সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, March 30, 2017

इमोजी : आधुनिक युगाची भाषा

इमोजी : आधुनिक युगाची भाषा

देवनाथ गंडाटे
आपल्या भावना दुसऱ्याला सांगण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी बोलीभाषेचा वापर होतो. हाच संवाद लिखित स्वरूपात असेल तर लिपीची गरज भासते. मात्र, आनंद, दु:ख, उत्साह, प्रेम, क्रोध, घृणा यासारख्या भावना चेहऱ्यावरून मांडता येतात. या भावना प्रकट करण्यासाठी भाषेची गरज नाही. लिखित किंवा मौखिक भाषेऐवजी बॉडी लॅंग्वेज, इशारा, चित्र आणि चेहऱ्यावरून भावना व्यक्त करता येतात. स्मार्टफोनच्या दुनियेत हाच भाव इमोजीच्या रूपाने आला आहे. जी आजच्या तरुणाईला याड लावत असून, झिंगाट होऊन चॅटिंगमध्ये व्यस्त झाली आहे.
स्मार्टफोनमुळे थेट संवाद दुरावला असला तरी चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी जुळून आहेत. अनोळखीशी मैत्रीसंबंध वाढून संवादाचा नवा मार्ग सुरू झालाय. आपल्या भावना पुढील व्यक्तीला व्यक्तही करू लागले. फोन कॉलपेक्षा मॅसेंजरवर बोलणं अधिक सोयीचे वाटत आहे. या माध्यमांचा वापर करून लिखित स्वरूपाचा संवाद सुरू झाला. फास्ट आणि साधे सोपे मॅसेंजर म्हणून व्हॉट्‌सऍप घराघरांत वापरला जातोय. यूजर्ससाठी नव्या इमोजी आल्यात. त्यामुळे चॅटिंग करताना मजा येते. शब्दांऐवजी चेहऱ्यावरील भावना व्यक्त करण्यासाठी इमोटीकॉन्स किंवा इमोजीचा वापर होत आहे. एखाद्याचा मॅसेज आला की त्यावर शब्दांनी प्रतिक्रिया द्यावी लागते. व्वा, किती छान! प्रतीम, सुरेख किंवा आवडला नसल्यास तशीही कमेंट केली जाते. त्याऐवजी आता चेहऱ्यावरील हावभाव सांगणाऱ्या इमोजीचा वापर होत आहे. यात हसणारा, रडणारा, रागाने लालपीला झालेला, विनोद करणारा, दात दाखविणारा, ताणतणाव सांगणाऱ्या इमोजी आहेत. इतकंच काय, तर ऑल दी बेस्ट, गुड जॉब, वेल डन, छान, मस्त, पटलंय हेदेखील इमोजीच सांगतो. यामुळे कंटाळवाणे वाटणारा चॅटिंग संवाद मजेशीर होत आहे. या इमोजीमुळे आधुनिक युगाची नवीन भाषाच जन्माला आली.
इमोजीचा इतिहास
जपानमधील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी 1999 मध्ये शब्दांतून संभाषण करताना काही चित्ररूप मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यातूनच चित्ररूप संभाषणाची पद्धत रूढ झाली. जपानमधील मोबाईल कंपनीतील अभियंत्यांनी त्यावर संशोधन सुरू केले. डोकोमो या कंपनीने सर्वप्रथम आयमोड नावाची सुविधा देऊन यूजर्सना भावना चित्रात व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याचा उपयोग वेबसेवा, ई-मेल आणि मोबाईलवर उपलब्ध करून दिला.
इमोजीचे फायदे
व्यक्तिगत संभाषणात गुप्तता राहते. सुरक्षितपणे तुम्ही टाइप करू शकता. टाइप करताना शब्द नसल्याने चुका टळतात. तुमच्या भावना शब्दांऐवजी थेट इमोजीतून व्यक्त होतात. संवादातील इमोजी वापरामुळे पुढील व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या हावभावाची कल्पना येते आणि चॅटिंग अधिक रंजक होते.
फेसबुक
या सोशल मीडियावर एखाद्या मित्राच्या पोस्टवर लाइकसह अन्य भावना व्यक्त करण्यासाठी नव्या इमोजी आल्यात. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. लाइक बटणावर क्‍लिक करून होल्ड केल्यास “रिऍक्‍शन दाखविणाऱ्या इमोजी येतात. यात सहा प्रकारच्या नव्या इमोजी आहेत. लव्ह, हाहा, वाव, सॅड, आणि अँग्री अशी बटणे आहेत. याद्वारे एखाद्या पोस्टवर राग, प्रेम, आश्‍चर्य, दु:ख अशा भावना व्यक्त करता येतात.
व्हॉट्‌सऍप
थेट व्यक्तिगत आणि सांघिक संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्‌सऍपने क्रांती केली. यात अनेक मॅसेजच येतात. त्यातही इमोजीचा वापर करून संवादाला चित्रमय करता येते. अधिक शब्दात माहिती देण्याऐवजी इमोजीचा वापर करून सोप्या आणि सहज पद्धतीने व्यक्त होता येते. मित्रांना जर, मी गावाला जात आहे, हे सांगायचे असल्यास तो प्रवास साधनाच्या इमोजीतून व्यक्त होतो. किंवा एखादा मॅसेज वाचून खूप हसू आल्यास हसून हसून डोळ्यात पाणी आले, हे सांगणारंही इमोजी आहे. व्हॉट्‌सऍपमध्ये इमोजीचे आठ ऑप्शन दिले आहेत. यात एकूण दीड ते दोन हजारादरम्यान इमोजी आहेत. याच इमोजी फेसबुक मॅसेंजर ऍपवरही आहेत.
इमोजीचे प्रकार
1. हसणारे, रडणारे व्यक्तिचित्रे
2. प्राणी, पक्षी, वृक्ष, फुले, पर्यावरण
3. फळे, खाद्यपदार्थ, शीतपेय
4. क्रीडा, संगीत
5. वाहने, इमारती
6. चैनीच्या व शैक्षणिक वस्तू
7. हार्टस, सिम्बॉल, आकडे
8. विविध देशांतील राष्ट्रध्वज
चला वाचवूया चंद्रपूरचा किल्ला

