Wednesday, September 20, 2017

संजीवनीला हवी नवसंजीवनी

संजीवनीला हवी नवसंजीवनी


ललित सुनिल लांजेवार
चंद्रपूर - नाव संजीवनी उसरेटी. वय जेमतेम १६ वर्षे, दहावीला शिकतेय . घरची परिस्थिती अतिशय बेताची.  वडील एका खाजगी दुकानांत संगणक चालक, आई गृहिणी. जन्मापासून आजवर अतिशय आनंदाने  जगल्यानंतर अचानक एक दिवस तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यात ती आणि तिच्या घरचे चिंतेत गेले.
जुलै महिन्यातील अखेरचे दिवस. संजीवनी नेहमीप्रमाणे शाळेला जायची-यायची. यंदा तिचे दहावीचे वर्ष होते. ती अभ्यासात हुशार होती. एक दिवस अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्या पाठीवर व मांड्यावर खाज येत होती. सुरवातीला याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.  मात्र त्रासही वाढत गेला. प्राथमिक उपचारासाठी तिला चंद्रपूर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ विनीत दुबे यांच्याकडे दाखल करण्यात आले. उपचारही सुरु झाला. बरेच दिवस उपचार सुरु असतानादेखील संजीवनीच्या शरीरावर कोणतीच औषध-उपचार काम करत नाही, असे निदर्शनात येत होते.
त्याच दरम्यान दोन्ही पाण्याच्या गूढघ्याला हिरव्या निळ्या रंगांच्या गाठी येऊ लागल्या होत्या. संजीवनीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. आईवडील देखील दिवसेंदिवस चिंतेत पडत होते, घरची परिस्थिती देखील बेताची होती , एक हातावर कमविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे,अशी परिस्थिती होती. यातच संजीवनीच्या वडिलांनी डॉ.  इंगळे नामक खाजगी डॉक्टरकडे या रोगाविषयी माहिती केली. त्यांनी त्यांना लगेच रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. संजीवनीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, ते तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यावर संजीवनीच्या वडिलांना बोलवून काहीही न सांगता त्यांना नागपूर येथील हिमोटोलॉजिस्ट डॉ. रिया बल्लीकर यांना भेटावयास सांगितले.
आता इथून सुरु झाली होती संजीवनीला नवसंजीवनी देण्याची तिच्या घरच्यांची धडपड. संजीवनीचे वडील तिला घेऊन व्होकार्ड रुग्णालयात नागपूर येथे आले. तेव्हा तिची प्रकृती बघता तिला २ दिवस रुग्णालयातच भरती ठेवण्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला "ब्लड कॅन्सर" झाल्याचे निष्पन्न केलं. हे सांगताच वडिलांना धक्काच बसला. आईदेखील वर डोळे करून बसली होती. इतक्या मोठ्या शहरात आणि इतक्या मोठ्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता भासणार होती. आईवडील दोघेही चिंतेत होते. आजवर जेही थोडं फार कमावलं होते, ते  वडिलांनी तिच्या प्राथमिक महागड्या उपचारासाठी खर्च केले होते. दोन दिवस रुग्णालयात भर्ती केल्यानंतर तिचे बोनम्यॅरो तपासणी करण्यात आली. त्यात तिच्या शरीरातले ब्लडसेल्स निष्क्रिय होत होते, असे सांगण्यात आले. ज्यामुळे तिची प्रकृती ही खालावत होती. त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी महागडी उपचार पद्धती कीमोथेरेपी सुरु होणार होती. या उपचार पद्धतीत कीमोथेरेपीचे इंजेक्शन अतिशय महागडे असतात, आता आणखी पैश्याची आवश्यकता भासणार होती. १ इंजेक्शन देऊन झाले होते आणखी तिला बरे होण्यासाठी २ इंजेक्शन घेण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा इतके पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न संजीवनीच्या वडीलांना पडला. ही बाब चंद्रपूर येथील तिच्या परिसरात माहित झाली. अनेकांना तिच्या घरची परिस्थिती माहित असल्याने तिला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यात संजीवनी ज्या शाळेत शिकत होती त्या विद्या विहार शाळेतील शिक्षक, परिसरातील  नागरिक, तुकूम येथील तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ यांनी गणपती उत्सवासाठी लागणारी मदत देखील संजीवनीच्या उपचारासाठी केली. संजीवनीचे नातेवाईक, शासकीय स्थरावर पाठपुरवठा करत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी, चंद्रपूर येथील साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील हजारो रुपयांची आर्थिक मदत केली.
मात्र ही सर्व मदत आजही संजीवनीच्या उपचारासाठी अपुरी पडत आहे. तिच्या वडिलांची मदतीसाठीची पायपीट ही सुरूच आहे. आज तिला इतरांसारखे सामान्य जीवन जगायचे आहे .


आणखी तिच्या उपचारासाठी जवळपास ७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तेव्हा तिच्या मदतीसाठी शहरभर अनेक पोस्टर्स लागले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकूम शाखेच्या खाता क्रमांक- ६०२५८२६७०९९, IFSC -MAHB0000618 या खात्यात माणुसकीच्या नात्याने मदत करा
तुमची हीच मदत संजीवनीला नवसंजीवनी देण्यास उपयुक्त ठरू शकते .

Monday, September 18, 2017

कळत नकळत...

कळत नकळत...

जात्यात दगडी मनाच्या
बसलो विचार दळत...
विचारांचे ही पिठ झाले...
अगदी कळत नकळत

फुटली पालवी अक्षरांना
शब्दही आले पळत...
फुले रुचली त्या शब्दांना
अगदी कळत नकळत

पाहून सौंदर्य पथावरील त्या
नयनही होते चळत...
पथास मिळे आस त्या
अगदी कळत नकळत

शब्दच आले ध्यानीमनी
शब्दच होते कळत...
वाचले शब्द मनातले त्या
अगदी कळत नकळत

शब्दांची ती मंत्रआहोती
होमात शब्दच होते जळत
मुक्तीचे द्वार उघडले
अगदी कळत नकळत

शब्दच आज माझे धनी
मच्छिंद्रा चरणी वळत
तिच भक्ती तिच शक्ती
अगदी कळत नकळत
नवनाथ गाडेकर
__________________________
चांडोली बु" मंचर, पूणे
9922057525

Saturday, September 16, 2017

दिशा....

दिशा....

दिशा दिशा चुकली होती
आता चुकणार नाही...
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...


फेरा होता तो दुर्दैवी
पुढे त्या झुकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

श्रद्धा भक्ती हे खतपाणी
पालवी सुकणार नाही...
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...


मोडणे तू खोडले आई
दृष्टांना वाकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

देव माझा तू गुरुआई
आशिर्वाद  रुकणार नाही
देवा तुझ्या भक्तीला मी
आता मुकणार नाही...

नवनाथ गाडेकर
चांडोली बु ,ता आंबेगाव ( पुणे )
9922057525
महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे पडसाद

