काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 13, 2010

ताडोबातील गाइड संपावर जाणार

ताडोबातील गाइड संपावर जाणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, December 13, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: vidarha, tadoba sanctury, guide



मासिक वेतन आणि विमा देण्याची मागणी
चंद्रपूर- प्रतिवाहन दोनशे रुपये किंवा वनखात्याने वेतन सुरू करावे, या मागणीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 90 गाइडनी संप पुकारला आहे. उद्या (ता. 13) नागपूर येथे ते विधानभवनावर मोर्चा काढणार आहेत.
वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वन्यजीव आणि वनांची माहिती देण्याचे काम गाइड करीत असतात. येथे दररोज सहाशेच्या आसपास पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे प्रतिदिवस 60 वाहने आत जाण्याची सुविधा आहे. या प्रत्येक वाहनांवर एक गाइड जात असतो. त्याला प्रतिवाहन 100 रुपये मानधन पर्यटकांकडून दिले जाते. मात्र, महागाई वाढत असल्याने 100 रुपये प्रतिदिवसाच्या कमाईवर कुटुंब चालविणे गाइडला शक्‍य होत नाही. शिवाय हे सर्व गाइड स्थानिक आदिवासी कुटुंबातील आहेत. गाइडच्या कामाशिवाय अन्य कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने येथील कुटुंब ताडोबाच्या भरवशावर अवलंबून आहेत. आता महागाईमुळे 100 रुपये प्रतिवाहनाऐवजी 200 रुपये करण्यात यावे किंवा वनखात्याने मासिक वेतन सुरू करावे, विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी सर्व गाइडनी केली आहे. या मागणीला घेऊन सोमवारी संप पुकारण्यात आला आहे. विदर्भातील सर्व पर्यटनस्थळांचे सुमारे 200 गाइड नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून शासनाकडे मागण्या मांडणार असल्याची माहिती आहे.



आता पर्यटक फिरणार फ्री झोन

ताडोबात जाण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सहा गेट सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. शिवाय ताडोबा, मोहुर्ली आणि कोळसा या तीन झोनपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी पर्यटकांना फिरता येत होते. पर्यटकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आता 21 डिसेंबरपासून केवळ मोहुर्ली, कोलारा आणि पांगडी हे तीनच गेट सुरू ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित सुरू असलेले खुटवंटा, अडेगाव, नवेगाव हे गेट बंद करण्यात येणार असून, प्रत्येक गेटमधून 20 वाहने अशी 60 वाहने ताडोबात जातील.

Sunday, December 12, 2010

भविष्य सांगणाऱ्यांचे वर्तमान अंधारात!

भविष्य सांगणाऱ्यांचे वर्तमान अंधारात!

भाग 1
Sunday, December 12, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: astrology, chandrapur, vidarbha
प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - स्वातंत्र्याच्या सहा दशकांनंतरही सरोदी समाजातील प्रथा-परंपरेच्या शृंखला सैल होण्याऐवजी आणखी घट्ट झाल्या आहेत. शहरातील नेहरूनगरात या समाजाची वस्ती आहे. या वस्तीतील जवळपास वीस कुटुंबांवर जातपंचायतीने बहिष्कार घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे कारण समाजातील महिलांच्या जाती किंवा जातीबाहेर केलेला पुनर्विवाह एवढेच आहे. येथील ही घटना प्रातिनिधिक आहे. ज्या शहरात, गावात या समाजाची वस्ती आहे; तेथील महिला सामाजिक बहिष्काराच्या यातना रोजच सहन करीत असून, भविष्य सांगण्याचा पिढीजात व्यवसाय असणाऱ्या सरोदी समाजाचे वर्तमान मात्र अंधारातच चाचपडत आहे.

सरोदी समाजातील माणसं भविष्यकथन करीत असल्याने त्यांना पश्‍चिम महाराष्ट्रात "जोशी' या नावानेही ओळखले जाते. राज्य शासनाच्या यादीत ही जात विमुक्त भटक्‍या या प्रवर्गात मोडते. जवळपास 95 टक्के निरक्षर असलेला हा समाज आता शहरी भागात दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. कोणताही निर्णय जातपंचायतीच्या माध्यमातूनच घेतला जातो. जातीतील माणसांनी साधे "पोलिस' असे नावही उच्चारले तरी त्यांच्यावर दंड आकारण्यात येत असल्याने जातपंचायतीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न ते करू शकत नाहीत. विशेषत: महिलांच्या बाबतीत या समाजात प्रचंड जाचक प्रथा आहे. पुरुषांना कितीही लग्न करण्याची परवानगी आहे. मात्र, महिलेला पुरुषाने घराबाहेर काढले, काडीमोड घेतला; तरीही तिला जातीत किंवा जातीबाहेर पुनर्विवाह करता येत नाही. प्रसंगी त्या महिलेने धाडस करून लग्न केले तर जातपंचायत तिच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकते. अशा कुटुंबीयांना कोणत्याही धार्मिक विधी, लग्न समारंभ, अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत नाही. मात्र, या जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात आता शहरी भागातील काही कुटुंबांमध्ये रोष आहे.
चंद्रपुरातील नेहरूनगर, मातानगर आणि भिवापूर वॉर्डात या समाजाची वस्ती आहे. सुमारे वीस कुटुंबांतील मुलींनी पुनर्विवाह केला आहे. यातील काही गावातच आहेत, तर काही बाहेर गेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. या प्रत्येकाची व्यथा आपण एकविसाव्या शतकात आहोत काय? याचा विचार करायला लावणारी आहे. येथील रवा पिसाराम भंगाळे व शंकर पिसाराम भंगाळे यांच्या मुलींचे लग्न होते. त्यांनी पत्रिकेत त्यांचे भाऊ जनार्दन भंगाळे व तुळशीराम भंगाळे यांची नावे टाकली आहेत. या दोघांच्याही पत्नी पुनर्विवाहित आहेत. त्यांच्यावर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेत टाकणे पंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणारेच होते. त्यांचे पत्रिकेतून नाव काढायला सांगितले. जातपंचायतीने रवा व शंकरवर दंड बसविला. बहिष्काराच्या भीतीने लग्नाच्या पत्रिका पुन्हा छापाव्या लागल्या. दोघाही भावांना लग्नात बोलाविले नाही. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील त्यांचा चुलत भाऊ बापूराव चेंडबा भंगाळे यांच्यावरही याच कारणामुळे जातपंचायतीने 90 रुपयांचा दंड बसविला. जातीच्या बाहेर काढण्याची धमकी देण्यासोबतच मुलाला लग्नमंडपात पोचू देणार नाही, अशीही धमकी दिली होती. शेवटी त्यांनाही लग्नपत्रिका बदलावी लागली. पाटणबोरी येथील लग्नात जनार्दनला पत्नीसह मारहाण करण्यात आली. त्यांना लग्नात येऊ दिले नाही. ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या समाजातील शेकडो कुटुंबीय रोजच बहिष्काराच्या यातना सहन करीत आहेत. (क्रमश: )