चला वाचवूया चंद्रपूरचा किल्ला

इको प्रो संस्थेच्या नगरसंरक्षक दलामार्फत जतन मोहिम

चंद्रपूर शहरास ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला- परकोटाने वेढलेले आहे. 550 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला आजही भक्कम असून, वैभवशाली गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. चंद्रपूर येथील पाच पिढ्यातील गोंडराजांनी हा किल्ला 100 वर्षांत बांधून घेतला. खांडक्‍या बल्लाळशाह या गोंडराजानी याचा पाया रचला, तर पाचव्या पिढीतील रामशाह गोंडराजांनी किल्ल्याच्या कामास पूर्णत्वास नेऊन चंद्रपूर शहर वसविले.
सात किमी लांबीचा किल्ला असून, यास 2 मुख्य प्रशस्त दरवाजे, दोन उप दरवाजे आणि पाच खिडक्‍या आणि अनेक बुरुज या किल्ल्यास आहेत. गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याच्या भिंतीस आणि बुरुजावर मोठ-मोठी वृक्ष वाढली होती. शिवाय किल्ल्यास तडेही गेलीत. बऱ्याच ठिकाणी किल्ला खचल्याने त्या भागातून किल्ल्याचे अवशेषसुद्धा नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या भिंतीवर, मुख्य दरवाज्यावर आणि बुरुजावर अनेक वृक्ष-वेली वाढलेल्या आहेत. ही वृक्ष मोठी झाली कि, भिंतींना तडे जातात. भिंती ढासळतात, नष्ट होतात. अश्‍या नष्ट झालेल्या किल्ल्याच्या भिंती, ऐतिहासिक वास्तू अतिक्रमणाखाली येतात आणि मग, उरल्या- सुरल्या इतिहासाची ओळख करून देणारी अवशेषे सुद्धा काळाच्या पडद्याआड जातात. अश्‍या अवस्थेत आपला इतिहास जिवंत ठेवणे, वास्तूचे जतन करणे काळाची गरज आहे.
किल्ल्याची हीच दुर्दशा आणि होणारे दुर्लक्ष याकडे जिल्ह्यातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली इको-प्रो संस्थेच्या "इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग' ने पुढाकार घेऊन मा. पंतप्रधान महोदयांनी सुरु केलेल्या "भारत स्वच्छता अभियान' अंतर्गत "चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान' 1 मार्च 2017 पासून सुरू केले.

इको-प्रो संस्थेच्या "नगर संरक्षक दल'च्या स्वयंसेवकांच्या मदतीने रोज सकाळी 06:00 ते 10:00 वाजेपर्यंत श्रमदान करून "किल्ला स्वच्छता अभियान' राबविले जात आहे. यात रोज जवळपास 25-30 सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिनबा गेट व जटपूरा गेट व या गेटच्या आजूबाजूच्या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडण्यात आली. सोबतच यावरील कचरा साफ करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. किल्ल्याच्या उंच भिंती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे "अडव्हेंचर क्‍लब' च्या माध्यमाने रोप बांधून दोरीच्या साहाय्याने वृक्ष-वेली तोडली जात आहे. बऱ्याच वर्षांपासून किल्ल्याची काही बुरुजे निमर्नुष्य असल्याने यावर वाढलेली वृक्ष आणि झुडुपात मधमाश्‍याची पोळे सुद्धा आहेत. यामुळे हे अभियान अनेक पद्धतीने जिकरीचे आणि साहसिक झाले आहे. या अभियानास लागणारी साहित्ये लोकसहभागातून संस्थेस नागरिकांनी देऊ केली आहे.

केवळ चंद्रपूर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला ऐतिहासिक-धार्मिक पार्श्वभूमी लाभली आहे. पुरातत्वीय दृष्ट्या हा जिल्हा महत्वाचा आहे. डोळस श्रद्धा आणि वैभवसंपन्न इतिहास याची ओळख आजच्या पिढीला करून देण्याचा गरजेतून इको-प्रो संस्थेने "पुरातत्व संवर्धन विभागाची' निर्मिती केली. वास्तविक वारसा जपण्याची त्याचे संवर्धन करण्याची व त्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठीच पुरातत्व विभागाची निर्मिती आहे. पण जबाबदाऱ्या आणि कर्तव्यपालनात होणारी कुचराई या ऐतिहासिक, धार्मिक वारसाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. किल्ले, मंदिरे, समाधींच्या भोवती साचलेला कचरा, वाढलेली झुडपं, पुरपण्यामुळे ढासळणारे चिरे, तिथे वावरणारी असामाजिक तत्वे, या साऱ्यांची डोळस नोंद, डोळस सदस्यांच्या मदतीने घेऊन नागरिकांचे, शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे तर शक्‍य तेवढी स्वच्छता राखण्यासाठीही इको-प्रो झटत आहे

 - बंडू धोतरे

 इको-प्रो संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी