সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 21, 2014

कामठीला प्रगतीची अपेक्षा

कामठी विशेष पान

नागपूरचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहराची स्थापना अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. कन्हान नदीतीरावर असलेल्या विस्तीर्ण पठारावर इंग्रज सैनिक सरावासाठी येत असत. यादरम्यान, "चहा शिबिर' व्हायचे. त्याला "कॅम्प टी' असे म्हणत. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन गावाचे नाव "कामठी' असे पडले. इंग्रजांनी त्यांच्या सुविधेसासाठी कन्हान नदीच्या तीरावर वसाहत बनविली. आता नदीच्या दोन्ही बाजूंनी वस्ती असून, जुनी आणि नवीन कामठी असे नामकरण झाले. कामठी शहराला सैनिकी इतिहास असल्याने येथे केंद्र सरकारच्या अधीन असलेले कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि नगर परिषद या दोन स्थानिक स्वायत्त संस्था आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात नियोजनानुसार विकास झाला. मात्र, कामठी वस्ती आजही विकासापासून दूरच आहे. विस्तारीकरणासाठी पुरेशी जागा नसल्याने शहर दाटीवाटीने वसले आहे.


गावाची ओळख
इंग्रजांनी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या नागरिकांना देशाच्या विविध भागांतून इथे आणले. त्यामुळे कुरैशी, मुस्लिम, जैन, धोबी, सोनार, शीख यांच्यासह अठरापगड जातीधर्माचे लोक येथे आहेत. येथे गुजरी बाजार, चावडी, भाजीमंडी, सोनारओली, फुटाणा ओली, दालओली, दर्जी मोहल्ला, परवारपुरा, कसार ओली, गुळओली, किराणाओली अशा नावांनी स्थळे आहेत. 1917 नंतर नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्यावरील छावणी कामठी कॅन्टोन्मेंट येथे हलविण्यात आली. 1927 मध्ये बागडोर नाल्याचा भाग मिल्ट्री कॅन्टोंन्मेंटपासून वेगळा करण्यात आला. त्यानंतर कामठी हे "ब' वर्ग शहर मानण्यात आले. येथे असलेले ड्रॅगन पॅलेस टेम्पल जपान येथील ओगावा संस्थेने बांधले असून, येथे जगभरातील पर्यटक वर्षभर भेट देतात.


वैशिष्ट्ये
कामठी येथे भोसलेकालीन वास्तू, सैन्य प्रशिक्षण केंद्र, जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल, रेल्वेलाइन, कन्हान नदी, कन्हान गोंडेगाव कोळसा खाण, बुद्धविहार, मंदिर, मशीद, चर्च येथे आहे. क्रिकेटपटू सी. के. नायडू, फूटबॉलपटू मुस्ताक कप्तान, सलाहुद्दीन अंसारी यांच्या क्रीडागुणांना येथून सुरवात झाली.

  • एक डिसेंबर 1863 : नगर परिषद स्थापना
  • 97 हजार : लोकसंख्या
  • 427.6 चौ. किमी क्षेत्रफळ
  • 1927 : नगर परिषदेची स्वतंत्र स्थापना (सीपी ऍण्ड बेरार)
  • 8 : एकूण प्रभाग
  • 31 : वॉर्ड

कागदावर विकास, शहर भकास
कामठी नगरपालिकेची विकास योजना 1989 मध्ये मंजूर करण्यात आली. त्यात 88 आरक्षणे आहेत. आजवर 15 आरक्षणस्थळी विकास करण्यात आला. पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने शहर विकासापासून वंचित आहे. शहरात एकूण 72 किलोमीटर लांबीचे रस्ते असून, 80 किमी लांबीच्या नाल्या आहेत.
शहराच्या विकासासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे कागदावर विकास दिसतो. प्रत्यक्ष संपूर्ण शहर "भकास' झाले आहे. मग, हा निधी गेला कुठे, असा प्रश्‍न उपस्थित करीत गैरव्यवहाराची शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक आमदार निधीतून जानेवारी 2005 ते 31 मे 2014 पर्यंत रस्ते बांधकाम व दुरुस्ती 9 कोटी 62 लाख 65 हजार 485 रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजना तीन कोटी 55 लाख, झोपडपट्टी विकास 1 लाख 53 हजार 491 रुपये, दलित वस्ती योजना 13 कोटी 83 लाख 38 हजार 471 रुपये, वित्त योजना दोन कोटी तीन लाख 11 हजार 482, शाळा बांधकाम अनुदान 17 लाख 47 हजार 420, आमदार निधी 58 लाख 14 हजार 658, नगरोत्थान महाअभियान 1 कोटी 98 लाख 5 हजार 260, तेरावा वित्त आयोग 4 कोटी 79 लाख 22 हजार 316, यूआयडी योजना 19कोटी 98 लाख 54 हजार इतका निधी खर्च करण्यात आला. त्याउपरही नगराचा विकास झाला नाही, अशी ओरड नागरिक करीत आहेत.
------------
स्वच्छतागृहांची गरज
जवळपास एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असतानाही शहरात एकही स्वच्छतागृह नाही. शुक्रवारी बाजार परिसरात असलेले एकमेव स्वच्छतागृह देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्थेत पडले आहे. स्वच्छतागृहाअभावी बाजार, व्यापारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. शहरात किमान सहा ठिकाणी सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहांची आवश्‍यकता आहे.

उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री
आजच्या पिढीला फास्टफूड संस्कृतीचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र या थोड्याशा आकर्षणामुळे रस्त्यावरील 5 ते 10 रुपयाला मिळणारे उघडे पदार्थ खाऊन आजाराला आमंत्रण देत आहोत. ही बाब नागरिक विसरत असतात आणि यामुळे आजाराला बळी पडतो. कामठी शहरात या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. कामठी येथे हॉटेल व उपाहारगृहांना परवाने देताना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

घाणीचा विळखा
कामठी न.प. अंतर्गत विविध विकासकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गत अडीच वर्षात मंजूर झाला. त्या निधीतून विविध विकास केल्याचा आणि विकासकार्य प्रगतीवर असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात विकासकार्य झाल्याचे जाणवत नाही. 10 वर्षापासून न.प. त कॉंग्रेस आघाडीची एकहाती सत्ता होती. कामठी शहराची ओळख घाण, अस्वच्छता आणि उकीरड्यांचे शहर अशीच आहे.

रस्ते डागडुजीच्या प्रतीक्षेत
बाबू हरदास एल.एन. चौक ते भाजी मंडी चौक या शहराच्या मुख्य मार्गाचे नशिब अद्यापही पालटले नसून, गत पंधरावर्षापासून या मार्गाची साधी डागडुजी सद्या सुध्दा करण्यात आली नाही. शहरातील अंतर्गत रस्त्यांची हालत अत्यंत दयनीय आहे.

बाजार रस्त्यावर
शहरातील आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. जयस्तंभ चौक ते गांधी चौक, पोलिस ठाणे ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावर दुकानदारांनी बेसुमार अतिक्रमण केले आहे. मार्गावरील दुभाजकांवरही दुकाने थाटण्यात येत आहेत. गोलबाजार परिसरात वाहनांची गर्दी असते. येथे वाहनतळाची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे.

भवनाचे बांधकाम संथगतीने
मुस्लिम समाज भवनासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. गत दोन वर्षापासून भवनाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवाना त्यांचे वैवाहीक समारंभ रस्त्यावर मांडव टाकून राहावे लागतात. त्याचप्रमाणे पोरवाल मैदानातील राजीव गांधी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. हा प्रश्‍न रेंगाळत ठेवण्यात सत्ता धारकांची महत्वाची भूमिका आहे.

------------------
आययुडीपी भागात विकास कार्याचा दर्जा खालावलेला आहे. या भागात कोट्यवधींची विकासकामे करण्यात आली. रस्ते बांधकाम, डांबरीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रोड आदी कामात गैरव्यवहार झाला आहे. छत्रपतीनगर, लुंबिनीनगर, भुराजीनगर, कुंभारे कॉलनी या भागात सुविधांची गरज आहे.

  • काही वर्षांपूर्वी नवे पोलिस ठाणे थाटात सुरू करण्यात आले. सध्या जुन्या पोलिस ठाणे दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. शहरात सहा पोलिस चौकी असून, कर्मचाऱ्यांअभावी त्या बंद आहेत. पोलिस वसाहतीची दूरवस्था झाली असून, कर्मचाऱ्यांचे कुटुंब धोक्‍यात जीवन जगत आहेत. येथे 75 सदनिका आहेत.

  • शहराच्या मध्यवर्तीभागात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले नाट्यगृह आहे. बोटावर मोजण्याइतके कार्यक्रम इथे झाले.

-------------
रेल्वे उड्डाणपूल प्रतीक्षेत
कामठी व नवीन कामठीला जोडणाऱ्या रामगढ रेल्वे क्रॉसिंग येथे रेल्वे उड्डाणपुलाची आवश्‍यकता आहे. दर 10 मिनिटांनी रेल्वे फाटक बंद होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. रेल्वे उड्डाणपूल झाल्यास जडवाहतुकीसह विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येईल.
------------
प्रतिक्रिया
विहिरींचा गाळ काढा
भौगोलिक रचनेमुळे शहरात कमी दाबाचा अल्प पाणीपुरवठा होतो. शहरात पुरेशा प्रमाणात विहिरी असून, मोटारपंपाच्या माध्यमातून तिथून पाणी घेतले जात आहे. अनेक विहिरींमध्ये गाळ साचल्याने त्यांच्या सफाईची गरज आहे. गाळ उपसा योजना राबविल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागू शकते.
- योगेश गायधने

नेत्यांच्या वादात खुंटला विकास
केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध कार्यांसाठी निधी मंजूर केला जातो. कामठी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि स्थानिक आमदार नेहमीच विरोधी भूमिका घेत असतात. त्यामुळे विकासकामे करताना श्रेय घेण्यावरून वाद होतो. परिणामी विकासकामे केली जात नाहीत. एखाद्या कामासाठी आवश्‍यक नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असे धोरण राबविण्यात येत असल्याने विकास खुंटला आहे.
- डॉ. संदीप कश्‍यप

अवैध कत्तलखाना
शहरातील भाजीमंडी या मुस्लिमबहुल भागातील अवैध कत्तलखान्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. आमदारांनी हा प्रश्‍न लावून धरल्यानंतर शासनाने पर्यायी जागा शोधून कत्तलखाना हटविण्याचे निर्देश दिले. तालुका प्रशासनाने आजनी, वारेगाव, खैरी आणि गादा या गावांतील जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विरोध केला. त्यामुळे अवैध कत्तलखाना हटलेला नाही.
- विवेक मंगतानी

उद्यानाची वाताहत
नियोजनाअभावी शहर दाटीवाटीने वसले आहे. पाहिजे तशी मोकळी जागा नसल्याने बगीचे नाहीत. सेठ केसरीमल पोरवाल यांनी त्यांचे उद्यान नगर परिषदेला भेट दिले. परंतु, योग्य देखभाल होत नसल्याने वाताहत झाली आहे.
- सुरेश अढाऊ

भुयारी गटार योजनेचे भिजत घोंगडे
केंद्र शासनाच्या योजनेतून कोट्यवधी रुपयांची भुयार योजना राबविण्यात आली; मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. या योजनेसाठी शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते ठिकठिकाणी खोदण्यात आले. त्यामुळे रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही भुयारी गटार योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे.
- शोयेब हैदरी

अस्वच्छतेचे साम्राज्य
नगरातील घाण साफ करण्यासाठी पुरेशी यंत्रणा असूनही ती प्रभावीपणे काम करीत नाही. शहरात ठिकठिकाणी घाण आणि कचऱ्याचे ढिगारे आढळतात. उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांनी "कामठी डुकरांचे शहर' म्हणून उल्लेख केला होता. यावरून गाव किती गलिच्छ आहे, हे दिसून येते.
- श्रीकांत शेंद्रे

मोक्षधामचा उद्धार केव्हा?
येथील नागरिकांना मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागतात. येथे अंत्यविधीसाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात रॉकेल, टायर, पेट्रोल टाकून मृतदेहांना अग्नी दिला जातो.
- उदयसिंग यादव

---------------------
खासदार कृपाल तुमाने :
नगराध्यक्ष रिजवाना कुरैशी : 9595761861
उपाध्यक्ष रणजित सफेलकर : 9371291888
मुख्याधिकारी प्रशांत घोरुडे : 9822737118
उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर : 8600046520
उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार : 9422188348
तहलसीलदार डी. एस. भोयर : 9423608327
पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर : 9892248769

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.