषद करताना नामदेव म्हणतात,
कळीकाळाची आव्हाने स्वीकारून
कित्येक शतकांचा काळोख ओलांडून
तु घेऊन आला आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत
आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे.
दीनदु:खितांचा हात मशाल देणा-या व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणा-या नामदेव ढसाळ नावाच्या पँथरला माझा सलाम.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 

सरणावरची माणसं...अशोक पवार यांची कथा

अशोक पवार 

अर्ध्याराती पोलिसांची गाडी बेलखेड पोलिस ठाण्यात आली. पोलिसाईन त्यात सात आठ पारधी आन सात आठ पारधीन्या पकडून आनलेल्या. पारध्याईला एका खोलीत आन पारधीन्याईला दुस-या खोलीत कोंडलं. पारध्याईच्या खोलीत अधीपासूनच एक बुढा व्हता. तो वडार जातीचा व्हता. कणसं जेवारीचे कणसं चोरण्याच्या बा-यात त्याला पोलिसाईन आनलेलं. त्वांडात दात नसलेला बुढा केविलवाण्या चेह-यान याईच्याकडं बघत व्हता. तो दोन दिवसापासून एकटाच व्हता. पारध्याईला आनून त्याच्या खोलीत कोंडल्याच्यान त्याला बरं वाटलं. हितं येळ काई कटत न्हाई. बरं झालं बोलायाचालाया सोबती आले असं बुढ्याला वाटलं. जगातला कोनताच माणूस एकटा जगू शकत न्हाई. माणसाला जगण्यासाठी माणसाचीच गरज असते. त्याईची याच्यासंग बोलाचाली सुरू झाली. बिराडावर जगताना झालेल्या भेटीच्या वळखी पाळखी निघाल्या. बुढ्याला समदे आपलेच वाटू लागले आन बुढा ही त्याईला आपलाच तीन दगडाईचा चुलीचा सोबती वाटू लागला. याईच्या गप्पानला सुरवात झाली... 

मग चारपाच पोलिस दाराम्होरं आले हळूच एकाला काढून आत दुस-या खोलीत नेलं. कोंबड्याला जसं खुराड्यातून एकालाच काढतात आन खुराड्याचं दार बंद करतात तस एक जनाला काढून नेल्यावर खोलीच्या दाराला मोठ्ठं कुलुप लावलं. आत नेल्यावर जराशा येळानं आत नेलेल्या भाऊच्या किंकाळ्या कुत-यावानी इवळण्याचा आवाज दगडी भिंतीला छेदून गेला त्याचा आवाज ऐकून बाकीच्याईची फाटत व्हती...( अपूर्ण )
--------------------------------

अशोक पवार यांचे ‘बिराड’ अमरावती विद्यापीठात 

मानवी जीवनातील सर्व दु:खे भोगून झापडबंद विषम व्यवस्थेला हादरे देणाऱ्या येथील अशोक पवार यांच्या ‘बिराड’ या आत्मकथनाचा संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. अभ्यास क्रमात नुकताच समावेश करण्यात आला आहे. या पूर्वी ही ’बिराड’ आत्मकथनाचा पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यास क्रमात समावेश करण्यात आलेला आहे. ’बिराड’ या २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या आत्मकथनाबाबतचे आकर्षण अजून संपलेले नाही. अनेक विद्यार्थी ‘बिराड’वर राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यापीठात एम.फिल., पीएच.डी. करीत आहेत. बिराडच्या आवृत्या निघणे सुरूच आहे. अशोक पवार यांचे ‘बिराड’, ‘इळनमाळ’ व ‘दरकोस दर मुक्काम’ ही पुस्तक प्रकाशित आहेत. भटक्या विमुक्तांच्या व्यथा-वेदना व आजची त्यांची जीवघेणी परिस्थिती अशोक पवार यांनी पुस्तकातून जगासमोर आणली आहे. बिराड व इळनमाळच्या लेखनासाठी अशोक पवार यांना राष्ट्रीय दर्जाचा संस्कृती फाऊंडेशन नवी दिल्लीचा संस्कृती राष्ट्रीय पुरस्कारासह राज्यस्तरीय व राष्ट्रीय, असे एकूण १६ पुरस्कार मिळाले आहेत. संस्कृती साहित्य राष्ट्रीय पुरस्काराने अशोक पवार यांना सन्मानित करून भारतीय साहित्याने अस्वस्थ आयुष्याची नोंद घेतली आहे. अशोक पवार यांनी अनेक चढउतार जवळून बघितले. भीक, भूक, दारिद्रय़ व गुन्हेगारी यांच्या विळख्यात त्यांचे जीवन होरपळून निघाले आहे. त्यांचे जीवनानुभव विद्यार्थी आता अभ्यासक्रमातून अभ्यासणार आहेत.