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे पडसाद

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची विद्यार्थी संघटना भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एन.एस.यु.आय.) भारतीय जनता पक्ष व प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आर.एस.एस.) चा मजबूत सपोर्ट असणारी विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थीपरिषद (ए.बी.व्ही.पी
.) कम्युनिष्ठाच्या विचारांवर चालणारी विद्यार्थी संघटना म्हणजे, ऑल इंडिया स्तूडेन्ट फेडरेशन (ए.आय.एस.एफ.) बिरसा आंबेडकर फुले स्टुडेन्ट आसोसिएशन (बाप्सा), आय.एस.ए. व राष्ट्रवादी काँग्रेसची विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शिवसेनेची विध्यार्थी सेना, मनसेची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, या सारख्या अनेक राजकीय पक्षांची पाठबळ असलेली विद्यार्थी संघटना व काही स्वतंत्र विद्यार्थी संघटना आहेत.
 महाराष्ट्र राज्यात मागच्या काही वर्षा पासून विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी राजकारणावर बंदी आणली आहे ते का तर म्हणे विद्यार्थी निवडणुकाने विद्यापीठे व महाविद्यालयातील शिस्तभंग होतात व गुन्हे जास्त वाढताहेत. १९९४ पासून लोकशाही पद्धतीने होणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांवर बंदी घालण्यात आली होती.
वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून भारतीय लोकशाहीचे धडे घेणारा विद्यार्थी जर महाविद्यालयीन जीवनात भारतीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर देशाला चांगले राज्यकर्ते तर मिळतीलच उलट देशाला चांगले मतदार सुद्धा मिळतील याच आपल्या महाराष्ट्राला विद्यार्थी व महाविद्यालयीन निवडणुकाने कित्येक असे चांगले राज्यकर्ते दिले आहेत ज्याचे उदाहरण आपल्याला माहित आहेत घ्यायचेच जर झाले तर महाराष्ट्राच्या जारकारणातील महामुनी असलेले शरद पवार, लोकनेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंढे आणि आताचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजपचे आमदार व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या सारखे बरेचसे मोठमोठे राजकीय नेते महाराष्ट्र विद्यार्थी किंवा महाविद्यालयीन राजकारणाने महाराष्ट्राला दिले आहेत. हे सर्व सांगायचं कशामुळे तर येत्या शैक्षणिक वर्षपासून १९९४ पासून बंदी असलेल्या महाविद्यालयीन निवडणूक होणार आहेत. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायदा २०१६ मध्ये दोन्ही सभागृहाच्या सहमतीने हे विधेयक पारित करण्यात आले. या मध्ये प्रत्येक महाविद्यालयातून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मतदान करून घेऊन विद्यार्थी सचिव निवडला जाईल त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयातील सचिवांनी विद्यपीठ स्तरावर विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सचिव निवडण्यासाठी मतदान करतील यासोबतच आता विद्यापीठांच्या सिनेट मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सचिव राहतील यामुळे सिनेट मध्ये जे सवाळा गोंधळ चालायचा त्यावर अंकुश लागेल.
विद्यार्थी परिषदांचे अध्यक्ष सचिव वगैरे १९९४ पासून निवडले जायचे पण ते थेट लोकशाही पद्धतीने न निवडता मेरिट बसे वर घ्यायचे यामध्ये ना नेतृत्व गुण पहायचे ना विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या प्रशाष्णविरुद्ध एखादी विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध होणाऱ्या कार्यवाहिला विरोध करायची क्षमता पाहिले जात होते. आशा या गोंधळामुळेच तर विद्यापीठांची व महाविद्यालयांची मनमानी सुरू झाली. कोणत्याही शैक्षणिक निर्णय घेताना विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून निर्णय घेतले जात होते. यामुळेच तर फक्त बोटावर मोजण्याइतक्या विद्यापीठे व महाविद्यालये वगळता सर्वांचा शैक्षणिक दर्जा घसरला व जास्तीत जास्त बेरोजगार निर्माण झाले ते याच काळात. विद्यार्थ्यांकडून कितीही फीस आकारायचे, कोणतेही नियम लागू करायचे, याच काळात राजकीय लोकांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केली व त्यांना पैसे छापण्याचे कारखाने करून टाकले, राजकीय नेत्यांना संस्थे मार्फत भरभरून पैसे भेटू लागले व महाराष्ट्र राज्याले याच नात्यांच्या संस्थे मार्फत असंख्य बेरोजगार. याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठातील निकालांचा झालेला गोंधळ. जर विदयार्थी परिषदांचा विद्यार्थी हितसंबंधी कोणत्याही निर्णय घेताना सहभाग करून घेतला असता तर इतका गोंधळ झालाच नसता.
महाविद्यालयीन निवडणूका बंद होऊन महाराष्ट्राचा खूप मोठा न भरून निघणार राजकीय नुकसान झालं आहे. करण देशासह राज्यालाही महाविद्यालयीन निवडणुकांमधून दर्जेदार, दिमाखदार, प्रभावी, वैचारिक,सअमान्यांचे विचार करणारे, समयसूचकता असणारे, परिस्थितीची जण असणारे, आदर्श आचार विचार असणारे, लोकशाहीचा सन्मान करणारे, महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रामाणिक विकास करू इच्छिणारे, राष्ट्रय पातळीवरील राजकारणाला व्यवस्थित समून घेऊन राजकारण करणारे, पक्षाची भूमिका अचूक मांडून त्यानुसारच कार्य करणारे, राजकीय जीवनातील अनेक संकटाना सामोरे जाताना इतरांना त्रास होऊ न देणारे, लोकशाहीचे जाणकार आसे मातब्बर नेते महाराष्ट्राला दिले आहेत. हणूनच तर महाराष्ट्रात आजच्या घडीला व भविष्यात चांगल्या महाराष्ट्र ला साजेशे युवा नेत्रत्वाचे दुष्काळ आहे. आताचे जे युवा नेतृत्व फक्त काही ठिकाणी वगळता राजकीय कुटुंबाच्या वरसदरकांडे, म्हणजे मोठ्या राजकीय नेत्यांच्या मुलाकडे, मुलीकडे, कुठे पुतण्याकडे तर कुठे छोट्या भावाकडे तर कुठे नातेवाईकांकडे या मुळे मला तर चिंता वाटते की येत्या पंधरा ते वीस वर्ष्याच्या काळानंतर महाराष्ट्र राज्यातील नेते आता जे चालु विद्यमान आसलेली शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, बी आर अंतुले या सारख्या पहिल्या फळीनंतरची, नारायण राणे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, विखे पाटील यासारखे अनेक दुसऱ्या फळीतीळ राजकीय नेते संपल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे कसे होईल? महाराष्ट्राचे कसे होईल? येथील जनतेचे कसे होईल? खरच आपल्यासाठी दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विकासगतील इतर राज्याच्या गतीसोबत ठेवणारे प्रभावी युवा व या विद्यमान सुजाण राजकीय मंडळी यानंतर भविष्याला चांगले नेतृत्वच नाही.
त्यावेळच्या काही जाणकार पण स्वार्थी राजकीय नेत्यांनि आपल्याला आपल्या संस्थेत मनमानी करता यावी आपल्यावर कोणी पाळत राहू नये म्हणून महाविद्यालयीन निवडणुकांवर वाढत्या गुन्ह्याच्या नावाखाली बंदि आणली करण त्यांना माहीत होतं की विद्यार्थी व महाविद्यालयीन निवडणुकामुळे चांगले विद्यार्थी नेतृत्व तयार होतात व नंतर तेच महाविद्यालयीन प्रशासनावर पळत ठेवतात करण ते स्वतःही तेच करून तिथपर्यंत पोहचले होते म्हणून स्वतःच्या शैक्षणिक संस्थेमध्ये आर्थिक फायद्यासाठी महाविद्यालयीन निवडणूका बंद केले होते. महाविद्यालयीन खुल्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांवर बंदी घालण्याचा दुसरा महत्वपूर्ण राजकीय कारण होता तो म्हणजे त्या काळातील राजकीय मंडळींनी तर त्यांची राजकीय पोळी भाजली होतीच पण त्यांना त्यांच्या दर्जाहीन, नेतृत्वाशून्य, अजाण राजकीय युवकांना म्हणजेच त्यांच्या मुलांना, मुलींना, पुतन्यांना,भावांना व इतर जवळच्या नातेवाईकांना अश्याच त्यांच्या तिसऱ्या फळीला राजकारणात आणायचे होते आणि तसेच झाले म्हणून तर १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्राला लाभलेले डळमळीत युवा नेतृत्व साधारण कुटुंबातील असाधारण क्षमतेचे, अपार नेतृत्व कौशल्ये असलेले युवा नेते नसून राजकीय नेत्यांचेच ज्यांचे स्वताचेही मत नसलेली, एखाद्या हुशार व चतुर पत्रकारांच्या अवघड प्रश्नांची उत्तरे ही वडिलांना विचारणारे, फक्त वाढदिवसापूर्तीच ठराविक युवक गटांत चर्चेत राहणारे, ज्यांना त्यांच्या राजकीय कार्यात सक्रीय असलेल्या वडीलधाऱ्यांच्या मदतीशिवाय दहा ते वीस लोकांसमोर दहा ते वीस मिनिटे चांगल्या विषयावर नीट उभे राहून बोलताही येत नाही, फक्त घरची मंडळी राजकारणात आहे म्हणून मोठमोठे व्यवसाय करत त्याला जोड धंदा म्हणून राजकारण करणारे मुलं, मुली, पुतणे, भाऊ व इतर नातेवाईक असे नेते लाभलेले आहे हे अपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे कोणते राजकीय घराण्याशी संबंध असलेले राजकीय युवक युवती राजकीय जीवनात लोकांशी सांपार्क साधताना कोणाच्या नावाखाली मते मागतात व सहानुभूती चे राजकारण कसे करतात हे वेगळे सांगायची गरज नाही.
आता तळागाळातील प्रतिभावंत युवकांना राजकारणात प्रवेश करण्यासठी महाविद्यालयीन व विद्यपीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमुळे सुवर्णसंधी मिळणार आहे तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ इतरांना काही ही त्रास न देता , लोकशाहीचा पूर्ण सन्मान करत, काही अनुचित प्रकार न घडू देता, आपल्या लोकशाहीतील सर्व अधिकार व जबाबदारीची जाणीव ठेवत, जास्तीत जास्त मतदान करून योग्य उमेदवारांना निवडून किंवा स्वतः प्रामाणिकपणे निवडणूक लढवून विद्यार्थ्यांच्या हितसंबंधी कार्य करत करतच मुख्य राजकारणाचे धडे घेत, आपल्या स्वतःच्या मतांनी राज्याला विकासकामत लागेल त्या काही मदत करता करता घ्यावा, दोन्ही संभागृहांचे महाविद्यालयीन निवडणुकांना काही नियम व अटी लावून हिरवा झेंडा दिल्याबद्दल आभार यामुळे आगामी काळातील महाराष्ट्राची राजकीय समीकरणे सध्याच्या राजकीय नेते मंडळींच्या डळमळीत ज्यांना शैक्षणिक प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची, आर्थिक विकासाची, महाराष्ट्रातील गरिबांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची,वेठबिगाऱ्यांची, बेरोजगारांची तिळमात्र जाणीव नसलेल्या वरसदारांच्या हातात न राहता गोरगरीब सामान्य कुटुंबातील प्रतिभावंत युवा नेत्यांच्या हातात राहणार आहे यापेक्षा मोठा समाधान कशाने मिळणार आहे.
यामुळे या लोकशाहीच्या पर्वात सर्व युवकांनी यंत्रणेला काहीही गालबोट न लावता सहभाग नोंदवावा व डळमळीत होत चाललेल्या लोकशाहीला मजबूत करण्याच्या लाभलेल्या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.

शिवाजी बळीराम जाधव
दावनगीरकर- ७५८८२१०१४३

Friday, September 15, 2017

नावाजलेल्या शाळा आणि पालक

नावाजलेल्या शाळा आणि पालक

एका शासकीय कार्यालयाच्या कँटीन मध्ये वर्ग तीन व चार दर्जाचे कर्मचारी दुपारचे जेवन झाल्यावर गप्पा मारत होते तितक्यात संतोष नावाच्या कर्मचाऱ्याने त्याच्याच सहकार्याला म्हणजे श्रीहरी ला विचारले की, "काय झालं हो तुमच्या मुलाला शाळेत टाकायचं होत टाकलं काय?" मग श्रीहरी ने आजूबाजूच्या कर्मचार्यकडे पाहून मन खाली करून लाजिरवण्या चेहऱ्याने म्हणाला, "काय सांगावे संतोष भाऊ मी आणि माझ्या मुलाची आई त्या शाळेत गेलो होतो पण तिथे फीसच खूप मागितली हो त्यामुळे मला माझ्या मुलाचा ऍडमिशन त्या महागड्या शाळेत करता आले नाही." कमाल आहे या देशातील पालकांची मुलाचं ऍडमिशन एखाद्या मोठ्या 'नावाजलेल्या' शाळेत केला नाही म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्यासारखे वाटून घेतात. मग याच संभाषणात सुधीर बोलतो, "काय हो श्रीहरी मी तर माझ्या मोठ्या मुलाचं हि ऍडमिशन त्याच शाळेत केला होता आणि कालपरवा माझ्या लहान मुलाचहि ऍडमिशन त्याच शाळेत केलो आहे कारण ही शाळा आपल्या शहरातील सर्वात चांगल्या शाळेपैकी एक आहे. हि शाळा खूप मोठी आहे याच संस्थेची शेकडो शाळा शेकडो शहरात आहेत. आणि आपली मुलं इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेत शिकवणे म्हणजे आपली मुले हमखास यशस्वी होतात, आणि तुम्ही म्हणताय कि फीस जास्त मागीतल्यामुळे ऍडमिशन केलं नाही, अहो तुमच्या पेक्षा तो बिचारा प्रधान चांगला नोकरीला लागून पाच वर्षेही झाली नाहीत पण त्याच्या मुलाला तो इंटरनॅशनल शाळेच्याच प्ले ग्रूप मध्ये टाकलाय, तुम्हाला तर नोकरीला लागून जवळ जवळ नऊ-दहा वर्षे झालीत तुम्ही तर तुमच्या मुलाचं ऍडमिशन नक्कीच ह्या शाळेत करायला पाहिजे कारण मुलांना इंग्रजी माध्यम मधून शिकविणे आजच्या काळाची गरज आहे."
आजच्या पालकांत एकच स्पर्धा लागली आहे की तो आपला सहकारी किंवा आपल्या पेक्षा कमी दर्जाची नोकरी करणारा इसम आपल्या मुला मुलींचे ऍडमिशन मोठ्या नेवाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करत आहे तर मी का नाही? पण या स्पर्धे मध्ये त्यांचे लक्ष मुलांच्या प्रगतीकडे, शैक्षणिक विकासाकडे जातच नाही. आजकालच्या पालकांमध्ये तर एक खोट्या प्रतिष्ठेची लाट पसरलेली आहे की ज्यांचे मुलं मोठ्या नावाजलेल्या समूहातील किंवा इंटरनॅशनल शाळेत शिकतात तेच खूप प्रतिष्ठित. म्हणून मध्यमवर्गीय पालकांत आपापल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या शाळेत पाठवायची स्पर्धा लागली आहे आणि जे कोणी त्यांच्या मुलांचे ऍडमिशन शासकीय किंवा साधारण पण शैक्षणिक दर्जा जपणाऱ्या शाळेत कारेल तो आजच्या पालकांच्या दृष्टीने गौणच. असे गौण म्हणून घेण्यापेक्षा मुलाचं मोठ्या नावाजलेल्या शाळेत ऍडमिशन करतात व काहीही करून शाळेला मागेल तेवढी फीस देतात. पण यामध्ये मुलाच्या क्षमतेचा व सुप्त गुणाचे विचार कोणी करत नाही. मान्य आहे मला कि मुलांच्या विकासात शाळेचेही अनमोल वाटा असतो पण आजचे पालक मुलाच्या शाळेलाच मुलांच्या प्रगतीचे शंभर टक्के श्रेय देतात व कितीही प्रमाणाबाहेर फीस देऊन मुलांचे ऍडमिशन आशा नावाजलेल्या खोट्या प्रतिष्ठेच्या शाळेत करून सुटकेचा निश्वास सोडतात.
शाळेच्या दिवशी मूल शाळेत केवळ चार ते सहा तास असतो बाकी चे अठरा ते वीस तास तो पालक व मित्र परिवाराच्या सानिध्यात राहतो, मग मुलांना इतकी फीस देऊन मोठमोठ्या महागड्या शाळेत टाकायची स्पर्धा कशामुळे चालू असते हेच मला समजले नाही. एकदाची काय त्या शाळेची फीस भरली कि मग मुलाच्या विकासाची, प्रगतीची जबाबदारी त्या शाळेवर टाकून पालक मोकळे होतात पण मुलाच्या नैतिक मूल्यांचे काय? जे संस्कार घरात भेटायला पाहिजे ते शाळेत कशे भेटतील? आई वडील नोकरीला किंवा दोहोंपैकी एक नोकरीला घरी आले की आपापले मोबाइल घेऊन बसणार, टि व्ही चालू करून बसणार मुलांकडे लक्ष नाही देणार त्यांना काय शिकवलंय?, काय गृहपाठ दिलाय?, मुलांना काय हवंय?, त्यांचं मन त्या शाळेत लागतो काय?, आपण मुलांसाठी काही करू शकतो काय? त्याचे मित्र कसे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय? मुल अभ्यासक्रमा वातिरिक्त इतर नैतिक मूल्यांची जोपासना करतो काय? मुलांना त्यांचे शिक्षक आवडतात काय? न आवडल्यास त्यांना कश्या शिक्षकांची आवड आहे? त्यांच्यात कोणकोणते सुप्तगुण आहेत? मुलांना काय करायला आवडते हे जाणून त्यानुसारच त्यांना करीअर करायला लावण्यासाठी आपण काही करू शकतो काय घरी अभ्यास करत नसेल तर शिक्षकांना भेटून त्यासाठी काही करू शकतो काय ते पाहावे, शिक्षकांना भेटून मुलांची प्रगती विचाली काय? विद्यार्थ्यांच्या वर्तनात आवश्यक बदल न झालास शिक्षकांना भेटून त्यावर काही उपायोजना आहे काय हे शोधून त्यानुसार कार्य करता येतील काय? या सारख्या अनेक बाबी आहेत जे कि पालकांनी लक्ष द्यायच्या आहेत जर या सर्व गोष्टी कडे जर पालकांनी लक्ष दिले नाही तर मूल इंटरनॅशनल तर काय जगातील सर्वोत्तम देशाच्या शाळेत जरी ठेवलं तर अपेक्षित प्रगती होणे शक्य नाही.
सध्या चर्चेचा विषय तो म्हणजे दिल्लीतील एका मोठ्या समूहाच्या शाळेतील सात वर्षाच्या मुलाच्या खुनाचा. आशा बेजबाबदार शाळेत मुलांचा प्रवेश करण्यासाठी पालकांत खूप मोठी स्पर्धा असते आणि एखाद्या वेळेस आशा लाजिरवण्या घटना घडल्यानंतर सागळ्यांचे डोळे उघडतात. मग एकेका बाबींची चाचपणी करतात वेगवेगळए खुलासे करतात. माध्यम वर्गीय पालकांचे सर्व आयुष्यच मुलांच्या शिक्षणात जातो ते जेवढे कमवतात जवळजवळ तेवढेच पैसे मुलांच्या शिक्षणात म्हणजे आशा मोठ्या व नावाजलेल्या शाळेची फीस देण्यात जातो. इतक्या चांगल्या शाळेत टाकूनही आई वडिलांनि नीट लक्ष दिल तर ठीक अन्यथा मुलं जातात वाया. वाया याचा अर्थ त्याला तर नोकरी पैसे वगैरे भेटेल पण जे आवश्यक मानवी मूल्ये आहेत तेच नसतील कारण मोठमोठ्या शाळेत केवळ आणि केवळ अभ्यासक्रमालाच महत्व दिला जातो तेही केवळ परिक्षे पुरताच त्यातील उद्दिष्टे पुर्तीला काहीच महत्व नसतो.
शिक्षण कोणत्याही माध्यमातून असो महत्व केवळ अपेक्षित वर्तन बदल व अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टे पुरतील महत्व द्यायला पाहिजे तरच मुलांचा सर्वांगीण विकास होईल त्या साठी कोणीही इंग्रजी माध्यमाच्या माघे न धावता मुलांना चेंगल्या दर्जेदार शाळेत पाठऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा मी म्हणत नाही की इंग्रजी ची गरज नाही इंग्रजी हि काळाची गरज आहे पण त्याला अवशक्यतेपेक्षा जास्त महत्व देऊ नये. सगळ्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा दर्जाहीन असतात असे नाही काही शाळा खूप दर्जेदार हि असतात त्यांच्या शिक्षण प्रणाली ही खूप आदर्शवादी असतात. त्या शाळेमध्ये मुलाचे प्रवेश करायला काही हरकत नाही आणि आशा आदर्शवदी शाळांची फीस हि आवाक्यात असते. पालकांनि स्पर्धा लावावी आपल्या मुलांच्या शैक्षणिक विकासाची, मुलांकडून नैतिक मूल्यांची जोपासना करून घेण्याची दर्जेदार कौशल्यांची, खेळाची, संस्कृतीचं, कलेची, मानवतेची ना कि आपल्या पल्यानां अवढाव्या व अमाप फीस देऊन मोठ्या शाळेत प्रवेश मिळविण्याची.

शिवाजी बळीराम जाधव
दावनगीरकर - ७५८८२१०१४३

Thursday, September 14, 2017

परिस्थिती

परिस्थिती

कथा..........

