সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 09, 2018

दोषसिध्दीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर पोहोचवा: मुनगंटीवार

 सायबर क्राईम जनजागृतीचा पालकमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना शासन करण्यामध्ये आघाडी घेतली आहे. दोषसिध्दी मध्ये जिल्ह्याचा महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आहे. मात्र पोलीस प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सवलती उपलब्ध केल्या जात आहे. या दलामध्ये कार्यक्षमताही प्रचंडच आहे. त्यामुळे आगामी काही काळात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने दोषसिध्दी मध्ये जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर पोहोचवावे असे आव्हान राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. येथे नागरी सुरक्षा दल यांना सायकल वाटप बॅरिकेट्स वाटप व सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाची सुरुवात चंद्रपूर पोलीस प्रशासनाने एका कार्यक्रमाद्वारे केली.  
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत उपस्थित होते. मा.सा. कन्नमवार स्मृती सभागृहामध्ये झालेल्या एका शानदार समारंभात जिल्ह्याभरातील नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांना सायकलचे वाटप करण्यात आले मुल राजुरा गडचांदूर या भागासाठी मिळणाऱ्या नक्षल निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलिस प्रशासनाने आजच जिल्हाभरात सायबर क्राईम जनजागृती उपक्रमाला सुरुवात केली आहे.
मोबाईल वर येणारे फसवे मेसेज, एटीएम साठी होणारी फसवणूक, बँकेच्या अकाऊंट संदर्भात मागितली जाणारी बेमालूम माहिती, महिला, बालके वरिष्ठ नागरिकांची मोबाईल वरून होणारी फसवणूक यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जनजागृतीला सुरुवात केली आहे. यासाठी एक सुसज्ज चित्ररथ तयार करण्यात आला असून यामध्ये अनेक माहितीपट दाखविले जाणार आहे. सोबतच जिल्हा पोलिस प्रशासनाने सायबर क्राईम जनजागृती संदर्भात मोठ्या प्रमाणात साहित्य तयार केले असून त्याचे वाटप सुद्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केले जाणार आहे. यासंदर्भातील एका चित्ररथाला आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिक सुरक्षा समितीच्या सदस्यांना संबोधित केले.पोलीस विभागाला जिल्ह्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून नागरी सुरक्षा दलाच्या मार्फत पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच भर पडणार आहे पोलिसांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा चे जाळे घट्ट केले जाईल. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सुलभ होईल. महाराष्ट्राच्या पोलिस विभागातील ज्या काही अद्यावत सुविधा असतील त्या सर्व चंद्रपूर पोलीस प्रशासनाला मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी नागरी सुरक्षा समितीने पोलिसांचे डोळे आणि कान व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना सर्वकाही पोलीस करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे असून या देशाचे जागरूक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाची काही कर्तव्य आहेत. अशा सुजाण नागरिकांमध्ये आपला जिल्हा घडल्या जाईल यासाठीच सायबर क्राईम जनजागृती उपक्रम जिल्ह्यात सुरू झाला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. नव्यायुगातील सायबर क्राईम मधील धोक्यांपासून सावध व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमराज सिंह राजपूत यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन पोलीस इन्स्पेक्टर विकास मुंडे यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.