यांना अधिकार कुणी दिला?
जनार्दन भंगाळेची पत्नी सोनूबाईने पहिल्या पतीला सोडून त्याच्याशी विवाह केला. त्यांना ज्योती नावाची मुलगी आहे. ती दहाव्या वर्गात आहे. 95 टक्के समाज निरक्षर असताना ज्योती शिकली. आतापर्यंत सुरळीत सुरू होते. मात्र, अचानक तीन महिन्यांपूर्वी जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ज्योतीचा अलीकडेच साक्षगंध झाला. त्यावेळी समाजातील कुणीच आले नाही. कायद्याची थोडी समज असणाऱ्या ज्योतीला हा अन्याय वाटतो. आमच्यावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा प्रश्‍न तिने "सकाळ'शी बोलताना उपस्थित केला. संबंधित बातम्या


प्रतिक्रिया

On 12/12/2010 08:41 AM BORSE MANOJ KADU( SHIRSONDI) MALEGAON NASHIK said:

आज हमारा देश इतना आगे जा रहा है और हमारा महाराष्ट्र मेरा महाराष्ट्र कहा पीछे रह रहा है . TALUKA POLICE SHOULD INTERFARE HERE,TAKE NECESSARY ACTION . POLICE AUTHORITY OF DISTRICT,AS WELL AS LOCAL POLITICAL LEADERS SHOULD SOLVE THE PROBLEM.LITERATE PEOPLE OF THIS VILLAGE,IMPROVE SCHOOL AND EDUCATION LEVEL.

On 12-12-2010 05:06 AM Vasant Galatage said:

अशा प्रथा बंद करण्यासाठी लोक्प्रतीनिधीनी पुढाकार घेतला पाहिजे. फक्त निवडणुकीपुरते समाजसेवेचा दिखावा नको.स्वातंत्र्याचा ६० वर्षा नंतर देखील हीच स्थिती असताना आम्ही महासत्ता बनायला चाललो आहोत, याच्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
भाग २
बहिष्काराच्या भीतीने सोडले गाव
परित्यक्ता महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी; माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांवरही टाकला बहिष्कार
चंद्रपूर- सरोदी समाजातील जातपंचायतीला कंटाळून येथील जवळपास 50 कुटुंबांनी आजवर स्थलांतर केले आहे. कुटुंबावरील बहिष्काराच्या भीतीमुळे शेकडो परित्यक्ता महिलांनी दुसरा विवाह केला नाही. आपल्या आईवडिलांच्या आश्रयाला राहून मोलमजुरी करून आपला आणि आपल्या मुलांचा त्या सांभाळ करीत आहेत. काहींनी दुसरी लग्नगाठ बांधली. त्यांनाही कायमस्वरूपी बहिष्कृत करण्यात आले. ही जातपंचायत समाजातील चार-पाच लोकांची मक्तेदारी असून, त्यांच्याविरोधात समाजातील वृद्ध, तरुणांचा सूर आहे. परंतु, उघडपणे बोलण्याचे धाडस मात्र त्यांच्यात अद्याप आलेले नाही.

सरोदी समाजातील जातपंचायतीमध्ये निर्णय घेणारे लोक चार-पाच असतात. विशेषतः समाजातील धनिकांकडे स्वतःहून आलेली ही मक्तेदारी असते. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले की, त्यांची पंचायत भरते. त्याचवेळी कुणी काय केले, समाजात काय सुरू आहे. यावर निर्णय घेतला जातो. दंड बसविला की, रक्कम आपसांत वाटून दिली जाते किंवा त्या रकमेतून जेवणावळी होते. अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली जातपंचायत मध्यंतरी जवळपास बंदच झाली होती. मात्र, गत दोन वर्षांपासून तिला पुन्हा संजीवनी देण्याचे काम समाजातील काही लोकांनी सुरू केले आहे. यामुळे आता तरुणांमध्ये याविरुद्ध रोष आहे. मात्र, निरक्षर समाज आपल्या पाठीशी राहणार नाही, याची खात्री असल्याने ते उघडपणे बोलायला तयार नाहीत. समाजातील सामान्य घटकांनाच याची झळ पोचली आहे, असे नाही. तर समाजातील एका माजी नगरसेवकाच्या कुटुंबीयांनाही बहिष्कारास सामोरे जावे लागले आहे. नेहरूनगर येथील शंकर मानाजी सुडोत यांच्या वडिलांनी 60 वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेशी पुनर्विवाह केला होता. याच कारणावरून जातपंचायतीने त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. 22 नोव्हेंबर 2010 ला सुडोत यांच्या मुलाचे साक्षगंध होते. तेव्हा समाजातील एकानेही या समारंभाला जाऊ नये, अन्यथा नऊ हजार रुपयांचा दंडाची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे साक्षगंधाच्या कार्यक़्रमाला कुणीच आले नाही. शेकडो लोकांचे भोजन अक्षरशः फेकून द्यावे लागले. सुडोत भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा याला विरोध आहे. मात्र, समाजातील माणसं त्यांच्या पाठीशी नसल्याने तेही हतबल आहेत. याच झळाला कंटाळून नेहरूनगरातील जवळपास 50 एक कुटुंब नागपूरला स्थलांतरित झाले आहेत. हीच परिस्थिती सगळीकडे आहे, असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. स्वतः सुडोत घर विकून दुसरीकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

परित्यक्ता, विधवांच्या मरणयातनाजातपंचायतीचा सर्वाधिक त्रास निराधार, विधवा आणि परित्यक्‍त्या महिलांना सहन करावा लागत आहे. एकट्या चंद्रपुरातील नेहरूनगर आणि मातानगर येथे पतीने वाऱ्यावर सोडलेल्या चौदा मुली मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. यापैकी काहींना मुले आहेत. कुटुंबावरील बहिष्काराच्या भीतीने त्यांनी दुसरे लग्न करण्याचे धाडस केलेले नाही. त्यातील एकीने दुसऱ्या जातीतील व्यक्तीशी लग्न करण्याची हिंमत केली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बहिष्कृत करण्यात आले आहे. तिच्या आधीच्या पतीने मात्र दुसरे लग्न केले आहे. समाजात ते प्रतिष्ठित म्हणून वावरत आहे.