- कल्याणी मुळे, नागपूर

नवरा दारू पिऊन सहा महिन्यापुर्वी वारला. तीन मुलांची जबाबदारी तीच्याच खांद्यावर येऊन पडली. ना कसलं शिक्षण ना कसलं कलाकौशल्य.ती आता धुण्या भांड्‌याची कामं करत असे. या पावसात लादी पुसताना तिचं पुर्ण अंग भरुन येई कारण आयुष्यभर नवर्याच्या हातून खाल्लेला मुका मार आता वर तोंड काढत होता. पण आता बादल्या भरभरून धुणं आणि बेसिन ओसंडून वाहणारी खरकटी भांडी घासल्याशिवाय काहीही पर्याय न्हवता. मुलं मोठी होत होती तशी त्यांची भुक पण मोठी झाली होती.

मागच्या महिन्यात लेकीच्या आजारपणात आगाऊ घेतलेली उचल आणि पगार संपून गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून घरात खायला काहीही न्हवतंच. तसेही नेहमी पोटभर होतं असं नाही पण गेले दोन दिवस अक्षरशः काहिच न्हवतं.तिने गेले तीन दिवस पोटाला फडकं करकचून आवळून आणि मिसरीचा तोबरा भरून भुकेला चकवा दिला होता. पण आज सकाळीच कामाला निघताना धाकट्‌या लेकराने पायाला मिठी मारून " आई.... खायला " म्हटलं तेव्हा तिला गलबलून आलं होतं. ती तशीच कामावर पोहचली ....... ! कामं उरकली.
"बाई ..... थोडं काम होतं "
"हं बोल " बाईनी टिव्ही वरुन नजर न ढळवता म्हटलं
"जरा दोनशे रूपये पाहिजे होते " ती खालमानेनं म्हटली
आता बाईंनी टिव्ही वरील नजर हटवून हिच्याकडे पाहिलं तेव्हा त्या नजरेत राग काठोकाठ भरलेला होता.
"मागच्याच महिन्यात उचल दिली होती ना, पैसे काय झाडाला लागतात ?"
"नाय, पण घरात खायला काय सुदीक नाय ..... तवा जरा ....." ती पायाच्या बोटांनी फरशीला खड्डा पाडण्याचा प्रयत्न करत म्हटली
बाईंच्या तोंडावर बरेच शब्द आलेले पण डॉक्‍टरांनी दिलेला मनस्ताप टाळण्याचा सल्ला त्यांना आठवल्यामुळे त्यांनी स्वतःला आवरले
"हे बघ सतत पैसे मागायचे असतील तर तु नाही आलीस तरी चालेल , हे शंभर रूपये घे पण पुढच्या महिन्या शिवाय आता काही मागु नकोस'
किराण्याच्या दुकानात जाईपर्यंत ती शंभर रूपयाची नोट तीने कितीतरी वेळा उलटून पालटून पाहिली. दुकानदाराकडून मसाला ,तेल आणि तांदूळ घेतल्यावर अत्यंत अनिच्छेने त्याच्या हातात ती नोट दिली. सामानाची पिशवी छातीशी धरून ती लगबगीने घराकडं निघाली तेव्हा पावसाने देखिल जोर धरला होता.

"भडव्या तुला चार फोन केले तेव्हा एक उचलतोस. लोणावळ्याला वर्षा विहाराला जायचं हे मागच्या आठ दिवसांपूर्वी आपलं ठरलं होतं ना ?"
"अरे हो पण माझा बाप तुम्हाला माहिती आहे ना , गाडी साठी त्याचं मन वळवता वळवता नाकी नऊ आले तेव्हा कुठे आज गाडी मिळाली "
"चल जाऊ दे, घे एक सिप मार " त्याने बिअर पुढे केली
त्याने गाडीच्या एक्‍सिलेटर वर पाय देत बाटली हातात घेतली आणि ती थंडगार बियर घशात ओतायला सुरुवात केली. पेय उत्तेजक होतं. त्याला बरं वाटलं.त्याने ?क्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत बाटली पुन्हा तोंडाला लावली.
" अरे , अरे समोर ती बाई बघ ...... अरे ब्रेक ब्रेक ..... " गाडीत एकच आवाज झाला
तोपर्यंत उशीर झाला होता . पिशवी घेऊन निघालेली ती बाई एका धक्क्‌यात बाजूला चिखलात जाऊन पडली होती.
" गाडी थांबवू नकोस , पळ, पळ चल पटकन " कुणीतरी ओरडत होतं.
त्याने एक्‍सिलेटर वर आणखी जोरात पाय देत गाडी तिथून सुसाट लोणावळ्याच्या दिशेने दामटली.

ती काही कळायच्या आत एका जोरदार धक्क्‌याने हवेत उडून पडली. "खूप वेदना" एवढीच तिला जाणीव होत होती. कुठलंतरी हाड मोडलेलं असावं. रस्त्यावरील लोक पळत आले होते त्यातील कुणीतरी तरी तिला उठवून बसवलं.
"कोण होते हरामखोर ?"
"हि बड्‌या बापाची मुलं ....... "
"चाबकाने फोडले पाहिजेत एकेकाला ..... "
लोकांचा गलका सुरू होता. पण तीला काहीही ऐकू येत न्हवतं कारण तीची नजर काहीतरी शोधत होती ....... आणि तिला ती दिसली .........
जवळच साठलेल्या काळ्याशार पाण्यात ती उलथी होऊन पडली होती. आतला तांदूळ त्या पाण्यात गडप झाला होता तर तेल त्या काळ्याशार पाण्यावर आपला तवंग उठवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होतं.
तीला ते सगळं समजायला काही क्षण जावे लागले आणि मग तीने एकच हंबरडा फोडला. पाऊस पुन्हा पडायला सुरुवात झाली होती.
"अस्तपैलू अभियंते - डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या...!"

"अस्तपैलू अभियंते - डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या...!"


श्रीपाद नागनाथ राऊतवाड
             मो. ९९७००५२८३७

आज १५ सप्टेंबर,म्हणजे भारतरत्न सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त जागतिक अभियंता दिन म्हणून साजरी करतो, थोर स्थापत्य शास्त्रज्ञ असलेले सर विश्वेश्वरय्या हे भारतातील एक महान व पाहिले अभियंता म्हणून ओळखले जाते,पेशाने स्थापत्य असूनही अभियांत्रिकेच्या प्रत्येक शाखेच्या ज्ञानाची खान आपल्या अंगी बाळगणारे आजच्या अभियंतेला आदर्श असा व्यक्तिमहत्व या देशाला लाभले हे भाग्यच....

कुठल्याही देशाची सर्वांगिण प्रगती ही अभियांत्रिकीवर अवलंबून असते. वाहतूक व्यवस्था, उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, बांधकाम, यंत्रे, दूरसंचार, वैद्यकीय, प्रसार माध्यमे, शेती, अवकाश यामध्ये विकास अभियांत्रिकीमुळेच घडून आलेला आहे. याच क्षेत्रामध्ये सातत्याने होणार्‍या क्रांतिकारी बदलास अभियांत्रिकी हेच पर्यायी उत्तर आहे. या क्षेत्रातील समस्या, उपलब्ध तंत्रज्ञान व संशोधनातून विकसित होत आहेत. या बदलांच्या प्रक्रिया जो देश स्वीकारतो त्या देशाची अर्थव्यवस्था त्या बदलांशी निगडित असते,अर्थातच सामाजिक जडणघडणातील सर्व गोष्टी एक अभियंतेच्या नेतृत्वाने साकारले जाते, अनेक शास्त्रज्ञे आपल्या अस्तित्वाची पर्वा नकारता या देशातील विविध क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त करून,देशाला एक वैज्ञानिक दृष्टीक्षेपात मापण्याचं कार्य या अभियंताने केले,त्यातलंच उधाहरण म्हणजे भारतरत्न सर डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेणे बंधनकारक ठरेल.

Wednesday, September 13, 2017

अजून किती विचारवंत संपवणार....?

अजून किती विचारवंत संपवणार....?

लेखक :- श्रीपाद नागनाथ राऊतवाड
मो. ९९७००५२८३७

परवा निवांत क्षणी मोबाईल हाताळत होतो, अचानक एका व्हाट्स अँप ग्रुपवर्ती मला एक धक्कादायक बातमी दिसली, ही बातमी खरी आहे का,? या विचाराने मी थोडं पूर्ण माहिती मिळेल का याच्या शोधात होतो,आणि एकदम धक्कादायक बातमी माझ्या डोळ्यासमोर अली काही वेळ सुन्न झालो, ती बातमी होती बंगळूरच्या जेष्ठ पत्रकार तथा संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येची,आपल्या कार्यालयावरून रात्रीला घरी परतत असताना विकृत विचार सारणीच्या चार-पाच इसमानी त्यांच्यावर फार जवळून बंदुकीच्या गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या केले,परंतु सोशियल मीडिया वर लंकेश हत्याकांडावर ना ना प्रकारचे टिंगलटवाळी संदेश,पोष्ट करतांना दिसून येत आहेत,कर्नाटक चे भाजप आमदार डी. एन. जीवराज यांनी गौरी लंकेशची यांची हत्या,संघविरोधी लिखाण वरून झाल्याची गरळ ओखली, तर अनेक युवकांची सोशियल मीडिया वर हत्येचा निषेध सोडाच 'जैसी करणी वैसी भरणी",या सारखे पोष्ट वाचून मनाला खंत वाटत आहे.


आपला देश संस्कृतीक, पारंपरिक रीती रिवाज या सर्वांगाने नटलेले हे देश आहे,याच देशात भगवान गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान आम्हाला ऐकायला मिळतात,याच देशात आम्हाला संतांची अभंगे ऐकायला मिळतात,आणि यांच देशात संविधानासारखी लोकशाही बळकट आहे, देशात विचारवंतांनी गाचाटलेले महान विचारवंत होऊन गेले,महापुरुष होऊन गेले,यांच्या चळवळीला सार्थ ठरण्यासाठी अनेक अनुयायी आज महापुरुषांच्या वैचारिक चळवळीचा वारस म्हणून जगतात,अनेक विचारवंत आज त्यांच्या कार्याची रथ पुढे नेण्यात यशस्वी आहेत,परंतु देशात वाढत चाललेली सहिष्णुता पाहून नक्कीच आमच्या विचारसरणीला प्रबोधन कमी पडत असल्याचे जाणवत आहे,एकीकडे अनेक विचारवंतांची फौज देशात तयार होत आहेत,तर त्यापेक्षा दुप्पटीने त्यांच विचारवंतांची हत्या करणारे हत्येकरी व त्यास प्रोत्साहन देणार,समर्थन करणारेे युवा वर्ग,किती लाजिरवाणी बाब आहे, बैगळूरच्या जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश त्यांच्या हत्येनंतर निषेधा वैतरिक्त हत्येकऱ्याना प्रोत्साहन देणारे आज सोशिअम मीडिया वरती वाचायला मिळत आहे,लोकशाहीचे लोकप्रतिनिधी असलेले कर्नाटकचे भाजपा आमदार डी.एन.जीवराज यांच वक्तव्य तर हत्येकऱ्यांना समर्थन करणार्यापैकी एक, संघ विरोधी लिखाण केल्याने गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचे त्याने गरळ वकुन, पुन्हा एकदा लोकशाहीचा घात केला,देशात लोकशाहीची,संविधानाची बाजू बळकट करण्यासाठी या लोकप्रतिनिधींना आपण लोकशाहीच्या बळावर निवडून द्यायचं आणि हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुसक्या आवळायची हेच का देशात चालत असलेली समानता,स्वतंत्रता,बंधुता,एकात्मता, तिकडे अमेरिका म्हणते,'गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे भारताच्या लोकशाहीस घातक ठरतोय,मग आम्हाला आमच्या लोकशाहीची पर्वा नाही का,आमच्या देशात सत्य आणि खरे बोलल्या जाणाऱ्यांसाठी बंदुकीची गोळी हाच सन्मान आहे का.?



पुरोगामी पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात देखील काही वर्षांपूर्वी दोन विचारवंतांची हत्या झाली,त्याचा अजूनही शोध मोहीम चालूच असल्याचे सांगतात,मारेकऱ्यांचा तपास अद्याप लागला नाही,डॉ.दाभोलकर, आणि कॉ. पानसरे यांनाही बंदुकीच्या गोळ्यांने सन्मानित करण्यात आले होते,हे विचारवंतही डाव्या विचारसरणीचे होते,सामाजात चालत असलेली अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्या वर गधा आखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेमून अनेक बुवा बापूच्या खोट्या जंतरमंतर वरून समाजाला सुटका मिळत होता ढोंगी पाखंडाची दुकाने बंद होत चालली होती , विज्ञानवादी विचाराने अनेक प्रबोधनाच्या सानिध्यात सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असलेल्या दाभोलकर , पानसरे,कुलबर्गी यांना शेवटी सत्यशोधकांना मिळणारा (हत्या) मान सन्मान मिळाला,यांच्या हत्येनंतर अनेक संघटने,अनेक समूहाच्या लाठा रस्त्यावर उतरले,मेणबत्या पांजरल्या "व्यक्ती मेले तरी विचार मरत नाहीत",अश्या वक्तव्य समाजातून ऐक्याला मिळत होत्या,आणि आजही तेच ऐकत आहोत,आजही गौरी लंकेश च्या हत्येनंतर अनेकांनी ह्या वक्तव्यातून निषेध नोंदवला,मात्र खंत या गोष्टीची वाटते अजून किती विचारवंत संपवता..?,व्यक्ती गेले विचार जात नाहीत खरे पण त्या व्यक्तीची जागा किती जणांनी घेतली,त्यांच्या विचारांनी कितीजण आज न्याय मागतात, सत्य रेखटणाऱ्या व्यक्तीला असेच संपवणार का.? नेमकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरला का..?
सोशियल मीडियावर नकोत्या पोष्ट वाचायला मिळत आहेत,म्हणजे हत्येकऱ्यांच्या समर्थकांची यादी आज या सुसंस्कृत देशात वाढत चालली आहे,म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा,देशातल्या संविधानिक लोकशाहीचा हा घातच ना, पानसरे,दाभोलकर, कलबुर्गी पाटोपाट गौरी लंकेश अजून ही यादी कितीवर जाणार आणि किती जण यास समर्थन करत देशातील स्वतंत्राचा अधिकार नष्ट करणार,एका व्यक्तीची लेखणीची ताखत इतकी भयंकर की त्यास समाना करण्यास थेट मृत्यूच्या सानिध्यात जावे लागते,हत्येची समर्थन करणाऱ्यांनी एकदा इतिहास जरूर तपासावा,कारण समाजाचा इतिहास विसरणारा व्यक्ती आपला अस्तित्व कधीच निर्माण करू शकत नाही असे डॉ. बाबासाहेब म्हणायचे,आणि हा इतिहास साक्षीला आहे आज पर्यंत खर बोलणाऱ्या,लेखणाऱ्या विचारवंताना बंदुकीच्या धाकीची सन्मान व हत्येने पुरस्कार.

Tuesday, September 12, 2017

फेसबुक नोटिफिकेशन बंद करणे

फेसबुक नोटिफिकेशन बंद करणे


फेसबुकचे त्रासदायक नोटिफिकेशन कसे बंद करावे? वाचा...

फेसबुक नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यामुळे आपला पुर्ण वेळ मोबाईल पाहण्यात जातो आणि एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही. यापैकी काही नोटिफिकेशन्स आवश्यक असतात आणि काही फारसे गरजेचे नसतात. तर असे आपल्याला आवश्यक नसलेले नोटिफिकेशन्स बंद कसे करता येतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

@@ अॅन्ड्रॉईडवर नोटिफिकेशन
जर तुम्ही अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप वापरत असाल तर...

-अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप नोटिफिकेशनला डिसेबल करण्यासाठी या स्टेप फॉलो करा

-फेसबुक अॅप ओपन करा

-सर्वात वरती तुम्हाला तीन आडव्या रेषांचा आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा

-त्यानंतर अकाउंट सेटिंगमध्ये जा

-आता नोटिफिकेशनवर टॅप करा आणि जे नोटिफिेकेशऩ नको असतील ते डिसेबल करा

@@ iPhone किंवा iPad नोटिफिकेशन

जर तुम्ही iPhone किंवा iPad वर फेसबुक अॅप वापरत असाल तर....

-फेसबुक अॅप ओपन करा

-उजव्या बाजुला खाली तुम्हाला 'मोअर' (MORE) बटनवर टॅप करा

-त्यानंतर सेटिंगवर टॅप करून अकाउंट सेटिंगमध्ये जा

-नोटिफिकेशनवर टॅप करा. याठिकाणी तुम्ही बर्थडे रिमाइंडर आणि लाइव्ह व्हिडीओसारख्या नोटिफिकेशनच्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.

@@ कंम्प्युटरवर नोटिफिकेशन
कंम्प्युटरवर फेसबुक नोटिफिकेशन डिसेबल करण्यासाठी

-अॅप किंवा गेम्सच्या नोटिफिकेशनपासून सुटका करून घेण्यासाठी फेसबुक अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जा.

-त्यानंतर गेम आणि अॅप नोटिफिकेशनमध्ये जा आणि एडिटवर क्लिक करा

-त्यानंतर नोटिफिकेशन टर्न ऑफवर क्लिक करा

@@ अॅप इन्विटेशन नोटिफिकेशन
जर कोणी सातत्याने तुम्हाला अॅप इन्विटेशन पाठवत असेल तर ब्लॉकिंग सेटिंग पेजवर जा आणि ब्लॉक अॅप इन्व्हाइटमध्ये त्याचं नाव टाइप करा. याशिवाय बर्थडे रिमाइंडर सारखे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी फेसबुकच्या नोटिफिकेशन सेटिंग पेजवर जा.

@@ बर्थडे नोटिफिकेशन बर्थडेजवळ असलेल्या बटनावर क्लिक करा आणि परत क्लिक ऑफ करा. याद्वारे फेसबुकवर मिळणारे बर्थडे नोटिफिकेशन डिसेबल होतील. यानंतरही तुम्हाला न्यूज फीड पेजवर बर्थडे रिमाइंडर दिसेल मात्र, यासाठी तुम्हाला कोणतंही नोटिफिकेशन येणार नाही. सेटिंग पेजवर जाऊन तुम्ही 'अदर टाइप ऑफ नोटिफिकेशन' जवळ असलेल्या बटनावर क्लिक करून ते बंद करू शकतात.

अशाप्रकारे तुम्ही फेसबुकवर त्रास देणारे सर्व नोटिफिकेशन बंद करू शकतात.

Wednesday, May 24, 2017

चंद्रपूरची पत्रकारिता : काल आणि आज

चंद्रपूरची पत्रकारिता : काल आणि आज

पत्रकारितेची मुर्हुतमेढ
चंद्रपूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांनी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. माजी केंद्रीय अर्थमंत्री शांतारामबापू पोटदुखे, केशवराव नालमवार, रामदास रायपुरे, श्रीधर बलकी, चंपतराव लडके यांच्यासारख्या बुर्जूग पिढीने ही चळवळ पुढे नेली. केशवराव नालमवार यांच्या महाविदर्भ, तर रामदास रायपुरे यांच्या चंद्रपूर समाचार या वृत्तपत्राने पत्रकारांची शाळाच भरविली. पत्रकारितेतील अबकड त्यांनी तरुणपोरांना हात धरून शिकले. त्यांच्या वृत्तपत्रात पेपर वाटणारे बातम्या लिहायला शिकले आणि आज प्रादेशिक वृत्तपत्रात जिल्हा प्रतिनिधी ते संपादक या मोठ्या पदांवर पोहोचले. 2002च्या काळात दत्तात्रेय पत्तीवार यांनी चंद्रधून नावाचे दैनिक सुरू केले. त्यांना फार काळ तग धरता आली नाही. मात्र, वृत्तपत्राचे कार्पोरेट कार्यालय कसे असावे, हे दाखवून दिले. पुढे महाविदर्भही रंगीत झाले. आज त्यापाठोपाठ इतरही दैनिक रंगीत झालेत. आजघडीला साप्ताहिकांची संख्या शेकडोवर गेली आहे. नागपूरातून निघणारे महासागरही चंद्रपूरची स्थानिक आवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशित करीत आहे. सध्या महाविदर्भची धुरा कल्पना पलिकुंडावार, चंद्रपूर समाचारची चंद्रगुप्त रायपुरे, सन्नाटाची बंडू लडके, चंद्रधूनची जबाबदारी पुरुषोत्तम चौधरी पेलत आहेत.

असे घडले दिग्गज
प्रा. सुरेश द्वादशीवार, मदन धनकर यांच्यासारख्या अभ्यासू पत्रकरांनी नवा आयाम दिला. द्वादशीवार सरांनी लोकसत्तानंतर लोकमतचे संपादक म्हणून आजही कार्यरत आहेत. चंद्रपुरातून कारर्कीद सुरू करणारे बरीच मंडळी राज्यात विविध ठिकाणी मोठ्या पदावर आहेत. सुनील कुहीकर यांनी तरुण भारतमध्ये मुंबई ब्युरी चिफ ते मुख्य कार्यकारी अधिकारी, देवेंद्र गावंडे हे नागपूर (संपादकीय प्रमुख) ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नक्षलविषयक वार्तांकन ख्यातनाम आहे. भूपेंद्र गणवीर हे सकाळचे निवासी संपादक म्हणून निवृत्त झाले, तर आनंद आंबेकर हे सकाळच्या जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक राहिले. महाराष्ट्र टाईम्सचे सध्याचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी चंद्रपूरात पत्रकारिता केली नसली तरी त्यांचे शिक्षण याच जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत झाले. लोकसत्तातून प्रारंभ केल्यानंतर त्यांनी सकाळमध्ये वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. याच भूमितले प्रमोद चुंचुवार यांचे नाव महराष्ट्राला परिचित झाले. मुंबई, दिल्लीतील पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी टीव्ही 9ला सहयोगी संपादक म्हणून इनिंग सुरू केली. आज ही सर्व मंडळी वक्ते म्हणूनही दिसतात, हीच या मातीची उपलब्धी आहे.

तरुणांना मिळाली संधी
प्रादेशिक वृत्तपत्राचे पहिले जिल्हा कार्यालय लोकमतने सुरू केले. तेव्हा भूपेंद्र गणवीर यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळली. त्या पाठोपाठ अन्य दैनिकांनीही जिल्हा कार्यालयांची संकल्पना सुरू केली. त्या आधीच्या काळात फोन किंवा फॅक्‍सद्वारे नागपूरला बातम्या कळविल्या जायच्या. जिल्हा कार्यालये सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांची स्पर्धा सुरू झाली. लोकमतनंतर तरुणभारत, नवभारत या दैनिकांनी जिल्ह्यातील बातम्यांसाठी स्वतंत्र पाने सुरू केलीत. या 2002च्या काळात लोकमतला गजानन जानभोर, तरुण भारतला सुनील कुहीकर, लोकसत्ताला देवेंद्र गावंडे तर नवभारतला प्रकाश शर्मा ही दिग्गज मंडळी होती. पुढे जिल्हा कार्यालयांनी जिल्हा प्रतिनिधीसोबत उपसंपादक, शहर वार्ताहर नियुक्ती होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक दैनिकात काम करणाऱ्या तरुणांना कामाची संधी मिळाली. त्यातूनच संजय तायडे, आनंद आंबेकर, संजय तुमराम, महेंद्र ठेमस्कर, रविंद्र जुनारकर, प्रमोद काकडे, प्रमोद उंदिरवाडे, नंदकिशोर परसावार (लोकमत, जिल्हा प्रतिनिधी भंडारा), रवि जवळे, श्रीकांत पेशट्टीवार, मुकेश वाळके, देवनाथ गंडाटे, मंगेश खाटिक, प्रशांत देवतळे, सुशील नगराळे, जितेद्र मशारकर ही मंडळी स्थानिक दैनिकांतून प्रादेशिक दैनिकात आली. अनेक वर्षे पत्रकारितेत योगदान देणारे गजानन ताजणे, अजय धर्मपुरीवार, अरविंद खोब्रागडे, याशिवाय अनेकजण आज शासकीय आणि खासगी नोकरीत आहेत. पंकज मोहिरीर यांनी सामना, सकाळ आणि आता महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात काम करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या अध्ययनातूनच अनेक पत्रकार घडले. सुनील कुहीकर, अरविंद खोब्रागडे, रविंद्र जुनारकर यांनीही पत्रकार घडविण्यासाठी वेळ दिलस.

हिंदी, इंग्रजीतही योगदान
हिंदी पत्रकारितेत गिरिश खत्री गुरुजींनी मोलाचे योगदान दिले. श्रमिक पत्रकार संघाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. हिंदी वृत्तपत्रात पूर्वी केवळ नवभारत हे दैनिक होते. प्रकाश शर्मा यांच्यानंतर संजय तायडे आजही नवभारतीची धुरा पेलत आहेत. लोकमतने हिंदी आवृत्ती सुरू केली तेव्हा पंकज शर्मा यांनी समाचारला जिल्हा प्रतिनिधी होते. पुढे दैनिक भास्करमध्ये ते गेल्यानंतर अरुण सहाय रुजू झाले. हिंदीत मराठी भाषिक तरुणांनीही मोलाचा वाटा दिला आहे. मुकेश वाळके, काही काळ प्रकाश आकनुरवार आणि आता अनेक तरुण कार्यरत आहेत.
पूर्वी हितवाद हे एकमेव इंग्रजी दैनिक होते. फार पूर्वीपासून सुनील देशपांडे आजही कायर्रत आहेत. त्यांच्याच हाताखालून धडे गिरविणारे कार्तिक लोखंडेसह अंजय्या अनापर्ली नागपुरात मोठ्या पदावर आहेत. मजहर अली यांनी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत योगदान दिले. तेलगू भाषिक रमेश कालेपल्ली यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजीत योगदान देत आहेत.

जिद्दीने आले पुढे
वृत्तपत्र म्हटलं की, जिल्हा प्रतिनिधीसह उपसंपादक, वार्ताहर आणि पाने लावण्यासाठी ऑपरेटर असतात. एकेकाळ ऑपरेटर म्हणून कारर्कीर्द सुरू करणारेही आज स्वबळावर शिकून वार्ताहर ते उपसंपादक असा प्रवास गाठला आहे. यात रविंद्र जुनारकर (लोकसत्ता), साईनाथ सोनटक्के (सकाळ), साईनाथ कुचनकर (लोकमत, ठाणे) यांचे नाव पुढे येते.
अनेक शहर वार्ताहर अनुभवाच्या भरवशावर जिल्हा प्रतिनिधी झालेत. मात्र, गावात पत्रकारिता करून पुढे जिल्ह्याच्या स्थानी आलेत. याचीही काही उदाहरणे आहेत. सुनील कुहीकरांनी बल्लारपुरातूनच पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत बल्लापुरात तालुका प्रतिनिधी राहिलेले प्रशांत विघ्नेश्‍वर यांनी जिल्हा कार्यालयात प्रवेश मिळविला. वर्धा तरुण भारतमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिल्यानंतर आता ते लोकशाही वार्तात जिल्हा प्रतिनिधी आहेत. विसापूर येथे वार्ताहर राहिलेले राजेश भोजेकर यांनी लोकमतमध्येच शहर वार्ताहर आणि पुढे वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि परत चंद्रपूर असा प्रवास केलेला आहे. प्रारंभी साप्ताहिक सुरू करून पत्रकारितेत आलेले गोपालकृष्ण मांडवकर यांनी लोकमतमध्येच यवतमाळ, वर्धा, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातून चंद्रपूरमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. चिमूर तरुण भारत तालुका प्रतिनिधी कामाला प्रारंभ करणारे प्रशांत देसाई यांनीही पुण्यनगरी चंद्रपूर आणि आता लोकमत भंडारा येथे कायर्रत आहेत. राजुरा येथे तरुण भारतचे वार्तावर नागेश दाचेवार आत मुंबईचे ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. ही उदाहरणे त्यांच्या जिद्दीचे फळ आहे.


टिव्हीवरही दिसले
पहिला वृत्तवाहिनी पत्रकार म्हणून महेश तिवारी यांनी कामाला प्रारंभ केला. चंद्रपूर आणि गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात त्यांनी तत्कालिन इ-टिव्हीसाठी वार्तांकन केले. त्यांच्यापाठोपाट झी-24 ताससाठी आशिष अंबाडे, पूर्वी स्टार माझात सुनील तायडे, टीव्ही-9मध्ये नीलेश डहाट, सध्याच्या एबीपी माझात सारंग पांडे कायर्रत आहेत. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी राहिलेले संजय तुमराम यांनी सामटीव्हीत प्रवेश घेतला. येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांत सीटी केबल, चंद्रपूर लाइव्ह आणि अन्य केबल न्यूज चॅनेलमुळे कॅमेरेमॅन तयार झाले. अनिल राजू, हैदर आणि अन्य तरुण आज दिसत आहेत.