भटक्या विमुक्तांचे जनावराचे पातळीवरचे जगणे नव्या पिढीला समजेल नव्या पिढीच्या संवेदना जाग्या होतील. ‘बिराडा’तील अशोक पवार यांचा जीवनप्रवास अभ्यासून विद्यार्थी प्रेरणा घेतील. भटक्या विमुक्तांचा संघर्ष वाचनातून अनुभवून मानवी मूल्य जोपासण्याचे भान असणारी नवी पिढी यातून निर्माण होईल. ज्या विदर्भातील अमरावती जिल्हय़ात आपण आयुष्याची बरीच वर्ष काढली त्याच भागातील विद्यार्थी जीवनप्रवास अभ्यासणार त्यांचा आनंद होतोय, असे अशोक पवार यांनी सांगितले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्हय़ातील महाविद्यालयातून पाच वर्षांसाठी अशोक पवार यांचे बिराड आत्मकथन या सत्रापासून अभ्यासले जाणार आहे. ३० गुणांसाठी पालातून सुरू झालेला आयुष्याचा प्रवास वेगवेगळय़ा विद्यापीठातून अभ्यासला जाणे व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, हा तर शोषितांचे साहित्यांचा सन्मान असल्याचे अशोक पवार यांनी सांगितले.




000000000000000000000000000000000

गन गन भोवरी, फिरते ही भिंगरी!

ही चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरातील जीवनदर्शन घडवणारी कादंबरी आहे. इथल्या परिसराची, मातीची भाषा, बोलीभाषेतच लेखन केले आहे. बोलीभाषेच्या विलक्षण गोडव्यामुळे हे लेखन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. बोलीभाषेमुळे भाषेची नितळ अंगलट अनुभवता येते.