Saturday, December 11, 2010

दारूबंदीची ऐतिहासिक पदयात्रा

दारूबंदीची ऐतिहासिक पदयात्रा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दारूबंदीचे विचार दिले आहे. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. महाराजांचे दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून महाराजांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. परोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना' ला चार हजार 805 कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. जिल्ह्यातील सर्व दारूचे परवाने रद्द करून दारूबंदी करावी, या मागणीवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल, अशी घोषणा उत्पादनशुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानसभेत केली. हे श्रमिक च्या एलगार चे ५० टक्के यश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरला पदयात्रा निघाली नाही. मात्र, श्रमिक एल्गारच्या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियानाअंतर्गत निघालेली पदयात्रा ही ऐतिहासिक आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कष्टकरी महिलांचा मोर्चा अनेक दिवसांची पायपीट करीत गुरुवारी विधानभवनावर गेला होता. अनेक महिला तर अनवाणी पायाने चालल्या. पायाला फोडे आली. प्रकृती बिघडल्या. वेदना विसरून चालत राहायचे. दिवसभर, रात्री गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जनजागृती करायची. उघड्यावरच मुक्काम ठोकायचा. पाच दिवसांचा या प्रवासाने अनुभवांची शिदोरी मिळाल्यासारखी वाटली, हे बोल आहेत चिमूर ते नागपूर 130 किलोमीटरचे अंतर पदयात्रेतून पार करणाऱ्या महिलांचे. पदयात्रेला काही प्रमाणात यश मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर आहे. प्रवीण चिचघरे, यमराज बोधनकर, नीलाबाई ठाकरे, कपिला भसारकर, माधुरी तोरे, संगीता गेडाम या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपले अनुभव कथन केले.

श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांची कर्मभूमी चिमूर येथून पाच डिसेंबरला पदयात्रेला सुरवात झाली. भद्रावतीपासून तर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून एकत्र आलेल्यांनी दारूबंदीचे नारे देत पदयात्रा केली. भिसी मार्गावरून चिंचाळा या गावात पहिला मुक्काम झाला. महिला आपली पाच दिवसांची रोजीरोटी सोडून या पदयात्रेत सहभागी झाल्या. 10 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या पार्वताबाई सिडाम, मीराबाई गावतुरे, शांताबाई कोसरकर, पार्वताबाई व्याहाडकर, रुकमाबाई लोनबले व वल्लुबाई सीमोनकर, मोहुर्ले, धृपता नैताम आंच्यासह अनेक वृद्ध महिला धडाडीने या पदयात्रेत सहभागी झाल्या. 130 किलोमीटर अंतर पार करीत नागपुरात पोचल्यानंतर नागपुरातील अनेक नागरिक मदतीसाठी पुढे आले. दु:ख, वेदना, थंडी व अचानक आलेला पाऊस यातही हे पाच दिवस कसे गेले हे समजलेच नाही, असे महिलांनी सांगितले. या पदयात्रेमुळे शासनाला समिती गठित करावी लागली, याचा आनंद महिलांना आहे.

आनंद तरीही...
बल्लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथील श्रमिक एल्गारचा कार्यकर्ता सूर्यकांत हा चार डिसेंबरला पदयात्रेत सहभागी होण्याकरिता चिमूरला होता. याच दिवशी त्याच्या पत्नीला मुलगा झाल्याची बातमी त्याला कळविण्यात आली. आनंद झाला. मात्र, तो माघारी गेला नाही. याच पदयात्रेत मुलगा झाल्याचा आनंद पेढे वाटून साजरा केला. संपूर्ण पदयात्रेची सांगता झाल्यानंतरच तो गावाकडे परतला.
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याच्या होत असलेल्या मागणीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाच्या निमित्ताने दारूबंदीवर झडलेली चर्चा अतिशय भावनिक पातळीवर गेली. महसुलाचा अट्टहास सोडून शासनाने सर्वत्र दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनेक आमदारांनी चर्चेच्या निमित्ताने केले.
५ दिसेम्बार ला सकाळी साडेपाचला बालाजी मंदिर येथून पदयात्रेला सुरवात झाली.  अध्यक्षस्थानी प्रा. जयश्री कापसे-गावंडे होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. पारोमिता गोस्वामी, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, जिल्हापरिषद सदस्य प्रा. दादा दहीकर, सुमनबाई टेकाम, कुमरे, विमल कोडापे, सुरेखा कुसराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मासिक सभेत चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा ठराव मांडून संमत करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांनी दिले, ही देखिल जमेची बाजु आहे.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीविषयी अशासकीय विधेयक सभागृहात मांडले. विधेयकावरील चर्चेच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारूबंदीच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

Monday, December 06, 2010

Saturday, December 04, 2010

चंद्रपूर > विशेष

चंद्रपूर > विशेष

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने व कार्याने पावन झालेली आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’चे अविरत सेवाकार्य जेथे सुरू आहे अशी भूमी म्हणजेच चंद्रपूर जिल्हा!
ताडोबा राष्ट्रीय उद्यान, औष्णिक विद्यूत निर्मिती केंद्र, देशातील प्रमुख कागद कारखाना, खनिजदृष्ट्या समृद्धी, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक असलेले वनक्षेत्र ह्या विविध वैशिष्ट्यांनी विदर्भ भागातील हा चंद्रपूर जिल्हा नटलेला आहे.

--------------------------------------------------------------------------------

ऐतिहासिक महत्त्वाचे
प्राचीन काळी चंद्रपूर हा जिल्हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. ब्रिटिश राजवटीत व स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा ‘चांदा’ या नावाने ओळखला जात होता. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. चांदा जिल्ह्यासही पुढे ‘चंद्रपूर’ जिल्हा या नावाने ओळखले जाऊ लागले.
साधारणतः नवव्या शतकात या प्रदेशावर प्रथम नागवंशीय राजांची व त्यानंतर गोंड राजांची सत्ता होती असे लिखित इतिहासात आढळते. नागवंशीय बौद्ध राजा गहलू याने भद्रावतीपासून ८०कि.मी. अंतरावर माणिकगड हा किल्ला बांधला असे म्हणतात. पुढे अठराव्या शतकाच्या आसपास या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली. नागपूरच्या भोसले घराण्यातील राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याचे कारण दाखवून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.

भूगोल
जिल्ह्याचे भौगोलिक स्थान -
जिल्ह्याच्या उत्तरेस - भंडारा व नागपूर जिल्हा, दक्षिणेस - अदिलाबाद जिल्हा (आंध्रप्रदेश), पूर्वेस - गडचिरोली जिल्हा, पश्चिमेस - यवतमाळ जिल्हा- हे जिल्हे वसलेले आहेत.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात चंद्रपूर जिल्हा आहे. २६ ऑगस्ट, १९८२ पर्यंत चंद्रपूर हा क्षेत्रफळाने महाराष्ट्रात सर्वात मोठा तर भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा जिल्हा होता. याच दिवशी या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले व चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या दोन स्वतंत्र जिल्ह्यांची
निर्मिती करण्यात आली. जिल्ह्याच्या नैऋत्य कोपर्‍यात डोंगर पसरलेले आहेत. उर्वरित जिल्हा मंद उताराचा असून अधूनमधून डोंगररांगा व टेकड्या आहेत. प्राकृतिक रचनेनुसार जिल्ह्याचे मूल-चिमूर टेकड्यांचा प्रदेश, वर्धा-वैनगंगा खोर्‍याचा प्रदेश व चांदूरगडचा डोंगराळ प्रदेश असे तीन विभाग पडतात.
लोकसख्या - (संदर्भ - जनगणना २००१)
क्र तपशील              संख्या
१ क्षेत्रफळ               ११,४४३ चौ. कि. मी.
२ लोकसंख्या एकूण २०,७१,१०१
२.१ पुरुष                  १०,६२,९९३
२.२ स्त्रिया                १०,०८,१०८
२.३ ग्रामीण             १४,०६,०३४
२.४ शहरी                ६,६५,०६७
३ स्त्री- पुरुष गुणोत्तर   १०००:९४८
४ साक्षरता एकूण      ७३.१७%
४.१ पुरुष                     ८२.९४ %
४.२ स्त्री                        ६२.८९ %
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी जमातींची आहे. त्यामुळे हा जिल्हा ‘आदिवासी जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. येथील दाट जंगलांच्या व डोंगराळ भागात कोळंब (कोलाम) जमातीचे लोक  रहातात. परधान या जमातीचे लोकही काही प्रमाणात येथे आढळतात. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या ‘माडिया गोंड’ या आदिवासी
जमातीचे लोकही या जिल्ह्यात आढळतात

वनक्षेत्र -
चंद्रपूर जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक
भाग जंगलांनी व्यापला आहे. वनांचा विचार करता गडचिरोली व नंदुरबार या
जिल्ह्यांनंतर चंद्रपूर हा राज्यात तिसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा जिल्हा ठरतो. विविध प्रकारच्या वन उत्पादनांनी समृद्ध असा हा जिल्हा आहे. उत्तम प्रकारचे सागवान, तेंदूची पाने, बांबू, मोहाची फुले ही येथील प्रमुख वनउत्पादने आहेत. चिरोल आणि नवेगाव टेकड्यांवर असलेला परिसर आलापल्ली अरण्य’ म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे.

समृद्ध खनिजसंपत्ती -
महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो. राज्यातील तांब्याचे सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहेत. वर्धा खोरे दगडी कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. चंद्रपूर तालुक्यात घुगुस व बल्लारपूर; राजुरा तालुक्यात साष्टी; भद्रावती तालुक्यात माजरी आणि वरोरा येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. चिमूर तालुक्यात पिंपळगाव, भिसी, व असोला (गुंजेवाही) येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहार डोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत. जिल्ह्यात मुख्यतः वरोरा तालुक्यात चुनखडक सापडतो. तसेच राजुरा तालुक्यातही बर्‍याच भागांत चुनखडकाचे पट्टे आहेत. तसेच ग्रॅनाइट, वालुकाश्म, जांभा यांसारखी खनिजे व खडकही जिल्ह्यातील काही भागांत आढळतात.

प्रमुख नद्या, धरणे आणि तलाव -
बारमाही पाणी असलेली वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. पुढे ही नदी पैनगंगा व वैनगंगा या दोन नद्यांना जाऊन मिळते. इरई ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर मूल ही वैनगंगेची महत्त्वाची उपनदी आहे. राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत. चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई नदीकाठी वसले आहे. जिल्ह्यात मोठी धरणे फारशी नाहीत. सिंदेवाही तालुक्यात असोलमेंढा येथे, नागभीड तालुक्यात नळेश्वर व घोडेझरी येथे तसेच राजुरा तालुक्यात अमलनाला येथे काही धरणे आहेत.  महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो. या जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा असोला  तलाव  आहे. तसेच घोडेझरी तलावही आहेत.

प्रशासन
चंद्रपूर तालुक्यातील १४+१ तालुक्यांची सूची पुढे दिली आहे.
क्र तालुका क्षेत्रफळ (चौ. कि. मी.) लोकसंख्या
१ वरोरा ८८९.६ १६५,८४३
२ चिमुर ९५७.० १५६.७७२
३ नागभिर ५१८.० १२४,४२५
४ ब्रह्मपुरी ५९३.९ १५३,४८६
५ सावली ४९४.० १०४,६८६
६ सिंदेवाही ३७४.० १०६,२७५
७ भद्रावती ७८४.० १५६,९९५
८ चंद्रपूर ५७६.० ४४०,८९७
९ मूल ४८६.२ ११०,१०९
१० पोंभूर्णा २७२.० ४७,९०६
११ बल्लारपूर २०९.५ १३३.७२२
१२ कोरपना ८२९.१ १४३,२१०
१३ राजुरा १,०७७.८ १५२,२१६
१४ गोंडपिंपरी ४४३.० ७४,५५९
मे, २००२ मध्ये जिवती हा तालुका अस्तित्वात आला आहे. सध्या चंद्रपूर जिल्हा १५ तालुक्यांचा मिळून बनला आहे.
--------------------------------------------------------------------------------