बातमीसाठी तीदेखील
पत्रकारितेच्या क्षेत्रात महिलांची संख्या फार कमी दिसते. मात्र, कल्पनाताई पलिकुंडावर आजही महाविदर्भची जबाबदारी त्याच ताकदीने पेलत आहेत. चंद्रपूरात अनेक वर्षापूर्वी एका महिलेला साप्ताहिक सुरू केले. पुढे श्रमिक पत्रकार संघाने गौरवही केला. लोकसत्तात राखी चव्हाण, लोकमतला रुपाली टवलारकर, मध्यंतरीच्या काळात वैशाली अलोणे, तुलना येरेकर, नम्रता शास्त्रकार या भगिनींनी योगदान दिले.

श्रमिक पत्रकार संघ झाले तरुण
नागपूर मार्गावरील जुना वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार संघाचे कार्यालय आहे. पूर्वी पत्रकार परिषद घेण्याचे ठिकाण अशी ओळख होती. मात्र, आता ती बदलली. सर्व पत्रकारांच्या हक्काचे ठिकाण अशी ओळख झाली आहे. नवनवीन उपक्रम, मीट द प्रेस, इमारतीची रंगरंगोटी, वार्षिक सहल, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यामुळे कौटुंबिक नात्याचा गोडावा येथे दिसून येतो. श्रमिक पत्रकार संघासह मराठी पत्रकार संघातर्फे तरुण पत्रकारांना बातम्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार, तर ज्येष्ठांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाते.

अनेकजण नागपुरात
चंद्रपूरच्या मातीत जन्म घेऊन येथेच पत्रकारितेचे प्राथमिक धडे घेणारे नागपुरात संपादकपदावर कायर्रत आहेतच. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवून याच भूमिची लेकरे नागपूरात स्थायिक झालीत. यात कार्तिक लोखंडे, अंजय्या अनापर्ली, राखी चव्हाण, देवनाथ गंडाटे, अंकुश गुडावार, इरशाद शेख, मनोज डोमकावळे यांचा समावेश आहे.


- देवनाथ गंडाटे
नागपूर

Tuesday, May 23, 2017

एका बुरुजाची गोष्ट....

एका बुरुजाची गोष्ट....

ढासळलोय, खिळाखिळा झालोय!


इतिहासप्रेमींना माझा सप्रेम नमस्कार!

अहो! मी आहे, चंद्रपूर किल्ला!!!

तसा मी नशीबवान! एक नाही, अनेक त-हेने! गोंडराजांच्या काळात माझा जन्म झाला. तरुणपणात भोसल्यांनी साथ दिली. मात्र, पुढे ब्रिटिशांची जुलमी राजवट मी अनुभवली. जन्मापासून आजवर निसर्गाचा प्रकोप सहन करीत उभा आहे. जिथे गोंडराजे उठले, बसले, चालले, बागडले व नांदले. पण, आज त्या जागा हळूहळू ढासळत आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत. त्या अनेकांना दिसत होत्या. तरीही स्वातंत्र्यानंतरही मी मूकपणे साद देत आलो आहे.
एकेकाळी गोंडकालीन राजवटीत संरक्षणाची जबाबदारी आम्हा बुरुजावर होती. आम्ही ते समर्थपणे पेलत होतो. राजेसाहेबांचा शब्द वाया जात नसे. किल्ल्यावर सर्वसामान्य प्रजा येत नसली तरी, गोंडराजांचे सैनिक टेहळणी करीत असत. विविध शत्रूकडून होणारे आक्रमण आणि संरक्षण बाबत वेळोवेळी मिळणारे निर्देश त्याचे पालन करताना बघितले. तोफ ठेवण्यासाठी उंचवठा तयार केलेला आहे. त्यावर तोफ ठेवून शत्रूसोबत दोन हात करताना बुरुजांनी सैनिकांना साथ दिली. पण, आता वय वाढलंय. मजबुत दगडाची फरसबंदी तितकेच बुलंद "इरादे' सुद्धा मजबूत असले तरी, निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. ढासळलोयः खिळाखिळा झालोयः आता काळजी वाटते मी संपून जाईन, अशीच भिती वाटत आहे. आता माझी पडझड थांबवा! माझी स्मृतीचिन्हे जपा! ही किंचाळी गेल्या अनेक वर्षापासून मी देत आहे. ती ऐकूनच इको-प्रोचे कार्यकर्ते धावून आले.
बुरुजावर, किल्ल्याच्या भिंतीवर वाढलेली वृक्षे, झाडी-झुडुपे यामुळे ठिक-ठिकाणी तडे जाऊन दगड ढासळलेले होते. छाती ताणून रणांगणात पराक्रम गाजविणाऱ्या या योद्धाची आता वृद्धापकाळात काठीचा आधार घेण्याची अवस्था निर्माण झाली होती. इको-प्रोचे कार्यकर्त्यांनी नुसती भेटच दिली नाही, तर प्रत्यक्ष कृतीत स्वच्छता अभियान राबविले. 56 दिवस माझ्या आजारापणावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आस्थेनं विचारपूस केली. तेव्हा राहावले नाही. डोळ्यातून अश्रू गाळताना माझे मलाच बालपण आठवू लागले. तो वैभवशाली काळ नजरेस आला. 550 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला गोंडकालीन किल्ला-परकोटाने वेढलेला. पाच पिढ्यातील गोंडराजांनी हा किल्ला 100 वर्षात बांधला. खांडक्‍या बल्लाळशाह या गोंडराजानी याचा पाया रचला, तर पाचव्या पिढीतील रामशाह गोंडराजांनी किल्ल्याच्या कामास पूर्णत्वास नेऊन चंद्रपूर शहर वसविले.
सात किमी लांबीचा किल्ला. त्यास दोन मुख्य प्रशस्त दरवाजे. दोन उपदरवाजे आणि 5 खिडक्‍या आणि सुमारे 39 बुरुज या किल्ल्यास आहेत. राणी हिराईने गोंडराज्यांच्या राजधानीचे शहर वसविताना भविष्यकालीन नियोजन केले होते. खंडाक्‍या बल्लाळशाह हे बल्लारपूर येथून गोंडराज्याचा कारभार पाहत असताना जंगल भ्रमंती आणि शिकारीसाठी चंद्रपूरच्या जंगल क्षेत्राकडे फिरत असताना हा परिसर त्यांना दिसला. पठाणपुरा गेट या राज्याचे प्रवेशद्वार बघूनच वैभवशाली गोंडराज्याची कल्पना येते. गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याच्या भिंतीस आणि बुरुजावर मोठ-मोठी वृक्ष वाढली आणि खोड-मूळांमुळे तडे गेलेत. अनेक ठिकाणी किल्ला खचला. किल्ल्लयाची हीच दुर्दशा आणि होणारे दुर्लक्ष याकडे जिल्ह्यातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रातील इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभागाने पुढाकार घेऊन पंतप्रधान महोदयांनी सुरु केलेल्या भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान एक मार्च 2017 पासून सुरु केले. इको-प्रो संस्थेच्या नगर संरक्षक दलच्या स्वयंसेवकांच्या मदतीने रोज सकाळी 06:00 ते 10:00 वाजेपर्यंत श्रमदान करून किल्ला स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यात रोज जवळपास 25-30 सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिनबा गेट व जटपूरा गेट व या गेट च्या आजूबाजूच्या किल्ल्‌याच्या भिंती आणि बुरुजावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडण्यात आलेली आहे. सोबतच यावरील कचरा साफ करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. किल्ल्याच्या उंच भिंती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे अडव्हेंचर क्‍लबच्या माध्यमाने रोप बांधून दोरीच्या साहाय्याने वृक्ष-वेली तोडली जात आहे. बऱ्याच वर्षापासून किल्ल्याची काही बुरुजे निर्मनुष्य असल्याने यावर वाढलेली वृक्ष आणि झुडुपात मधमाश्‍याची पोळेसुद्धा आहेत. यामुळे हे अभियान अनेक पद्धतीने जिकरीचे आणि साहसिक झाले. या अभियानास लागणारी साहित्ये लोकसहभागातून संस्थेस नागरिकांनी देऊ केली आहे.

