সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, January 04, 2015

"हातमाग' बंद सिर्सीला हवाय रोजगार

"हातमाग' बंद
सिर्सीला हवाय रोजगार

श्रीमंत सिर्सीला विकासाची प्रतीक्षा
जिनिंग, प्रेसिंग व हातमाग व्यवसाय सर्व दूर प्रसिद्ध असलेले सिर्सी गाव. मात्र, हे उद्योग आता बंद झाल्याने गावातील नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय हिरावला. त्यामुळे बेरोजगारीची फौज निर्माण झाली आहे. उमरेड तालुक्‍यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख आता पुसली गेली आहे. प्रगतिशील शेतकरी संघटनेने 1989 मध्ये गावात जिनिंग-प्रेसिंग मिल व हातमाग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, कालांतराने हे दोन्ही व्यवसाय बंद पडले. यामुळे गावात मोठ्या संख्येत असलेला भूमिहीन कोष्टी समाज बेरोजगार झाला. त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी गावात कला-वाणिज्य महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हातमाग व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही, हीच शोकांतिका आहे.
.....
दृष्टिक्षेपात गाव
लोकसंख्या : 6,139
वॉर्ड : 15
ग्रामपंचायत सदस्य : 15
अंगणवाड्या : 8
विद्यालय : 2
वरिष्ठ महाविद्यालय 1
बचत गट : 25
मुख्य पिके : कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, तूर
----------------

राज्याच्या कृषिमंत्र्यांचे गाव
हातमाग व्यवसायासोबत गावाची ओळख महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री डॉ. दादासाहेब डेकाटे यांच्या नावामुळे झाली. ते याच गावचे असल्यामुळे त्यांना येथील समस्यांची जाण होती. त्यांच्या प्रयत्नाने लोकसेवा शिक्षण संस्था स्थापन करून वसंतराव नाईक कनिष्ठ विद्यालय सुरू केले. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील शिक्षण येथून मिळू लागले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात शाळा-महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात. डॉ. दादासाहेब यांचे पुतणे डॉ. अविनाश डेकाटे यांच्या मार्गदर्शनात संस्था उभी आहे. शिक्षण क्षेत्रात गावाने बरीच प्रगती केली. लोकसेवा प्राथमिक विद्यालय, संदेश कला महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे गावाला जत्रेचे स्वरूप येते.
.....
मूलभूत सुविधांचा अभाव
गावाच्या शैक्षणिक प्रगतीमुळे जवळपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. परंतु गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गावात डांबरी रस्ते, पिण्याचे पाणी, भूमिगत गटारी आदींची सुविधा नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असते. डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तरीही नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रशासन गंभीर नाही.
.....
शाळेची इमारत मोडकळीस
एकीकडे गावात महाविद्यालयाची चांगली सोय आहे. जवळपासच्या गावातील विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे घेतात. परंतु दुसरीकडे गावातील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शाळा अतिशय मोडकळीस आली असून, नवी इमारत उभारण्याबाबत शिक्षकांनी अनेकदा ग्रामपंचायतीला निवेदन दिले. परंतु त्याचा फायदा झाला नाही. मोडकळीस आलेल्या शाळेत जीव धोक्‍यात घालून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
....
कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशाच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. परंतु सुस्त प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारमुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. परंतु ग्रामपंचायतीकडून घनकचरा जमा करण्याची किंवा डम्पिंग यार्डची व्यवस्था केलेली नाही. त्यातच भरीस भर म्हणून नागरिकांनी जाग मिळेल तिथे खतांचे डोंगर उभे केले आहे. त्यामुळे डासांचा प्रकोप वाढला आहे.
...
कोष्टी समाजावर कुऱ्हाड
एकेकाळी सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून मिरविणाऱ्या सिर्सीला आता अवकळा आली आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या हातमाग व्यवसायात प्रत्येक घरातील नागरिकांचा सहभाग होता. त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक स्थिती उत्तम होती. परंतु हातमागाचे ठोके बंद होताच कोष्टी समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हातमाग मंडळाने अद्याप अनेकांचे हक्‍काचे पैसे न दिल्याची कैफियत येथील नागरिक शंकर डेकाटे, वशिष्ठ डेकाटे, सुनील हेडावू, मधुकर डेकाटे, महादेव सोरते, सुनील इंगळे, रत्नाकर डेकाटे, राजू डेकाटे आदींनी मांडली.
ग्रामपंचायतीने अद्याप कोष्टी बाधवांना घरकुल योजना लागू केली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबीयांनी झोपडीतच आपला संसार थाटला आहे. मिळेल ते काम करून कसातरी कुटुंबाचा गाडा ओढत असल्याची प्रतिक्रिया कोष्टी बांधवांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.
....
बसस्थानक बनले शोभेची वास्तू
नागपूर, वर्धा हे दोन जिल्हे आणि उमरेड, भिवापूर, चिमूर, समुद्रपूर या चार तालुक्‍यांना जोडणारे बसस्थानक सिर्सीत आहे. तरीही येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले. त्यामुळे हक्‍काची जागा असूनही बस थांबण्यासाठी जागा उपलब्ध नाही. रस्त्याच्या कडेला बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे एखादवेळी मोठ्या अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. बसस्थानक परिसरात प्रसाधानगृह आहे, परंतु त्याला कुलूप आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होते. पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. उच्च शिक्षणाची सोय असल्याने गावात विद्यार्थी - विद्यार्थिनींची रेलचेल असते, परंतु बसस्थानकावरील गेरसोयींचा त्यांनाही फटका बसतो.
...
एटीएमची सोय नाही
लगतच्या गावांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने सिर्सीत नागरिकांची सतत रेलचेल असते. परंतु गावात केवळ एकच राष्ट्रीयीकृत युको बॅंक कार्यरत आहे. बॅंकेने ग्राहकांना एटीएम कार्ड पुरविण्याचे काम केले, परंतु गावात एकही मशीन नसल्याने एटीएमचे करायचे काय, असा प्रश्‍न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांना संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. त्यामुळे एटीएमची व्यवस्था होणे गरजेचे आहे.
...
जंगलातील नाले गावात
सिर्सीत झुडपी जंगलातून दोन नाले उलट गावातून वाहत जातात. एक नाला जि.प. शाळेजवळील डॉ. केणे यांच्या रुग्णालयाजवळून वाहतो. तर दुसरा ग्रा. पं. सदस्य संदीप दांदगे यांच्या घरालगत वाहतो. या बारमाही वाहणाऱ्या नाल्यांमुळे गावात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असते. परिणामी डासांचा हैदोस वाढून साथ रोगांना निमंत्रण मिळत आहे. मागील महिन्यात नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. यापैकी तिघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. साथी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाल्यावर झाकण असणे किंवा महिन्यातून एकदा त्याची सफाई होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे.
...
प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था
गावात साथरोगांचे थैमान असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. येथील गैरसोयी आणि डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या उद्धट वागणुकीमुळे अनेकदा नागरिकांनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. या रुग्णालयात परिसरातील महालगाव, खानखेडा, सालेभाटी, किन्हाळा, केसलापूर, मानोरी येथील नागरिक उपचारसाठी येतात. परंतु रुग्णालयात डॉक्‍टर नियमित येत नसल्याने रुग्णांनी गैरसोय होते. निदान लहान मुलांसाठी रुग्णालयात एखादा बालरोगतज्ज्ञ असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
....
पोलिस चौकीत दारुड्यांचा वावर
महत्त्वाची बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र असूनही येथील नागरिकांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. पोलिस चौकीतच दारुडे पोलिसांसोबत चर्चा करताना दिसतात. चौकीत तीन कर्मचारी पेकी कधीच तिघे उपस्थित राहत नाही. कित्तेकदा चौकीला कुलूप असते. अशावेळी एखादी अनुचित घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. गावात चौकी असूनही चौकाचौकात जुगार चालतो. सट्टापट्टीला उधाण आले आहे. अवैध वाहतुकीवर नियंत्रण नाही. बुधवार बाजाराच्या दिवशी चौकीलगतच तळीरामांची फौज असते. त्यामुळे महिलांचे बाजारात जाणे कठीण झाले आहे.
.....
अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत
गावात आठ अंगणवाड्या असून, त्यामध्ये सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. परंतु त्यापैकी 4 अंणवाड्या भाड्याच्या खोलीत आहेत. त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा नाही. श्रीमंत ग्रामपंचायत म्हणवल्या जाणाऱ्या सिर्सीत अंगणवाडीच्या स्वत:च्या इमारतीसाठी प्रयत्न केले जात नाही. खाऊ आणि खिचडी वाटपासोबत मुलांचा बौद्धिक विकास करणे अंगणवाड्यांचे काम आहे. परंतु वाढत्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे अंगणवाडीतील शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे शासनाने वेळीच लक्ष देऊन अंगणवाडीतून मुलांना इंग्रजीचे धडे दिले पाहिजे. शिवाय अंगणवाडीत मुलांना परिपूर्ण आहार मिळावा, असे शासकीय निर्देश आहेत. परंतु फळे, अंडी यांचे वाटप विद्यार्थ्यांनी कधीच केले जात नाही. हा निधी जातो कुठे, असा प्रश्‍न पालकांमधून विचारला जात आहे.
....
हागणदारीमुक्‍तीसाठी पुढाकार घेणार कोण?
स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने घरोघरी शौचालयांची निर्मिती करून निर्मलग्राम साकारण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाला केले आहे. परंतु गावातील मंडळी सकाळी उघड्यावर विधी उरण्यात धन्यता मानते. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावाची हगणदारीमुक्‍तीकडे नव्हे तर हगणदारी युक्‍तीकडे वाटचाल सुरू आहे. निर्मल ग्राम योजनेबाबत आमसभेत चर्चा करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. परंतु याबाबत जनजागृतीच केली जात नाही. त्यामुळे गावातील अनेक रस्त्यांवरून पायी चालणे कठीण झाले आहे.
.....
तुंबलेल्या नाल्यांकडे दुर्लक्ष
गावाच्या सभोवतालच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. ग्रामपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष असल्याने साथीचे आजार बळावले आहेत. काही दिवसांपूर्वी नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली होती. त्यामुळे केलेल्या पाहणीत घरातील स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचे डास व अळ्या आढळल्या होत्या. गावातील उघडी, तुंबलेली गटारे यासाठी कारणीभूत असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले होते. नागरिकही घरातील कचरा तुंबलेल्या नाल्यांमध्ये टाकतात. त्यामुळे नाल्या तुंडुंब भरल्या आहेत. परंतु उपसरपंचांचे स्वत:च्या वॉर्डातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नाल्यांजवळून गेल्याने पिण्याचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोटाचे आजार बळावत आहेत.
....
रस्त्यावरच भरतो आठवडी बाजार
वर्दळीचे गाव असल्याने येथील आठवडी बाजारात जवळपासच्या गावातील नागरिकांची गर्दी होते. परंतु बाजारासाठी जागा नसल्यामुळे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा बाजार भरतो. हा बाजार उमरेड-हिंगणघाट राज्य महामार्गापर्यंत येतो. बाजाराचा ठेका जि.प.कडे आहे, परंतु विकासकामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. त्यामुळे विकास कोण करणार, हा प्रश्‍न निर्माण होतो. काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून ओटे बांधण्यात आले, परंतु त्या ठिकाणी कोणतीही मुलभूत व्यवस्था नसल्याने ओट्यांकडे कुणी फिरकलेच नाही. बाजारपेठेत प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते. पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. जि.प. आणि ग्रामपंचायतीच्या वादात नागरिकांची गैरसोय होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बसस्थानकापासून जवळच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक चालते, परंतु पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असते.
....
प्रतिक्रिया

