সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, November 19, 2014

मैफलीत बसलेल्या बगळ्यांचा विहिरीत घसरला तोल

एक शेत... शेतात ओलितासाठी विहीर... विहिरीच्या तोंडावर बांबूची काठी... काठीवर बगळ्यांची मैफल बसलेली... खेळण्यात रमलेली... पंख फडफडणं... हळूच उडणं - हळूच बसणं... सारं काही ऑल इज वेल... आणि तेवढ्यात एका बेसावध क्षणी... दांड्याच्या काठावरून घसरले... पन्नास-साठाच्या गर्दीने काहींना तोल सावरेना. उडता न येण्याने खोल साठ फूट विहिरीत पडले. ही घटना आहे हरदोली (नाईक) येथील शिवारातल्या शेतातील.
नागपूर जिल्ह्यातील वेलतूर निवासी लालाजी साठवणे, आकाश साठवणे व गोपाल साठवणे यांच्या शेतात सध्या ओलिताची कामे सुरू आहेत. मिरचीला पाणी व गव्हाच्या शेताला पेरणीपूर्वी भिजवून मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा जोर आहे. यादरम्यान शेतात मोठ्या प्रमाणात बगळ्यांची गर्दी होत असते. बगळे ओलिताच्या शेतात आपले अन्न शोधत फिरत असतात. अशा एका क्षणी विहिरीच्या तोंडावर ठेवलेल्या दांडीवर मैफल सजवून बसलेल्या बगळ्यांचा अपघात घडला आणि ते विहिरीत पडले. काही बगळे कसेतरी बाहेर निघाले. पण, एक-दोन नव्हे, तर सोळा बगळे तिथेच अडकले. त्या सोळा बगळ्यांना काही केल्या खोल विहिरीतून बाहेर पडता आले नव्हते.
उडण्यास अपुरी जागा व विहिरीच्या खोलीमुळे भांबावलेले बगळे "कोर...कोर' आवाज काढत कासावीस होत होते. उडून उडून थकल्यावर बसण्याचा आधार शोधू लागले. बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते. पण, सारे प्रयत्न व्यर्थ. बगळा हा पक्षी हळूहळू टप्प्याटप्प्याने विमानासारखी उंची गाठत असतो. ही उंची गाठणे त्यांना आठ फूट व्यासाच्या विहिरीत शक्‍य होत नव्हते. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात विहिरीच्या सिमेंट कॉंक्रिटच्या बांधकामावर आदळून आदळून काही जखमीही झाले. शेतात काम करणाऱ्या मजुरांना ही बाब लक्षात आली. त्यांनी विहिरीत लांब बांबू टाकून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. दोरही टाकला. पण, घाबरलेले बगळे अधिकच घाबरून जोरजोरात ओरडू लागले. त्यांनी शेवटपर्यंत तरी मदत स्वीकारली नाही. त्यामुळे मदतीचे सारेच प्रयत्न निष्फळ ठरत होते. सारेच मेटाकुटीस आले. शेवटी अंधार पडला. भारनियमनानुसार वीज गेली.
ओलिताची कामे थांबली. दुसरा दिवस उजाडला. चार बगळे मरून विहिरीच्या खोल पाण्यात पडलेले होते. बाकीचे जिवाच्या आकांताने आदल्या दिवशीसारखेच विहिरीच्या खोल गर्भात गलका करीत होते. शेवटी शेतमालक लालाजी साठवणे व पुतण्या गोपाल साठवणेला बगळ्यांचा बाहेर पडण्याचा प्रयत्न पाहावला नाही. ते स्वतः दोराच्या साहाय्याने विहिरीत उतरले. प्रथमतः त्यांनी पाण्यात पडलेल्या बगळ्यांना जिवंत असावेत, असा कयास लावत सोबतच्या टोपलीत ठेवून पुतण्याच्या मदतीने विहिरीबाहेर काढले. त्या साऱ्यांचा मृत्यू झाला होता. पुढे एक एक करत साऱ्यांना झोळीत पकडून विहिरीबाहेर काढले. बाहेर काढल्यावर खूप वेळपर्यंत ते सारे मूर्च्छीत पडून होते. रानातल्या मोकळ्या हवेत ठेवल्यावर चेतना आली आणि ते हालचाल करू लागले, मोकळा श्‍वास घेऊ लागले. तोपर्यंत बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. नंतर एक-एक करीत सारेच बगळे निसर्गात मुक्तपणे उडाले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.