क्र तपशील संख्या नावे
१ नगरपालिका ७ चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी, वरोरा
२ जिल्हा परिषद १ चंद्रपूर
३ पंचायत समित्या १४ राजुरा, चंद्रपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, बल्लारपूर, कोरपना, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, सावली, गोंडपिंपरी, पोंभूर्णा एकूण १४७२ लोकवस्ती असलेल्या गावांपैकी ८४८ गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत.
--------------------------------------------------------------------------------
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ (२) :
१. चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, अर्णी हे विधानसभा मतदारसंघ मिळून चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे.
२. गडचिरोली - चिमूर - ब्रम्हपुरी व चिमुर चंद्रपूर हे दोन विधानसभा
मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघ (६) : राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा असे आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे ५७ मतदारसंघ असून पंचायत समितीचे ११४मतदारसंघ आहेत.
--------------------------------------------------------------------------------
शेती
जिल्ह्याचे ‘भात’ हे प्रमुख पीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्‍यात कापूस पिकवला जातो. याशिवाय तीळाची लागवडही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण हे १२१४ मि.मी. इतके आहे.
उद्योग :
चंद्रपूर औष्णिक केंद्र (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन -CSTPS) हे देशातील सर्वांत मोठे केंद्र आहे. याची उर्जा निर्मितीची क्षमता २३४० मेगावॅट इतकी आहे. राज्यातील २५% उर्जेचे उत्पादन येथे होते. ग्रीनटेक पारितोषिक मिळवणारे हे देशातील पहिले केंद्र आहे. जगातल्या १०० सर्वात मोठ्या कागद उत्पादन करणार्‍या कारखान्यांपैकी एक
भारतातील सर्वात मोठा असा बल्लारपूर इंडस्ट्रीज (बील्ट) या नावाने ओळखला जाणारा कागद कारखाना याच जिल्ह्यात आहे. सिमेंट उद्योगासाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध असून, हा राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे येथे दगडी कोळशाच्या आधारे औष्णिक विद्युत निर्माण करतात. चंद्रपूर व  भद्रावती येथे चिनी भांडी तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. याचबरोबर भद्रावती येथे युद्धनिर्मिती साहित्याचा कारखाना आहे. भातगिरण्या हा देखील जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. नागभीड व सावली येथे कोशाच्या कापडाचा उद्योग विकसित होतो आहे येथील सुरया देखील प्रसिद्ध आहेत. तसेच नागभीड तालुक्यातील विसापूर येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे. राज्यातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे प्रस्तावित आहे. वरोरा येथे पी. व्ही. सी. पाईप व रेफ्रीजरेटर (फ्रीज) यांची निर्मिती केली जाते. याशिवाय जिल्ह्यात चंद्रपूर, घुगुस व मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत.
-------------------------------------------------------------------------------
दळणवळण
नागभीड, तडळी व मांजरी ही जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
चंद्रपूरचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई ९५०
नागपूर १५२
औरंगाबाद ५३२
रत्नागिरी ९६८
पुणे ७५८
-------------------------------------------------------------------------------
पर्यटन
ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) - ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. हे वाघ संरक्षित क्षेत्र आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत. तसेच वाघ, सांबर, नीलगाय, गवा, अस्वल, चितळ, भेकर असे अनेक वन्यप्राणी आहेत. याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे व उत्तम मगरपालन केंद्र आहे. येथील ताडोबा सरोवराचा परिसर अतिशय रमणीय आहे. संध्याकाळी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येथे येतात. या सरोवराशिवाय अनेक लहान-लहान पाणवठे येथे आहेत. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे. संग्रहालयात अस्वल, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचे सांगाडे आहेत. पक्ष्यांनी विणलेली सुंदर घरटी ठेवलेली आहेत.
अनेक पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे येथे आहेत. पाखरे व वन्यप्राणी यांचा मुक्त संचार असलेले आणि हिरव्या झाडांच्या सौंदर्याने बहरलेले हे ताडोबाचे उद्यान स्थानिक पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचेही आकर्षण ठरले आहे.
चंद्रपूर - एक ऐतिहासिक शहर अशी चंद्रपूर शहराची ओळख करून देता येईल. येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली व  अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.
नागभीड - नागभीडजवळील सर्व परिसर अतिशय निसर्गसमृद्ध आहे. येथील सातबहिनी, मुक्ताबाई व महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे.  बल्लारपूर - गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. किल्ल्यातील राणीमहाल हा प्रेक्षणीय मानला जातो. भद्रावती - येथील भद्रनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.  सोमनाथ - सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथे महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेप्रणीत प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.
सामाजिक / विविध
राजुरा व गोंडपिंपरी, मूल व चंद्रपूर या तालुक्यांच्या काही भागांत महाराष्ट्र राज्य शासनाची ‘विशेष कृती योजना’ कार्यान्वित केली आहे. ही  योजना राबवताना जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, तेथील जीवनपद्धती, आर्थिक व सामाजिक मागासलेपण या बाबींचा प्रकर्षाने विचार केला आहे. जिल्ह्यातील नक्षलवादाचा प्रभाव वाढत असताना आर्थिक व सामाजिक न्यायाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या मार्गाने उत्तर देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न म्हणून या योजनेकडे पाहता येईल.
मार्च-एप्रिल च्या काळात चंद्रपूर येथे महाकाली मंदिराची यात्रा प्रसिद्ध आहे. घोडा जत्रा ही बालाजी मंदिराची जत्रा चिमूर येथे जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भरते.
वरोरा येथील आनंदवन - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे सेवाकार्य गेली ५७ वर्षे चालू आहे. बाबा आमट्यांनी जून १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदवन’ ह्या प्रकल्पाची स्थापना केली. आणि आता या कार्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि सून डॉ.भारती आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या आदर्श सेवाकार्याची जागतिक  पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते.

शिक्षण:
चंद्रपूर जिल्हा नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. जिल्ह्यामधे सुमारे ६१ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यात ‘सिंदेवाही’ येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालविले जाते.
चंद्रपूर येथे सेंट्रल फॉरेस्ट रेंजर्स महाविद्यालय कार्यरत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयात वनउत्पादने (लाकूड वगळता), वन संरक्षण, वन-धोरण, वन्य प्राण्यांचे जीवन व वन व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अलीकडच्या काळात महिलाही येथे प्रशिक्षण घेऊन वनाधिकारी बनत आहेत.
--------------------------------------------------------------------------------
विशेष व्यक्ती
दादासाहेब कन्नमवार - यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९२० पासून ते स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. तसेच जून, १९४८ साली ते नागपूर प्रदेशाचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जुन्या मध्य प्रदेशात १९५२ मध्ये त्यांची आरोग्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० साली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली आणि नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला.
आमटे कुटुंबीयांची (बाबा, डॉ. विकास, डॉ. भारती) कर्मभूमी असे या जिल्ह्याला म्हणता येईल. सामाजिक सेवा प्रकल्प उभे करून आमटे परिवाराने (विशेषत: बाबांनी) चंद्रपूरचे नाव जगाच्या नकाशावर ठळक केले.