गावातील पोलिस चौकी केवळ देखाव्यापुरती आहे. लगतच्या गावातील नागरिकांची वाढती वर्दळ आणि गुन्हेगारीमुळे स्थायी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे. पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
- धनराज मांगरुडकर
ग्रा.पं. सदस्य सिर्सी
......
राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. फु. म. डेकाटे यांचे गाव असूनही सिर्सीचा विकास झालेला नाही. दादासाहेबांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गावातील जातीपातीचे राजकारण आडवे येत आहे. दादासाहेबांचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना यानिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन गावाचा विकास करणे गरजेचे आहे.
डॉ. अविनाश डेकाटे
संचालक, लोकसेवा शिक्षण संस्था, सिर्सी
....
कोष्टी समाजाची त्यांच्या व्यवसायावरून जात पडली. परंतु शासनाने त्यांना हलबा - हलबीमध्ये वाटून समाजबांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. कोष्टी समाज आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारने त्यांचा हक्‍क मिळवून द्यावा.
- शंकर डेकाटे, माजी उपसरपंच
...
गावातील अंतर्गत राजकारणामुळे विकास रखडला आहे. ज्याचा फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे जनतेने एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
- प्रफुल्ल फरकाडे
...
तालुक्‍यातील महत्त्वाची बाजारपेठ आणि श्रीमंत ग्रामपंचायत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तुुंबलेल्या नाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथरोगांचा फैलाव होत आहे.
- शशिकांत झुल्लरवार
.....
सिर्सीचे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसराची जीवन संजीवनी आहे. परंतु डॉक्‍टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नियमित डॉक्‍टरांसह अन्य सुविधांनी सज्ज रुग्णालयाची निर्मिती व्हावी.
- डॉ. श्रीकांत केणे
शिवसेना तालुकाध्यक्ष
........
ग्रामीण भागासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.
- ताराबाई घोडमारे
ग्रा. पं. सदस्य
.....

समस्या यांना सांगा
आमदार सुधीर पारवे : 9422829164
सरपंच निकिता चुटे : 9623343553
उपसरपंच किसना चुटे: 9823503643
पंचायत समिती सदस्य सुशीला वानखेडे : 7350336387
ग्रामविकास अधिकारी चव्हाण : 9767511506
जि. प. सदस्य जयकुमार वर्मा : 9011602929
---------------------
ंसंकलन : प्रा. शिवाजी घरडे 9422167845

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.