गन-गन भोवरी : डॉ. इसादास भडके
लोकवाङ्मय गृह, मुंबई
पानं : १५५
किंमत : २०० रुपये
गन गन भोवरी म्हणजे गोल गोल फिरणे! परिस्थितीमुळे इसादासची आई आयुष्यभर भोवरीसारखी फिरत राहिली, वण-वण करत राहिली. इसादासच्या आईचे बालपण हिंदू महार अस्पृश्यतेच्या आगीत पार होरपळून निघाले. छोट्या रतिकेने मैत्रिणींसोबत आपणच बनवलेल्या कपडयाच्या बाहुलीचे लग्न समारंभ साजरे केले. गन गन फिरत ‘‘गन गन भोवरी चांदयाची नवरी’’ अशा लोकगीतांमध्ये रममाण झाली, मात्र हा भातुकलीचा खेळ खेळत असतानाच आपल्या आईच्या कष्टप्रद संसाराला हातभार लावणेही तिच्या नशिबी आले आणि तेव्हापासून तिचे कष्टाचे गन गन फिरणे सुरू झाले.
नकळत्या वयात लग्न होऊन सतिकाची मुक्ता पांडुरंग भडके झाली. नव-याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि मुक्ता ख्रिश्चन झाली. नव-याच्या मृत्यूनंतर इसादास आणि अशोकची जबाबदारी जाणून आपल्या लेकराच्या प्रभुदासच्या मृत्यूच्या दु:खावर मात केली. एका आईने आपल्या दोन लेकरांच्या जगण्यासाठी जे डोंगराएवढे दु:ख सहन केले, त्याची ही कहाणी! मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून बोर्डिगमध्ये ठेवावे लागणार, आपण एकटे पडणार हे जाणूनही ती त्यांना चंद्रपूरच्या बोर्डिगमध्ये ठेवण्यास तयार होते, पण आईच ती. मुलांशिवाय राहणे अशक्य झाल्यावर आपला गाव सोडून चांदयाला येऊन भाडयाच्या घरात राहून जगण्यासाठी सारेच खटाटोप केले, भांडी घासण्यापासून भाजीपाला, फळे विकणे, जंगलातून पाने तोडून डोक्यावरून पानांचे भारे आणले. धानाच्या चक्कीवर कोंडा पाखडून कुकुसकोंडा आणला.
त्याच्या आक्षा करून मुलांना वाढल्या. अपरिमित कष्ट करून जगणा-या या आईला ख्रिश्चन धर्म स्वीकारला असतानाही हिंदू देवदेवतांचे अंगात येऊन त्रास देणे सुरूच होते. याला कारण आपण ‘आंदी महारस होतो’, हेच असावे. मात्र ही दैवते कधीच एकटे असल्यावर येत नव्हती. सार्वजनिक ठिकाणीच यायच्या. अंगात आल्यावर आई तोंडाने फुसफुस आवाज करायची, डोलायची, लोटांगण घालायची, इसादासची त्याने मोठी पंचाईत व्हायची, आपण ख्रिस्ती असतानाही हिंदूंच्या देवी-देवता आपल्याला का छळतात, हा प्रश्न त्याला पडायचा. या येण्याने त्यांचे जगणे अधिकच बिकट झाले होते, मोलमजुरी बंद झाली होती. त्यातच भक्तीण-भगताकडे जाणेही सुरू झाले. पण शेवटी चमत्कारिक आणि आध्यात्मिक बाबी नसणारे जीवनच खरे, हे दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जीवनात आले. आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या सा-या संकल्पना गळून पडल्या. बाबांचा ‘बौद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ इसादासच्या वाचनात आला आणि मिशन बोर्डिगमधील हाउस फादरची नोकरी परिस्थिती बिकट असतानासुद्धा सोडण्याचे धैर्य अंगी आले. मनात बौद्ध धम्म स्वीकारावा असे आले.
त्यावर आईच म्हणणे, ‘‘तसंही आपून गिरजाघरात जाओ नाई खिरस्तान धरम सुटल्यावानीस आहाय. मले काय त्याच्यातला समजे नाई. तू जेथं जासीन तेथी मी आहोस. बाप खिरस्तान झाला मी खिरस्तान झाले तू बुद्ध हौसीन तं मीही बुद्ध होईन.’’
आईला जगण्यासाठी आजवर जो संघर्ष करावा लागला तो इसादासने पाहिला होता. आईच्या जगण्याचा त्याच्या जगण्यावरही परिणाम झाला होताच तेव्हा यातून मुक्त होण्यासाठी या भूमीतला, या संस्कृतीतला बौद्ध धम्म आवश्यक वाटला.
बौद्ध जवनपद्धतीमुळे, बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्यामुळे माणूस म्हणून जगता आले, अशी कबुली इसादास वारंवार देतात.
प्रतिकूल परिस्थितीही न हरता वाट काढण्याची जिद्द ही आईच्या जगण्याच्या संघर्षातून मिळाली. आई, मामाची आई या दोन अडाणी गरीब स्त्रिया परंतु त्यांची जीवनशैली जबरदस्त प्रेरणादायी होती. परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांची पद्धत अचाट करणारी होती. मात्र त्यांच्या जीवनात अंधश्रद्धा नसत्या, तर आईला माणूस म्हणून जगता आले असते. आईचा जीवनप्रवास हिंदू, ख्रिश्चन व नंतर बौद्ध असा झाला. बाबूराव बागुल यांच्या कवितेप्रमाणे -
तुझंच तुझं आईपण तर
परमेश्वरालाही भारी पडतं
तुझं प्रेमळ आईपण पाहून 
आई परमेश्वराची कल्पना
प्रेषितांना सुचली
अशी तू
देव, धर्म, देवळाहून भारी तू
नारी म्हणूनही आणि आई म्हणूनही

‘गन गन भोवरी’ ही चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरातील जीवनदर्शन घडवणारी आहे. इथल्या परिसराची, मातीची भाषा, बोलीभाषेतच लेखन केले आहे.
बोलीभाषेच्या विलक्षण गोडव्यामुळे हे लेखन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. बोलीभाषेमुळे भाषेची नितळ अंगलट अनुभवता येते. हलाखीच्या विपरित परिस्थितीमध्येही स्वत: आणि मुलांना जगवत नेणारी त्यांना प्रेरणा देणा-या आईची ही विलक्षण कहाणी आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.