चंद्रपूर हा विदर्भामधील एक जिल्हा आहे. पूर्वी चांदा म्हणूनही हा जिल्हा ओळखला जात असे. वर्धा नावाची नदी या जिल्ह्यामध्ये साधारण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. चंद्रपूरच्या दक्षिणेकडे बल्लारपूर स्टेशन आहे. तसेच बल्लारपूर गाडीमार्गानेही उत्तमपैकी जोडले गेले आहे.
चंद्रपूरकडून राजूरा अथवा अलापल्लीकडे जाणारा गाडीरस्ता बल्लारपूरमधून जातो. वर्धा नदीच्या काठावर वसलेले बल्लारपूर शहर कोळसा खाणीमुळेही प्रसिद्ध आहे. इतिहास प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर मधे वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे.
शहरामधील वस्तीच्या एका बाजुला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेश पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मुर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मुर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमाविसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करुन नवीन दगडी मुर्ती बसवली.
बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच सिंहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.
साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यामधील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगार्‍यामधे लुप्त झाला होता. तोही सध्या साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगार्‍यामधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमधे असून नदीकडे जाणार्‍या दरवाजात पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजुने तटबंदीची भक्कम बांधणी पहायला मिळते.
बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजुंना प्रवेश मार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा अशा वास्तू पहायला मिळतात.
बल्लारपूरचा किल्ला आदिया उर्फ अंड्या बल्लाळसिंह या गौड राजाने बांधला. त्याने शिरपूरवरुन आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.

Wednesday, December 01, 2010

Monday, November 22, 2010

"तो' बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर

"तो' बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 22, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: municipal employee, builder, leave, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - पालिकेत शिपाई पदावर कार्यरत कर्मचारी बिल्डर व्यवसाय करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित करताच पालिका प्रशासनात खळबळ माजली आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीपोटी सदर बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर असून, दक्षिणेतील कर्नाटक राज्यात फिरायला गेल्याची माहिती आहे.
चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर नगरपालिकेत जवळपास 200 हून जास्त शिपायांची नियुक्ती आहे. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश कर्मचारी काम न करताही वेतन घेत असल्याची धक्कादायक माहिती "सकाळ'ने प्रकाशित केली होती. शासनाने नेमून दिलेले काम न करता कर्मचाऱ्यांनी स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. केवळ पालिकेच्या हजेरीबुकावर स्वाक्षरी करून करून महिन्याचे मासिकवेतन उचलत असल्याची माहिती आहे. यातील काही लिपिक बिल्डर, बार व्यावसायिक किंवा अन्य उद्योगाचे मालक म्हणून काम करीत आहेत. यातीलच एक स्वच्छता झोनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याची काही वर्षांपूर्वी काम करीत नसल्याच्या तक्रारीवरून नगराध्यक्षांच्या कक्षात बदली करण्यात आली. तिथेही या शिपायाने पदाधिकाऱ्यांना लालूस देऊन वैयक्तिक उद्योग सुरू केलेत. सदर कर्मचारी सकाळी दहाला वेळेवर पालिकेत येतो. हजेरीबुकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचा पत्ताच नसतो. दिवसभरात बांधकाम बिल्डर आणि आपले व्यवसाय सांभाळत आहे. ही बाब अनेकांना ठाऊक आहे. मात्र, ठरलेली रक्कम वेळीच आणि नियमित मिळत असल्याने अनेकांनी चुप्पी धारण केली आहे. याच व्यवसायातून बंगला आणि आलिशान कारने त्याचा घर ते पालिका असा प्रवास सुरू आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी नवीन असल्याने कारवाईच्या भीतीपोटी सदर कर्मचाऱ्याने 15 दिवसांची रजा घेतली आहे. आपण तो नव्हेच, असे दाखवून देण्यासाठी कर्मचारी खटाटोप करीत आहे. दरम्यान, विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बिल्डर शिपायाने हजेरी बुकावर दुसऱ्याच्या हाताने हजेरी लावली आहे. याचाच अर्थ हा कर्मचारी पालिकेत येतच नाही, असे स्पष्ट होते. याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचारी एलआयसी, विविध खासगी विमा कंपन्या, नेटवर्क मार्केटिंग, प्लॉटविक्री, बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करतात. पालिकेत काम नसल्यामुळेच त्यांचे हे फावल्या वेळेतील उद्योग सुरू असल्याचे बोलले जाते. 15 वर्षांपूर्वी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत एका पदाधिकाऱ्याला पालिकेने एक शिपाई नियुक्त केला होता. तो आजही तत्कालीन नगराध्यक्षांच्या घरी काम करीत आहे.

Saturday, November 20, 2010

'फोर्ब्ज'च्या यादीत दादाजी खोब्रागडे

'फोर्ब्ज'च्या यादीत दादाजी खोब्रागडे

Agrowon- Main Page....
Thursday, November 18, 2010 AT 12:00 AM (IST)


देवनाथ गंडाटे
चंद्रपूर : गेल्या चार दशकांत केवळ दीड एकर शेतीत विविध प्रयोग करून ख्यातनाम "एचएमटी'सह भाताची (धान) नऊ वाण विकसित करणाऱ्या 72 वर्षीय दादाजी खोब्रागडे या अल्पभूधारक शेतकऱ्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. दरवर्षी "फोर्ब्ज' मासिकातर्फे जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत श्री. खोब्रागडे यांच्यासह सात भारतीय शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्‍यातील नांदेड येथील दादाजी खोब्रागडे मूळचे रहिवासी. अल्पभूधारक असलेल्या दादाजींनी आपल्या शेतात नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने प्रयोग सुरू केले. 1983मध्ये त्यांनी अत्यंत बारीक आकाराचे आणि खाण्यास चवदार असे भाताचे वाण शोधण्यास सुरवात केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांनाही पीक घेण्यास सांगितले. त्यावर कुणी विश्‍वास ठेवला नाही; मात्र गावातील भीमराव शिंदे या शेतकऱ्याने या वाणाची पेरणी केली आणि पहिल्याच वर्षी 90 क्विंटल भाताचे उत्पादन निघाले. या यशस्वी प्रयोगाने मग एकामागून एक शेतकरी पुढे येऊ लागले. पहिल्या हंगामात निघालेले धान तळोधी येथील बाजार समितीत नेण्यात आले. तेव्हा या धानाचे नावही कुणाला ठाऊक नव्हते. कुणाच्या तरी मनगटावर असलेले घड्याळ बघून "एचएमटी' हे नाव देण्यात आले. तेव्हापासून पंचक्रोशीतील "एचएमटी' संपूर्ण जिल्ह्यात गेले. आज सुमारे पाच राज्यांमध्ये एक लाख एकरावर "एचएमटी'ची लागवड होऊ लागली आहे.


दादाजींच्या या प्रयोगाची पहिली दखल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही येथील कृषी संशोधन केंद्राने घेतली. 1994मध्ये हे वाण तज्ज्ञांनी अभ्यासासाठी घेतले; मात्र चार वर्षांनी याच केंद्राने हे वाण "पीकेव्ही' नावाने बाजारात आणले. तेव्हापासून दादाजींनी शासकीय यंत्रणेसोबत लढा सुरू केला. यानंतर दादाजींनी "विजय नांदेड', "नांदेड 92', "नांदेड हिरा', "डीआरके', "नांदेड चेन्नूर', "नांदेड दीपक', "काटे एचएमटी' आणि "सुगंधी' हे नऊ वाण विकसित केले आहेत. या कामासाठी दादाजींना 12 पुरस्कार मिळाले असून, राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील संस्थेतर्फे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या हस्ते दादाजींना पुरस्कार देऊन गौरविले. आज अमेरिकेतील फोर्ब्ज मासिकाने दखल घेतल्याने दादाजींसह ग्रामीण शेतकऱ्यांची मान उंचावली आहे.
कृषी क्षेत्रात जगाच्या पातळीवर नाव कमावलेले दादाजी एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. मध्यंतरी मुलाच्या आजारपणामुळे काही शेतीही विकावी लागली. मुले मजुरी करून पोट भरतात. त्यामुळे "हातावर आणून पानावर खाणे' अशी स्थिती दादाजींची आहे.

फोर्ब्जच्या यादीतील इतर भारतीय ग्रामीण उद्योजक

मनसुखभाई जगानी ः दुचाकी ट्रॅक्‍टरची निर्मिती. सुमारे 16,000 रुपये इतकी या ट्रॅक्‍टरची किंमत आहे. अर्ध्या तासामध्ये दोन लिटर पेट्रोल खर्च करून या ट्रॅक्‍टरद्वारे एक एकराचे क्षेत्र नांगरता येते.



मनसुखभाई पटेल ः मूळचे शेतकरी असलेले मनसुखभाई पटेल यांनी कापूस बोंडे वेचण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. यामुळे मानवी श्रम कमी करणे शक्‍य झाले आहे.



मनसुखभाई प्रजापती ः मनसुखभाई प्रजापती हे व्यवसायाने कुंभार आहेत. त्यांनी मातीचा तवा आणि मातीचा फ्रिज विकसित केला आहे. मातीच्या तव्याची किंमत 100 रुपये आहे. मातीचा फ्रिज चालवण्यासाठी विजेची गरज लागत नाही.



मदनलाल कुमावत ः केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले श्री. कुमावत यांनी बहुमळणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे विविध धान्यपिकांची मळणी करता येते, धान्याला आपोआप वारा देऊन ते पोत्यांमध्ये भरणे शक्‍य होते.



किशोर बियाणी ः भारतातील "सॅम वॉल्टन' म्हणून ओळखले जाणारे आणि "फ्युचर' समूहाचे चेअरमन असलेले किशोर बियाणी यांचाही या यादीत समावेश आहे. त्यांनी 25 शहरांमध्ये "बिग बझार' मॉलची साखळी उभारली आहे. याद्वारे अन्नधान्यासह शेतीमालाच्या विक्रीला "मॉल'च्या माध्यमातून नवा आयाम दिला आहे.



अंशू गुप्ता ः आपल्या व्यवसायाला सामाजिक अधिष्ठान देऊन श्रीमतांच्या घरांतून वापरात न असलेले कपडे गरिबांपर्यंत पोचवण्याचे काम "गूंज' या संस्थेच्या माध्यमातून श्री. गुप्ता यांनी चालवले आहे. याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच आहे. पण दर महिन्याला 30 टन वजनाचे कपडे गोळा करून ते गरिबांपर्यंत पोचविले जाते.



केतन पटेल ः ट्रॉयका फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक असलेले श्री. पटेल यांनी जगातील पहिले वेदनारहित आयक्‍लोफेनॅक इंजेक्‍शन विकसित केले आहे. या इंजेक्‍शनमुळे रुग्णाची वेदना कमी केली जाते, तसेच सूजही कमी करता येते.



चिंतनकिंडी मल्लेश्‍याम ः श्री. मल्लेश्‍याम यांनी "लक्ष्मी आसू' यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे हातमागाद्वारे होणाऱ्या वस्त्रनिर्मिती क्षेत्रात नवी क्रांती आली आहे. या यंत्राद्वारे दिवसात सहा साड्या तयार करता येतील इतक्‍या स्वरूपाचा धागा तयार करता येतो. या यंत्रामुळे मानवी श्रम कमी करणे शक्‍य झाले आहे.


http://www.agrowon.com/

Wednesday, November 17, 2010

झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये मोहन जोशी, कुलदीप पवार

झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये मोहन जोशी, कुलदीप पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: drama, entertainment, chandrapur

चंद्रपूर - दिवाळीपासून एप्रिल महिन्यापर्यंत झाडीपट्टीत चालणाऱ्या नाट्यप्रयोगांना सुरवात झाली असून, बुकिंगसाठी नाट्यकंपन्या आणि आयोजक नाट्यमंडळांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यंदा झाडीपट्टीच्या नाटकात चित्रपट अभिनेते मोहन जोशी आणि कुलदीप पवार दाखल झाले आहेत.
झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात नाटकांचे आयोजन केले जाते. भंडारा-गोंदियात मंडई किंवा यात्रेनिमित्त, तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शंकरपटांनिमित्त नाटके होतात. गावातील स्थानिक नाट्यमंडळे या नाटकांचे आयोजन करीत असतात. तारीख आणि योग्य नाटक मिळविण्याठी आयोजक मंडळे नाट्यकंपन्यांशी संपर्क साधत आहेत. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नवरगाव, वडसा-देसाईगंज आणि पाथरी येथे नाट्यकंपन्या कार्यरत आहेत. आजघडीला सर्वच कंपन्यांच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत. वडसा येथील राजसा नाट्य कंपनीच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या तारखा हाऊसफुल्ल असून, जानेवारी आणि फेब्रुवारीची बुकिंग सुरू असल्याचे नाट्यकलावंत हिरालाल पेंटर यांनी सांगितले. यंदा खरीप पिकात भरघोस उत्पन्न मिळाले असल्याने नाट्यव्यवसाय जोरात आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाच्या तारखा बिझी असल्याचे लोकजागृती रंगभूमीचे प्रमुख कलावंत अनिरुद्ध वनकर म्हणाले. मागील वर्षी गाजलेल्या काही नाटकांची यंदाही मागणी असून, काही नवीन नाटकांची भर पडली आहे. मागीलवर्षी नवरगाव येथील व्यंकटेश नाट्यमंडळाचे "आत्महत्या' हे नाटक गाजले होते. प्रसिद्ध नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांच्या दिग्दर्शनातून यंदा "नवरे झाले बावरे' हा नाट्यप्रयोग सुरू आहे. यशकुमार निकोडे लिखित भानामती, अहंकार, भोवरा या नाटकांनाही चांगली मागणी आहे. त्यांची नाटके चंद्रकमल थिटअर्सद्वारे प्रदर्शित केली जातात. चंद्रकमलने विनाश, काही क्षणाचे सौभाग्य आणि स्पर्श या नाटकांचे यशस्वी प्रयोग केले आहेत. शिवराज नाट्यमंडळाचे गरिबी, संघर्ष तर लोकजागृती रंगभूमीतर्फे घायाळ पाखरा, राजसातर्फे राया गेली वाया, लिलाव, सून सांभाळा पाटलीन बाई आणि अनिल नाकतोडे यांच्या मंडळात झुंज एका वादळाची आदी नाटकांचा समावेश आहे. ही सर्व नाटके स्थानिक नाट्यलेखकांचीच असून, कलावंतही याच मातीतील आहे. महिला कलावंत म्हणून पुणे, मुंबई आणि नागपूर येथील कलावंतांचा समावेश आहे. यंदाही नाटकांची बुकिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या प्रचारासाठी पत्रके, बॅनरची छपाई सुरू असल्याचे मुद्रणालयाचे संचालक केशव कावळे यांनी सांगितले.

Thursday, November 11, 2010

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे


 यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
                                         शंकरराव चव्हाण

                                        वसंतदादा पाटील




 शरद पवार



 सुशील कुमार शिंदे
 विलासराव देशमुख
अशोक चव्हाण
मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार नारायण राणे


 
मनोहर जोशी

Wednesday, November 10, 2010

पृथ्वीराज चव्हाण यांचा अल्पपरिचय

पृथ्वीराज चव्हाण यांचा अल्पपरिचय

नाव - पृथ्वीराज चव्हाण

वडिलांचे नाव - आनंदराव चव्हाण

आईचे नाव - श्रीमती प्रेमलाताई चव्हाण

जन्मतारीख - 17 मार्च 1946

जन्मठिकाण - इंदोर (मध्यप्रदेश)

पत्नीचे नाव - श्रीमती सत्त्वशीला

मुले - एक मुलगा, एक मुलगी

कायमचा पत्ता - पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड. जि. सातारा (महाराष्ट्र), 415410.

सध्याचा पत्ता - 11, रेस कोर्स रोड, नवी दिल्ली 110001.


शिक्षण - कऱ्हाड नगरपालिका शाळा क्रमांक सातमध्ये सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली येथे, त्यानंतर बी. ई. (ऑनर्स), एम. एस. (बीआयटीएस) पिलानी (राजस्थान) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (अमेरिका).

व्यवसाय - इंजिनिअर, टेक्‍नॉलॉजिस्ट



कारकीर्द

1991-1995, 1995-1998 - लोकसभा सदस्य, सायन्स व टेक्‍नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य

1992-93 - इलेक्‍ट्रॉनिक ऍटोमिक एनर्जीचे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य

1994-1996 - सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वनखात्याच्या मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य

1995-96 - अर्थ आणि नियोजन मंत्रालयातील स्थायी समितीचे सदस्य, ग्रामीण आणि शहरी भाग मंत्रालयातील रचनात्मक विकास समितीचे सल्लागार सदस्य, सार्वजनिक विकास क्षेत्रातील समितीचे सल्लागार सदस्य, कनिष्ठ कायदा मंडळाचे विशेष निमंत्रीत, व्यवसाय मार्गदर्शन समितीचे सदस्य

1996-99 - कॉंग्रेसचे सचिव, संगणक पुरवठा समिती सदस्य

1997 - विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मूलभूत विकासासह त्याच्या धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे सल्लागार सदस्य

1998-99 - राज्यसभा सदस्य. केंद्रीय गृहखात्याच्या विविध धोरणांच्या समितीचे सदस्य, 1998-99 व एप्रिल 2002 ते फेब्रुवारी 2004 ः अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य. 2000-2001 - कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते.

एप्रिल 2002 - राज्यसभा सदस्य

ऑगस्ट 2002 ते फेब्रुवारी 2004 - संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य

मे 2004 ते 22 मे 2009 व 28 मे 2009 ते आजपर्यंत - पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री



क्रीडा व अन्य क्षेत्र -

सदस्य- इंडियन इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली, इंडियन हॅबीटॅट सेंटर नवी दिल्ली, जिमखाना क्‍लब नवी दिल्ली

परदेश दौरे - अमेरिका, फ्रान्स, जपान, इंग्लंड, पाकिस्तान, बांगला देश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमन, बहामास, चीन, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, इटली, मलेशिया, नेदरलॅंड, पनामा, पोतुर्गाल, सिंगापूर, स्विर्त्झलॅंड, तजाकीस्तान, थायलंड.



पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असलेली सध्याची खाती -

* पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री

* विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

* भूविकास शास्त्र विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

* पर्सोनेल पब्लिक ग्रॅव्हन्सी ऍण्ड पेन्शन विभागाचे राज्यमंत्री

* संसदीय कार्यालयीन मंत्री

 
पृथ्वीराज चव्हाण -


अभ्यासू, देशपातळीवर काम केलेला नेता अशी प्रतिमा.

निर्विवाद निष्ठावान घराणे.

वडील दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण हे पंडित नेहरूंपासून 11 वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात.

आई प्रेमलाकाकी चव्हाण खासदार.

1991, 96 आणि 98 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी.

2002 पासून आजपर्यंत राज्यसभा सदस्य.

2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री.

2009 पासून केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान कार्यालयाबरोबरच विज्ञान तंत्रज्ञान, संसदीय कार्य, कार्मिक आदी खात्यांचे राज्यमंत्री.

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस.

हरियाना आणि जम्मू-काश्‍मीर राज्याचे प्रभारी.