- देवनाथ गंडाटे

Thursday, March 30, 2017

इमोजी : आधुनिक युगाची भाषा

इमोजी : आधुनिक युगाची भाषा

देवनाथ गंडाटे
आपल्या भावना दुसऱ्याला सांगण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. त्यासाठी बोलीभाषेचा वापर होतो. हाच संवाद लिखित स्वरूपात असेल तर लिपीची गरज भासते. मात्र, आनंद, दु:ख, उत्साह, प्रेम, क्रोध, घृणा यासारख्या भावना चेहऱ्यावरून मांडता येतात. या भावना प्रकट करण्यासाठी भाषेची गरज नाही. लिखित किंवा मौखिक भाषेऐवजी बॉडी लॅंग्वेज, इशारा, चित्र आणि चेहऱ्यावरून भावना व्यक्त करता येतात. स्मार्टफोनच्या दुनियेत हाच भाव इमोजीच्या रूपाने आला आहे. जी आजच्या तरुणाईला याड लावत असून, झिंगाट होऊन चॅटिंगमध्ये व्यस्त झाली आहे.
स्मार्टफोनमुळे थेट संवाद दुरावला असला तरी चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी जुळून आहेत. अनोळखीशी मैत्रीसंबंध वाढून संवादाचा नवा मार्ग सुरू झालाय. आपल्या भावना पुढील व्यक्तीला व्यक्तही करू लागले. फोन कॉलपेक्षा मॅसेंजरवर बोलणं अधिक सोयीचे वाटत आहे. या माध्यमांचा वापर करून लिखित स्वरूपाचा संवाद सुरू झाला. फास्ट आणि साधे सोपे मॅसेंजर म्हणून व्हॉट्‌सऍप घराघरांत वापरला जातोय. यूजर्ससाठी नव्या इमोजी आल्यात. त्यामुळे चॅटिंग करताना मजा येते. शब्दांऐवजी चेहऱ्यावरील भावना व्यक्त करण्यासाठी इमोटीकॉन्स किंवा इमोजीचा वापर होत आहे. एखाद्याचा मॅसेज आला की त्यावर शब्दांनी प्रतिक्रिया द्यावी लागते. व्वा, किती छान! प्रतीम, सुरेख किंवा आवडला नसल्यास तशीही कमेंट केली जाते. त्याऐवजी आता चेहऱ्यावरील हावभाव सांगणाऱ्या इमोजीचा वापर होत आहे. यात हसणारा, रडणारा, रागाने लालपीला झालेला, विनोद करणारा, दात दाखविणारा, ताणतणाव सांगणाऱ्या इमोजी आहेत. इतकंच काय, तर ऑल दी बेस्ट, गुड जॉब, वेल डन, छान, मस्त, पटलंय हेदेखील इमोजीच सांगतो. यामुळे कंटाळवाणे वाटणारा चॅटिंग संवाद मजेशीर होत आहे. या इमोजीमुळे आधुनिक युगाची नवीन भाषाच जन्माला आली.
इमोजीचा इतिहास
जपानमधील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी 1999 मध्ये शब्दांतून संभाषण करताना काही चित्ररूप मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. त्यातूनच चित्ररूप संभाषणाची पद्धत रूढ झाली. जपानमधील मोबाईल कंपनीतील अभियंत्यांनी त्यावर संशोधन सुरू केले. डोकोमो या कंपनीने सर्वप्रथम आयमोड नावाची सुविधा देऊन यूजर्सना भावना चित्रात व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याचा उपयोग वेबसेवा, ई-मेल आणि मोबाईलवर उपलब्ध करून दिला.
इमोजीचे फायदे
व्यक्तिगत संभाषणात गुप्तता राहते. सुरक्षितपणे तुम्ही टाइप करू शकता. टाइप करताना शब्द नसल्याने चुका टळतात. तुमच्या भावना शब्दांऐवजी थेट इमोजीतून व्यक्त होतात. संवादातील इमोजी वापरामुळे पुढील व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या हावभावाची कल्पना येते आणि चॅटिंग अधिक रंजक होते.
फेसबुक
या सोशल मीडियावर एखाद्या मित्राच्या पोस्टवर लाइकसह अन्य भावना व्यक्त करण्यासाठी नव्या इमोजी आल्यात. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. लाइक बटणावर क्‍लिक करून होल्ड केल्यास “रिऍक्‍शन दाखविणाऱ्या इमोजी येतात. यात सहा प्रकारच्या नव्या इमोजी आहेत. लव्ह, हाहा, वाव, सॅड, आणि अँग्री अशी बटणे आहेत. याद्वारे एखाद्या पोस्टवर राग, प्रेम, आश्‍चर्य, दु:ख अशा भावना व्यक्त करता येतात.
व्हॉट्‌सऍप
थेट व्यक्तिगत आणि सांघिक संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्‌सऍपने क्रांती केली. यात अनेक मॅसेजच येतात. त्यातही इमोजीचा वापर करून संवादाला चित्रमय करता येते. अधिक शब्दात माहिती देण्याऐवजी इमोजीचा वापर करून सोप्या आणि सहज पद्धतीने व्यक्त होता येते. मित्रांना जर, मी गावाला जात आहे, हे सांगायचे असल्यास तो प्रवास साधनाच्या इमोजीतून व्यक्त होतो. किंवा एखादा मॅसेज वाचून खूप हसू आल्यास हसून हसून डोळ्यात पाणी आले, हे सांगणारंही इमोजी आहे. व्हॉट्‌सऍपमध्ये इमोजीचे आठ ऑप्शन दिले आहेत. यात एकूण दीड ते दोन हजारादरम्यान इमोजी आहेत. याच इमोजी फेसबुक मॅसेंजर ऍपवरही आहेत.
इमोजीचे प्रकार
1. हसणारे, रडणारे व्यक्तिचित्रे
2. प्राणी, पक्षी, वृक्ष, फुले, पर्यावरण
3. फळे, खाद्यपदार्थ, शीतपेय
4. क्रीडा, संगीत
5. वाहने, इमारती
6. चैनीच्या व शैक्षणिक वस्तू
7. हार्टस, सिम्बॉल, आकडे
8. विविध देशांतील राष्ट्रध्वज
चला वाचवूया चंद्रपूरचा किल्ला

चला वाचवूया चंद्रपूरचा किल्ला

इको प्रो संस्थेच्या नगरसंरक्षक दलामार्फत जतन मोहिम

चंद्रपूर शहरास ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला- परकोटाने वेढलेले आहे. 550 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला आजही भक्कम असून, वैभवशाली गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. चंद्रपूर येथील पाच पिढ्यातील गोंडराजांनी हा किल्ला 100 वर्षांत बांधून घेतला. खांडक्‍या बल्लाळशाह या गोंडराजानी याचा पाया रचला, तर पाचव्या पिढीतील रामशाह गोंडराजांनी किल्ल्याच्या कामास पूर्णत्वास नेऊन चंद्रपूर शहर वसविले.
सात किमी लांबीचा किल्ला असून, यास 2 मुख्य प्रशस्त दरवाजे, दोन उप दरवाजे आणि पाच खिडक्‍या आणि अनेक बुरुज या किल्ल्यास आहेत. गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्याच्या भिंतीस आणि बुरुजावर मोठ-मोठी वृक्ष वाढली होती. शिवाय किल्ल्यास तडेही गेलीत. बऱ्याच ठिकाणी किल्ला खचल्याने त्या भागातून किल्ल्याचे अवशेषसुद्धा नष्ट झालेले आहेत. किल्ल्याच्या भिंतीवर, मुख्य दरवाज्यावर आणि बुरुजावर अनेक वृक्ष-वेली वाढलेल्या आहेत. ही वृक्ष मोठी झाली कि, भिंतींना तडे जातात. भिंती ढासळतात, नष्ट होतात. अश्‍या नष्ट झालेल्या किल्ल्याच्या भिंती, ऐतिहासिक वास्तू अतिक्रमणाखाली येतात आणि मग, उरल्या- सुरल्या इतिहासाची ओळख करून देणारी अवशेषे सुद्धा काळाच्या पडद्याआड जातात. अश्‍या अवस्थेत आपला इतिहास जिवंत ठेवणे, वास्तूचे जतन करणे काळाची गरज आहे.
किल्ल्याची हीच दुर्दशा आणि होणारे दुर्लक्ष याकडे जिल्ह्यातील पर्यावरण तथा सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली इको-प्रो संस्थेच्या "इको-प्रो पुरातत्व संवर्धन विभाग' ने पुढाकार घेऊन मा. पंतप्रधान महोदयांनी सुरु केलेल्या "भारत स्वच्छता अभियान' अंतर्गत "चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान' 1 मार्च 2017 पासून सुरू केले.

इको-प्रो संस्थेच्या "नगर संरक्षक दल'च्या स्वयंसेवकांच्या मदतीने रोज सकाळी 06:00 ते 10:00 वाजेपर्यंत श्रमदान करून "किल्ला स्वच्छता अभियान' राबविले जात आहे. यात रोज जवळपास 25-30 सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत. आतापर्यंत पठाणपुरा गेट, बिनबा गेट व जटपूरा गेट व या गेटच्या आजूबाजूच्या किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजावरील वाढलेली वृक्ष-वेली तोडण्यात आली. सोबतच यावरील कचरा साफ करून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. किल्ल्याच्या उंच भिंती असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे "अडव्हेंचर क्‍लब' च्या माध्यमाने रोप बांधून दोरीच्या साहाय्याने वृक्ष-वेली तोडली जात आहे. बऱ्याच वर्षांपासून किल्ल्याची काही बुरुजे निमर्नुष्य असल्याने यावर वाढलेली वृक्ष आणि झुडुपात मधमाश्‍याची पोळे सुद्धा आहेत. यामुळे हे अभियान अनेक पद्धतीने जिकरीचे आणि साहसिक झाले आहे. या अभियानास लागणारी साहित्ये लोकसहभागातून संस्थेस नागरिकांनी देऊ केली आहे.

केवळ चंद्रपूर शहर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला ऐतिहासिक-धार्मिक पार्श्वभूमी लाभली आहे. पुरातत्वीय दृष्ट्या हा जिल्हा महत्वाचा आहे. डोळस श्रद्धा आणि वैभवसंपन्न इतिहास याची ओळख आजच्या पिढीला करून देण्याचा गरजेतून इको-प्रो संस्थेने "पुरातत्व संवर्धन विभागाची' निर्मिती केली. वास्तविक वारसा जपण्याची त्याचे संवर्धन करण्याची व त्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठीच पुरातत्व विभागाची निर्मिती आहे. पण जबाबदाऱ्या आणि कर्तव्यपालनात होणारी कुचराई या ऐतिहासिक, धार्मिक वारसाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे. किल्ले, मंदिरे, समाधींच्या भोवती साचलेला कचरा, वाढलेली झुडपं, पुरपण्यामुळे ढासळणारे चिरे, तिथे वावरणारी असामाजिक तत्वे, या साऱ्यांची डोळस नोंद, डोळस सदस्यांच्या मदतीने घेऊन नागरिकांचे, शासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे तर शक्‍य तेवढी स्वच्छता राखण्यासाठीही इको-प्रो झटत आहे

 - बंडू धोतरे

 इको-प्रो संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी