সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, September 09, 2014

विकासाच्या प्रतीक्षेत मौदा

विकासाच्या प्रतीक्षेत मौदा

अखंड वाहणाऱ्या कन्हान नदीच्या किनाऱ्यावर वसलेले मौदा गाव. चक्रधरस्वामींचे मंदिर आणि महान त्यागी जुमदेवजी यांच्या आश्रमामुळे गावाला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. चक्रधरस्वामींचे मंदिर 700 ते 750 वर्षांपूर्वीचे असून, स्वामींनी यास्थळी रात्रभर मुक्काम केल्याची आख्यायिका आहे. येथे दरवर्षी वसंत पंचमीला यात्रा भरते. बाबा जुमदेवजी यांचे परमात्मा एक सेवक आश्रम येथे असून, ते 15 वर्षांपूर्वी स्थापन झाले. भव्यदिव्य आश्रमात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक येतात. आता महाऔष्णिक वीजकेंद्रामुळे मौद्याला नवी ओळख प्राप्त झाली असून, ग्रामपंचायतीच्या या गावाला यंदापासून नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे विकासाचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा नगरवासींना आहे.
अधिकाऱ्यांअभावी पंचाईत
19 जून 2013 रोजी मौदा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यात आले. स्थापनेला 14 महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप येथे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता हे अतिरिक्त कारभार सांभाळत आहेत. पूर्णकालीन मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, सहायक लेखाधिकारी, करनिरीक्षक यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. येथे अधिकारीच नसल्याने शहराचा विकास आराखडा, कामाचे नियोजन, मूलभूत सोयीसुविधा पुरविणे, शासनाकडे योजनेचे प्रारूप तयार करून पाठविणे, कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा मागविणे, बांधकामाची मंजुरी देणे आदी कामे करणारे अधिकारीच नसल्याने विकासकामे रखडली आहेत. नगरपंचायत घोषित होऊनही विकासात काहीही फायदा झाला नाही. सध्या कार्यरत मुख्याधिकारी श्री. मेश्राम आठवड्यातून एक-दोनदाच येथे येतात. बांधकाम अभियंत्याची नियुक्ती अलीकडेच झाली असून, ते रामटेक नगर परिषदेत पूर्णवेळ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. अतिरिक्त कार्यभार असलेला अधिकारी नगरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास अयशस्वी ठरत आहेत.

गॅस सिलिंडरसाठी भटकंती
तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या मौदा नगरात नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी कामठी, कुही, नागपूर, पेट्रोलपंप (ठाणा) भंडारा या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. विद्युत प्रकल्प, रिलायन्स, हिंडाल्को, विसाका यांसारख्या नामांकित कंपन्या परिसरात असून, भविष्यात औद्योगिकीकरण शक्‍य असल्याने महामार्ग क्रमांक सहावरील मौदा नगरात गॅस एजन्सी असू नये, हे येथील राजकारण्यांचे अपयश असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले. एचपी गॅस वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. इतर ठिकाणाहून गॅस सिलिंडर आणताना नागरिकांना कष्ट करावे लागतात. यातून सुटका करण्याची मागणी त्रस्त जनतेने केली.
.....
रस्त्यांची समस्या
नगरामध्ये अनेक अनधिकृत ले-आउट्‌स आहेत. बरेच जण अतिक्रमण करून कसेबसे जीवन जगत आहेत. शेतीच्या जमिनीवर ले-आउट पाडून जमीनमालकांनी भूखंड विक्री केली. परंतु, मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक प्रभागांमध्ये रस्त्यांची अवस्था वाईट आहे. नागरिकांना घर गाठण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. साईनगर, कालीमातानगर, फंदी ले-आउट, लापका रोडवरील ले-आउट, शिवनगर, अर्जुननगर, डागा ले-आउट झोपडपट्टीमध्ये रस्त्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. अनेक प्रभागांमधील रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आला. परंतु, त्यावरून रोलर न फिरविल्याने नागरिकांना झटके खात घरापर्यंत जावे लागते. खराब रस्त्यांमुळे पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. नगरपंचायत असूनही रस्त्या बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नगरपंचायतीचे सदस्य आपापल्या कामात व्यस्त असून, नगराच्या विकासाकडे कुणाचेही लक्ष नाही.
......
दुकान गाळे हवे
नगरात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्यवसाय करण्यासाठी दुकान विकत घेणे किंवा भाड्यासाठी मोठी पगडी देण्यासाठी अनेक जण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे अनेक जण मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय थाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नगरातील जयस्तंभापासून बस स्टॅण्ड, जुना नॅशनल हायवे, तहसील कार्यालय परिसरात अनेकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. काहींनी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे या ठिकाणी अपघातही नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे कमी वर्दळीच्या रस्त्यांवर प्रत्येकाला सारखे गाळे देऊन अतिक्रमणधारकांचे स्थायी पुनर्वसन करता येऊ शकते. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही होणार नाही. अतिक्रमणधारकांना स्थायी दुकान मिळाल्यास त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर होईल.
---
सिमेंट रस्त्याची दुरवस्था
देखभाल व दुरुस्तीवर खर्च नाहीसा करण्यासाठी शासनाने सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची योजना आखली. नगरामध्ये अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते बांधण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभाग मौदा यांच्याकडून सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. काही अंदाजपत्रकांत सिमेंट रस्त्याच्या बांधकामात लोखंडी सळाखीचा समावेश करण्यात आला असून, प्रत्यक्षात बांधकाम करताना सळाखीचा वापर करण्यात आलेला नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असून, सिमेंट रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाला आहे.
-----------

वाढते प्रदूषण
मौदा नगर प्रदूषणाचा केंद्रबिंदू होत आहे. एकीकडे एनटीपीसीचा प्रकल्प, तर दुसरीकडे नगरातील अधिकांश शेतीची जमीन ले-आउटखाली आल्याने सिमेंटचे जंगल होण्याच्या मार्गावर आहे. परिसरात कार्यरत रिलायन्स व हिंडाल्को कंपनीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. याशिवाय रस्त्यावरील धुळीच्या कणामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाकातोंडात धूळ जात असल्याने आजार बळावले आहेत.
--------------
नगरामध्ये अंधाराचे साम्राज्य
नगरातील शिवनगर श्रीनगर, डागा ले-आउट, रामटेक रोड, भंडारा रोड, शिवाजीनगर, भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असून, नगरपंचायतीकडून दुरुस्तीचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. नगरात 500 च्या वर पथदिवे आहेत. त्यापैकी कित्येक बंद पडले आहेत. बसस्थानक व तहसील कार्यालय परिसरातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका असतो. नगरपंचायतीने अशाच मंदगतीने पथदिवे दुरुस्त करण्याचे काम चालू ठेवल्यास नगरात अंधाराचे साम्राज्य कायम राहील.
------
भूखंड घोटाळा
अनधिकृत अभिन्यासचे जाळे निर्माण होऊ नये, यासाठी एक जानेवारी 2008 रोजी महाराष्ट्र शासनाने नगररचना विभागाकडून अंतिम नकाशा मंजुरी प्राप्त झाल्यानंतर भूखंड विक्री करण्याची मुभा दिली आहे. नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर असल्याशिवाय अकृषक आदेश देण्यात येऊ नये, असे या आदेशात नमूद आहे. मौदा नगरातील खडीवाला हॉटेलजवळील ले-आउट, न्यू कालीमाता नगर, दिशांत नगर, न्यू शिवनगर, ले-आउट नगररचना विभागाकडून मंजूर असून, मौदा येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वत: तयार केलेले नकाशाप्रमाणे सातबारा बनवून अभिन्यासातील खुली जागा विकण्याचा घोटाळा या ले-आउटधारकांनी केला. गोरगरीब दलित आदिवासी जनतेने एकेक पैसा जमा करून कष्टाची रक्कम जमा करून प्लॅट खरेदी केले. भविष्यात नगररचना नकाशाप्रमाणे अशा कष्टकरी व्यक्तीचा प्लॉट खुल्या जागेमध्ये निघाल्यास त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. भूखंड घोटाळा करून धंदा करणारे गब्बर बनत आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
--------------
वस्तीतील दारूमुळे महिला त्रस्त
नगरातील वस्तीभागात दारू दुकाने असल्याने मद्यपींची संख्या वाढली असून, आणखी नवे परवाने दिले जात असल्याने दुकाने वाढली आहेत. अशा व्यवसायांना विरोध केल्यास विक्रेत्यांकडून नागरिकांना त्रास देण्यात येतो. मोठ्या हिमतीने एखाद्याने तक्रार दिल्यास प्रशासन त्याची दखल घेत नाही. दारू दुकानांसमोर वाहनतळ नसल्याने मद्यपींची वाहने भररस्त्यात उभी असतात. बिअरबारमध्ये मुत्रीघराची सुविधा नाही. त्यामुळे अनेक मद्यपी रस्त्याच्या कडेला उभे राहतात. त्यामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
----
फोटो क्र. 11
झोपडपट्टीवासींना हवे पुनर्वसन
नगरात अनेक नागरिक व्यवसाय, नोकरीच्या शोधार्थ येऊन येथेच स्थायिक झाले. यामध्ये अर्थिक दुर्बल, दलित आदिवासी नागरिकांचा समावेश आहे. नगरातील भूखंडाची किंमत देणे शक्‍य नसल्याने मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून स्वत:चा आशियाना थाटला. कन्हान नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे नागरिकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे या गरीब जनतेची जीवित, वित्त हानी नेहमी होते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थायी पुनर्वसन करून मालकी हक्‍काचे पट्टे देण्याची जनतेची मागणी आहे. नदीकाठावरील परिसरात झाडेझुडपे असल्याने साप, डुक्‍कर, रानडुक्‍कर तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झोपडपट्टीतील रहिवाशांना नेहमी धोका असतो. नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचे स्थायी पुनर्वसन करण्याची येथील नागरिकांची मागणी आहे. याकडे प्रशासन तसेच राजकीय नेत्यांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे.
.......
* फोटो : 8
गटारातील दुर्गंधी
नगरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील पाण्याची दुर्गंधी येत असून, साठलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन तहसील कार्यालयाजवळील गटारामध्ये बाराही महिने सांडपाणी साठून असते. यातून नगरपंचायतचा अस्वच्छ कारभार तालुक्‍याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना दिसत असतो. रस्त्याच्या सीडी वर्क्‍सच्या पाइप उंचीपेक्षा नाली खोल असल्याने येथील पाणी नेहमी साठून राहते. तहसील परिसरातील उपस्थित नागरिकांना या सांडपाण्याची दुर्गंधी सहन करावी लागते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
------------
फोटो : 13
निर्मल ग्रामचा फज्जा
मौदा येथे ग्रामपंचायत असताना निर्मल ग्रामचे पुरस्कार मिळाले होते. मात्र, नगरपंचायतीचा दर्जा आल्यानंतर गावात घाणीचे साम्राज्य परसले आहे. शासनाच्या निर्मल ग्राम योजनेनुसार हांगणदारीमुक्त गाव निर्मितीकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावाच्या सभोवताल उघड्यावरच अनेक नागरिक बसतात. गावात सर्वत्र डुकरांचे साम्राज्य असून, त्यामुळे दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे. डुकरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी चार-पाच वर्षांपूर्वी उपाययोजना करण्यात आली होती. नगर पंचायतीने त्यावर अंमल करण्याची गरज आहे. या प्राण्यांपासून संसर्गजन्य रोगांची शक्‍यता आहे.
------
फोटो : 6
बगीचेच नाही, फिरायचे कुठे?
गावात एकही बगीचा नसून, नागरिकांनी करमणुकीकरिता कुठे जावे, हा मोठा प्रश्‍न आहे. लक्ष्मीनगरातील गजानन मंदिराजवळील खुल्या जागेत लहान मुलांकरिता पूर्वी खेळण्यासाठी घसरगुंडी, झुला लावण्यात आला होता. परंतु, या मैदानातून आता ही साधने गहाळ झाली आहेत. नगरामध्ये नागरिकांच्या करमणुकीसाठी सुंदर बगीचा तयार करण्याची मागणी होत आहे. नगरातील काही भागात खुली जागा असून, त्यावर तारेचे कुंपण करण्यात आले आहे.
--------
फोटो : 4
रुग्णालय उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत
मौदा नगरातच नव्हे, तर संपूर्ण तालुक्‍यातील नागरिकांना आरोग्यसेवेकरिता नागपूर किंवा भंडारा शहराकडे धाव घ्यावी लागते. किरकोळ शस्त्रक्रिया वगळता मोठ्या उपचारासाठी रुग्णांना रेफर करावे लागत आहे. त्यामुळे वेळ जात असल्याने प्रसंगी रुग्णांना प्राण गमवावे लागते. त्याची दखल घेऊन येथील लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय शासनाने मंजूर केले. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

फोटो : 3
मटणविक्री उघड्यावरच
नगरातील मटणविक्रेत्यांना पावडदौना मार्गावरील दवाखान्याजवळील जागा देण्यात आली आहे. मात्र, येथे विक्रीनंतर शिल्लक टाकाऊ मांस फेकण्यात येत आहे. त्यांना स्थायी ओट्यांची आवश्‍यकता आहे. फेकलेल्या मांसामुळे वस्तीत दुर्गंधी पसरत आहे. या परिसरात नियमित सफाई ठेवून, त्यावर सफाई कामगार नियुक्त करण्याची गरज आहे.

फोटो /2
आठवडी बाजाराच्या जागेची समस्या
वर्षानुवर्षे दर शुक्रवारी मौदा येथे आठवडी बाजार भरतो. एनटीपीसीतील कार्यरत लोकांना रविवारी सुटी असल्याने गेल्या काही दिवसांपासून रविवारीदेखील बाजार भरत आहे. विक्रेत्यांसह ग्राहकांची संख्या वाढली. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी दुकाने थाटून व्यवसाय केला जातो. शुक्रवारी व रविवारी दर्ग्याजवळ असलेल्या बाजाराच्या ठिकाणापासून ते राधाकृष्ण सभागृहासमोरील गुजरीपर्यंत रस्त्यावर जवळपास एक किलोमीटर लांब बाजार भरतो. मुख्य बाजार परिसरातील गल्लीबोळात भाजीविक्रेते बसतात ते वेगळेच. बाजाराचे दोन दिवस वगळता इतर दिवशी गुजरीपासून ते जनता हायस्कूलपर्यंत रस्त्यावर भाजीविक्रेते दिसतात. याच मार्गाने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे अपघाताची शक्‍यता बळावली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी बाजाराचे स्थलांतर करून स्थायी रूप देण्याची गरज आहे.
----------
फोटो /7
अनधिकृत पार्किंग
नगरातील प्रमुख ठिकाण तहसील ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी असते. त्यामुळे अनधिकृत वाहनतळांना ऊत आले नाहे. विहार रेस्टॉरंट व अर्जुन बारसमोरील परिसरात वाहने अस्ताव्यस्त ठेवली जातात. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस
अडथळा निर्माण होत आहे. तहसील कार्यालयाची इमारत बांधताना वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली नाही. येथे वाहनांसाठी सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. बसस्थानक परिसरातील अनधिकृत पार्किंगकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन संभाव्य अपघातांना टाळणे आवश्‍यक आहे. बसस्थानकाजवळील चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकात वाहतूक शिपाई आवश्‍यक आहे.
-----------
क्रीडांगणाची दयनीय अवस्था
फोटो 10
मौदानगरात शासकीय जागेवर क्रीडांगणासाठी जागा देण्यात आली असून, येथील इमारतीचे बांधकाम 3-4 वर्षांपासून बंद आहे. मैदानाला कम्पाउंड करण्यात आले आहे. मैदानात मुलांना खेळण्यासाठी हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ खेळण्याकरिता गोल पोस्ट, पीच इत्यादी सुविधांचा अभाव आहे. सर्व पातळींवर खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून, मौदानगरीत सर्व सुविधायुक्‍त एक क्रीडांगण असू नये, ही दु:खाची बाब आहे. राजकारण बाजूला ठेवून येथील मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व सुविधायुक्‍त एक क्रीडांगण बनविणे आवश्‍यक आहे. तेथे सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास याच नगरीतून एखादा सचिन तेंडुलकर उदयास येऊ शकतो. क्रीडांगण परिसरात खेळण्यासाठी इतर साहित्य व रात्रीच्या वेळी मुलांना खेळता यावे, यासाठी लाइटची गरज आहे.
--------
-----------
प्रतिक्रिया

नगरविकास आराखडा तयार करणे, कर निर्धारण करणे, या बाबींवर काम सुरू आहे. नागरी दलित वस्ती, दलितेतर वस्ती ठरविण्यासाठी ठराव घेण्यात आला. रस्ता अनुदानांतर्गत 11 कामांची निविदा काढण्यात आली. स्मशानभूमी, इंदिरा आवास योजना, वीजखांबाची कामे करण्यात येतील.
- सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी

नगरपंचायतीमुळे गावविकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अवैध कामेच जास्त सुरू आहेत. गावात बिअरबार, देशी दारूच्या भट्ट्या आहेत. त्यामुळे महिलांना त्रास होतो. नियमबाह्य परवाने दिले जात आहेत.
- सरोज पंचबुद्धे

मौदा नगरात विविध समस्या आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, झोपडपट्टीवासींचे प्रश्‍न सोडविण्याची गरज आहे. एनटीपीसी प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी.
- नरेश मोटघरे

गावातील बहुतांश भागात अंधाराचे साम्राज्य आहे. नगरपंचायतीचा दर्जा मिळूनही ग्रामपंचायतीपेक्षा अल्पदर्जाची कामे सुरू आहेत. काही प्रभागांतील रस्त्यांवर मुरूम टाकल्यानंतर रोलर फिरविण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
- राजू इखार

आठ वर्षांपासून उल्लेखनीय कामे झाली नाहीत. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. सुविधा पुरविण्यात अपयश आले. बाजारात ओट्यांची समस्या, रस्ते, नाल्या नाहीत.
- संजय काळबांडे

गावात दिवसरात्र चोरीच्या घटना घडत आहेत. नागरिकांना सुरक्षित जीवन केव्हा मिळणार? गॅस सिलिंडरची समस्या आहे. ग्राहकांची गैरसोय होते.
- हरीश जैन

गावातून फेरफटका मारल्याने नगरपंचायतीपेक्षा ग्रामपंचायत बरी, असे वाटेल. आदिवासी, गरीब, झोपडपट्टीवासींना सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. कन्हान नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झोपडपट्टीचे प्राधान्याने पुनर्वसन होण्याची गरज आहे.
-सुखदेव मडके

पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाज खोळंबत आहे. विकासासाठी कुशल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे.
- क्रिष्णा धनजोडे
समस्या यांना सांगा...
खासदार कृपाल तुमाने : 9823288322
आमदार चंद्रशेखर बावनकुळे : 9049444444
नगराध्यक्ष उमेश गभणे : 9767942643
उपाध्यक्ष राजेश निनावे : 9860865784
उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर : 8600046520
तहसीलदार शिवराज पडोळे : 7798350538
पोलिस निरीक्षक गायगोले : 9822103830
मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम : 8806926752

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.