काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 29, 2011

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

मराठी साहित्य संमेलनस्थळी साकारणार गोंडकालीन वैभव

चंद्रपूर - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. चारही परकोट आणि महत्त्वपूर्ण वास्तूंच्या प्रतिकृती साकारण्यात येतील.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत असून, मुख्य संमेलनस्थळाला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी' असे नाव देण्यात येणार आहे. शहराच्या रचनेनुसार प्रवेशाच्या ठिकाणी चार दिशांना चार प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राहणार असून, अन्य प्रवेशद्वारांना लोकनेते दादासाहेब देवतळे, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे पहिले अध्यक्ष तथा माजी खासदार अब्दुल शफी यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपास महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते मा. सा. ऊर्फ दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात येणार असून, मंडपाच्या दोन्ही द्वारांना दिवंगत राज्यमंत्री वामनराव गड्डमवार व दिवंगत आमदार नामदेवराव पोरेड्डीवार, तर दुसऱ्या सभामंडपास श्रीमती लताबेन छोटूभाई पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठास 1857 नंतर गोंडवनातील स्वातंत्र्यसमराचे अग्रणी वीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात येणार आहे. 1979 साली चंद्रपुरात संपन्न झालेल्या 53 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास वीर बाबूराव शेडमाके यांचेच नाव देण्यात आले होते, हे विशेष!
संमेलनात ग्रंथप्रदर्शन प्रमुख आकर्षण असून, त्याला दिवंगत कवयित्री श्रीमती कमलादेवी दीक्षित यांचे नाव देण्यात येणार आहे. पत्रकार दालनास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विद्यावाचस्पती राम शेवाळकर यांचे नाव, भोजन दालनास दिवंगत नगराध्यक्ष राजमलजी पुगलिया यांचे नाव, कवी कट्ट्यास दिवंगत राज्यमंत्री यशोधरा बजाज यांचे, तर प्रकाशन कट्ट्यास दिवंगत राजे विश्‍वेश्‍वरराव महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.

Wednesday, December 21, 2011

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

विकास आमटे यांना चंद्रपूर भूषण

आनंदवन - वरोरा ( चंद्रपूर) , महारोगी सेवा समितीचे सचिव विकास आमटे यांना यंदाचा चंद्रपूर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आत्मसन्मानाचा हुंकार जागवून त्यांना जगण्याचे नवे बळ देणारे बाबा आमटे आता आपल्यात नाहीत. पण त्यांची स्वप्ने, त्यांनी दिलेली प्रेरणा आजही विकास आमटे पुढे नेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिक येथे केसरी टूर तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर भूषण पुरस्कार येत्या १ जानेवारीला समाज सेविका मेधा पाटकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल.


Friday, December 09, 2011

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

जन्मदिनाच्या आनंदावर मृत्यूची छाया

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
गोंदिया - एक डिसेंबर रोजी मनोज बिंझाडे यांचा 31 वा वाढदिवस होता. पत्नीने सकाळीच फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस सेवेत यश येवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थनाही केली. मात्र, नियतीला त्यांच्या जन्मदिनाचा आनंद मान्य नव्हता. अवघ्या दोन-तीन तासांतच पुन्हा फोन खणखणला आणि पोलिस ठाण्यातून आलेल्या निरोपाने सर्वांच्या काळजाचे तुकडे झाले. मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली अन्‌ पत्नी अरुणासह कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला.



देवरी तालुक्‍यातील धमदीटोला-गणूटोलाजवळील जंगलात माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मनोज आत्माराम बिंझाडे (वय 31) हा जवान गुरुवारी शहीद झाला. मनोज मूळचे गोंदिया तालुक्‍यातील चांदणीटोला येथील रहिवासी होते. चांदणीटोला हे गाव गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. चार वर्षांपूर्वी मनोज पोलिस सेवेत दाखल झाले. कवलेवाडा येथील अरुणासोबत त्यांनी काही वर्षांपूर्वीच विवाह केला होता. वडील आत्माराम बिंझाडे हे पोलिस मुख्यालयाच्या शेजारीच चप्पल दुरुस्तीचे काम करतात. आई आणि अन्य दोन भावंडे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा जन्म एक डिसेंबर 1980 रोजी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मनोजला वायरिंग, जनरेटरचे काम अवगत होते. 29 सप्टेंबर 2007 मध्ये ते गोंदिया पोलिस दलात रुजू झाले. 26 मार्च 2010 रोजी सशस्त्र दूरक्षेत्र गणूटोला येथे नेमणूक झाली. नक्षलविरोधी अभियानात ते उत्कृष्ट दर्जाचे पायलट म्हणून कर्तव्य बजावत होते. बुधवारी (ता. 30) मनोज गावी येऊन गेले. तेथून कवलेवाडा येथे सासरीही गेले. दुसऱ्याच दिवशी एक डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त रजा घ्या, अशी विनंती पत्नी अरुणाने केली. मात्र, ड्यूटीमुळे त्यांना थांबता आले नाही. गुरुवारी वाढदिवसानिमित्त पत्नीने मनोजला फोन केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आई आणि वडिलांसोबतही ते बोलले. आपली खुशाली कळविली. मी लवकरच रजा घेऊन गावाकडे येईन, असे आश्‍वासन देत त्यांनी फोन ठेवला. वाढदिवसानिमित्त सर्वत्र आनंद असताना त्याच दिवशी काही विपरीत घडेल, असे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. मात्र, नियतीने आपला खेळ अखेर खेळला. देवरी तालुक्‍यातील गणूटोला येथील आउटपोस्ट चौकीवर कार्यरत मनोज आणि त्यांचे सहकारी शाळेवर लावलेले नक्षलपत्रक काढण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात ते जागीच शहीद झाले. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली. ही दु:खद बातमी कानी पडल्यानंतर शहरापासून जवळच राहणाऱ्या चांदणीटोला येथील कुटुंबीयांना धक्काच बसला. मनोजच्या मागे पत्नी अरुणा (वय 25), आई मेहतरीन (वय 50), वडील आत्माराम (वय 55), मोठा भाऊ मयनलाल, लहानभाऊ चैनलाल, विवाहित बहीण सत्यशीला तरवरे असा परिवार आहे.



वडिलांचे स्वप्न

शहीद मनोजचे वडील आत्माराम बिंझाडे हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी चप्पल दुरुस्तीचे काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते खाकीवर्दीतील पोलिसांच्या बुटांना पॉलिश करताना आपलाही मुलगा पोलिस व्हावा, असे त्यांना वाटायचे. मनोजने ते स्वप्न पूर्ण केले. मात्र, बुटांना पॉलिश करीत असतानाच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून मनोज शहीद झाल्याची बातमी कानावर पडली आणि वृद्ध वडिलाच्या काळजाचे तुकडेच झाले. संबंधित बातम्या

गोंदिया जिल्ह्यात पोलिस-माओवाद्यांत चकमक
पोलिस चकमकीत दोन माओवादी ठार
मशानझुरवाच्या जंगलात पोलिस-माओवादी चकमक
खोटी माहिती देऊन साधला गेम
पोलिस- माओवाद्यांच्या चकमकीत एक जवान शहीद, पाच गंभीर



प्रतिक्रिया

On 03/12/2011 09:57 AM amit babhulkar said:

देशासाठी शहीद झालेल्या मनोज बिझांडे यांना सलाम वंदे मातरम

 
manoj binzade
गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

गोंदिया जिल्ह्यात विशेष पथकाचे छापे

सकाळ वृत्तसेवा
Tags: gondia, illegal business, vidarbha

गोंदिया - अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात मागील पाच महिन्यांपासून कार्यरत विशेष पथकाने मोठी कामगिरी केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात 12 कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाने नोव्हेंबर महिन्यात मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अवैध दारू, जुगार, वाळूचोरी, प्राण्यांची विक्री अशा सामाजिक गुन्ह्यांच्या संबंधित गैरप्रकारांवर आळा बसत असल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे घालून पंचवीस आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 43 हजार 465 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. गायत्रीनगर येथे आठ जणांना अटक करून 38 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. डांगोर्ली येथे आठ जुगाऱ्यांकडून दुचाकीसह 96 हजार रुपयांचा माल, एकोडी येथे नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यावर आळा घालण्यासाठी 14 ठिकाणी छापे घालण्यात आले. यात 14 आरोपींकडून 57 हजार 532 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील जांभळी, पाटेकुर्रा, कामठा, भवानी चौक, सिंधी कॉलनी, आंबेडकर चौक, सिल्ली, गांगला, म्हसगाव, बनाथर, पारडीबांध, नवेझरी येथे छापा घालण्यात आली होती. यात काही महिला आरोपीही सापडल्या.



शहरातील अनेक हॉटेल्समध्ये घरगुती वापराचे गॅस वापरण्यात येते. बेकायदेशीररीत्या वापरण्यात येणाऱ्या या सिलिंडरवर आळा घालण्यासाठी दोन हॉटेल्सवर छापे घालून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख 22 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मागील महिन्यात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्याबाजारात विकत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष पथकाने पांजरा येथे छापा घालून तो माल जप्त केला. रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी छापे घालण्यात आले.
जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांशी जोडून असल्याने येथून जनावरांची अवैध वाहतूक होते. जनावरांची कत्तल रोखण्यासाठी पथकाने मुंडीपार, कोहमारा येथे गस्त घालून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा जनावरे जप्त करण्यात आली. शहरात वाहन चोरट्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यावरही नियंत्रण ठेवण्याचे काम हे विशेष पथक करीत आहे. विनापरवाना चालणाऱ्या चायनीज, नुडल्स, चिरंजी कारखान्यावर छापे घालण्यात आले. तिथून 72 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

गोंदियाचे माजी नगराध्यक्ष आजही झोपडीतच

देवनाथ गन्डते
गोंदिया - चारदा नगरसेवक आणि 12 महिने नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळून शहरात अनेक विकासात्मक योजना राबविल्या. मात्र, स्वतःच्या मोडक्‍या-तोडक्‍या झोपडीची कधी डागडुजी केली नाही. आजही त्याच कैलारू छपराच्या निवाऱ्यात आई आणि पत्नीसह जीवन जगत आहे. रमेश ठवरे असे या निःस्वार्थी राजकारणी पुढाऱ्यांचे नाव आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत ते प्रभाग नऊमधून उमेदवार असून, संपत्तीच्या घोषवाऱ्यात त्यांनी रोख किंवा बॅंकेत कोणतीही रक्कम नसल्याची माहिती दिली आहे.



राजकारण एक व्यसन आहे. त्यामुळे राजकारणात येणारा प्रत्येक माणूस आर्थिकदृष्ट्या संपन्नच असावा लागतो. निवडणूक काळात होणारा खर्च अनेक पुढारी सत्तेच्या खुर्चीवरून काढत असतात. शिवाय मत्तेदारी वाढवून छप्पराच्या घरांना सिमेंटचा थर चढवितात. राजकारणामुळे गरिबीतून गर्भश्रीमंत झालेले अनेक उदाहरण आहेत. मात्र, येथील माजी नगराध्यक्ष रमेश ठवरे अपवाद ठरले आहेत. 1984-85च्या काळात ते तरुण होते. पंचविशीतील तरुणांच्या आग्रहाखातर त्यांनी पहिल्यांदा पालिकेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना यश आले. येथूनच त्यांच्या राजकीय कार्याला सुरवात झाली. पाच वर्षे वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडविल्याने पुन्हा निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. अशी 20 वर्षे त्यांनी सतत एक रुपयासुद्धा खर्च न करता विजय मिळविला. यादरम्यान त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिली होती. 1995 मध्ये नगराध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्यांनी राजकारणाचा बाणा अंगी बाळगला नाही. केवळ समाजकारण हेच उद्देश ठेवून मतदारांचे प्रेम जिंकले आहे. शास्त्री वॉर्डात त्यांचे जुने घर आहे. ते आजही त्याच कौलारू झोपडीत आई आणि पत्नीसह राहतात. नगरसेवक, सभापती आणि नगराध्यक्षपद भूषविल्यानंतरही त्यांनी कधी पैशाची लासला बाळगलेली नाही. त्यामुळे ते सतत विजयी होत राहिले. मात्र, घराची डागडुजी तशीच राहून गेली. त्यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. नगराध्यक्ष असतानादेखील शासकीय वाहनाचा खासगी कामासाठी वापर केलेला नाही. सक्रिय राजकारणातील हा आदर्श पाहून यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपने तिकीट दिली आहे. यातही ते कोणताही पैसा खर्च न करता प्रचार करीत आहेत.



पालिकेत इतकी वर्ष नगरसेवक, नगराध्यक्ष राहिले. मात्र, घराची दुरुस्ती, चैनीच्या वस्तू, दुचाकी घेण्याचा विचार त्यांनी केलेला नाही. त्यांच्या निःस्वार्थी समाजकार्यामुळे मी खूश आहे.


- अनुपमा ठवरे (पत्नी)

Sunday, November 06, 2011

शताब्दीतील कृषी संशोधन केंद्र

शताब्दीतील कृषी संशोधन केंद्र

1911मध्ये सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. सुरवातीला ऊस लागवड व संशोधन हा केंद्राच्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, त्यानंतर कृषी हवामान, पर्जन्य
मान यांचा विचार करून विभागाच्या निकडीप्रमाणे भात बीजोत्पादन व संशोधनाचे कार्य 1922पासून सुरू करण्यात आले. 1970पासून हे केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आले. विदर्भातील भात संशोधनाचे हे मुख्य केंद्र आहे.


पूर्व विदर्भ विभागाकरिता 1984पासून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांतर्गत कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही, साकोली, नवेगांवबांध, आमगांव व सोनापूर केंद्राचा समावेश आहे.

विभागीय कृषी संशोधन केंद्रात पूर्व विदर्भ विभागास उपयुक्‍त भात (धान) जातींची निर्मिती करणे, धान व धानावर आधारित पीक पद्धतीचे संशोधन करणे व मशागत तंत्रज्ञान विकसित करणे, धानाच्या निरनिराळा जातीची रोग व किडी बाबत प्रतिकारकता पडताळून पाहणे, धानावरील रोग व किडीसाठी नियंत्रणाचे उपाय शोधून काढणे, मूलभूत, पायाभूत व सत्यप्रत धान बीजोत्पादन करणे, विकसित कृषी तंत्रज्ञानाचा विस्तार करणे आदी उपक्रम घेतले जातात.

संशोधन केंद्रावर सध्या भात पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, युरिया डीएपी ब्रिकेट्‌सचा वापर, गिरीपुष्प व गराडी पाल्याचा उपयोग, रासायनिक खताचा संतुलित वापर, अधिक उत्पादनासाठी "श्री' पद्धतीचा वापर करून निरनिराळा वाणांचा प्रतिसाद पडताळून पाहणे, भाताच्या नवीन सुधारित व संकरित अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे त्यावर आधारित पीक पद्धतीचे संशोधन, भाताच्या निरनिराळ्या जातीची रोग व कीड प्रतिकारकता पडताळून पाहणे, सेंद्रिय, जैविक व रासायनिक खताचा उपयोग, धानानंतर दुबार पिकासाठी पूरक सिंचनाच्या वापराबाबत संशोधन, विद्यापीठाने शिफारस केलेले तंत्रज्ञान अवलंबनामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास, इत्यादी संशोधनाचे कार्य सुरू आहे. याव्यतिरिक्‍त कृषी मेळावे, शिवार फेरी, प्रदर्शन, चर्चासत्रे, विविध पिकांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षणाचे आयोजन, शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन, त्याचप्रमाणे वृत्तपत्र, शेतकरी मदत वाहिनी दूरध्वनीद्वारे, आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी प्रसार माध्यमाद्वारे येथील शास्त्रज्ञांद्वारे सुधारित कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य या विभागात सुरू आहे.



कृषी हवामान सल्ला सेवा योजना

कृषी हवामान सल्ला सेवा योजनेची सुरवात डिसेंबर 1995 मध्ये विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे झाली. या योजनेस भारत सरकारच्या विज्ञान आणि प्राद्योगिक विभाग, राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान अंदाज केंद्र, नोयडा नवी दिल्लीमार्फत अर्थसाहाय्य पुरविले जाते. कृषी हवामान सल्ला सेवा योजनेअंतर्गत प्रत्येक आठवड्याच्या दर मंगळवारी विभागीय कृषी संशोधन केंद्रामार्फत हवामान अंदाजावर शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विविध कामाबाबतचा संदेश प्रसारित केला जातात.



भात पैदास

भाताच्या विविध जाती निर्माण करणे, विविध वाणाच्या चाचण्या घेणे व बियाणे उत्पादन करणे इत्यादी कार्य या केंद्रावर सुरू आहेत. त्याचप्रमाणे भात पिकाचे बीजोत्पादन व लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य येथील शास्त्रज्ञांमार्फत सुरू आहे. विद्यापीठाद्वारे सुधारित धान जातींचा विकास केला आहे. यात सिंदेवाही, साकोली, पीकेव्ही एचएमटी, पीकेव्ही मकरंद, पीकेव्ही गणेश, पीकेव्ही खमंग आदी यांचा समावेश आहे.



कृषी विस्तार उपक्रम

सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्र फेब्रुवारी 2000पासून पुर्नगठित व एप्रिल 2004पासून स्थायी स्वरूपात कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विस्ताराचे कार्य केंद्राद्वारे केले जाते. यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर प्रथमरेषीय प्रात्यक्षिके, शेतीदिन, प्रर्दशनीचे आयोजन, शेतकरी, ग्रामीण युवक व युवती, विस्तार कर्मचारी यांना कृषी विषयक प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगार संबंधी प्रशिक्षण, चर्चासत्रे, किसान मेळावा, शिवार फेरी व किसान गोष्टी इत्यादींचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी "किसान हेल्प लाइन' पाच वर्षापासून कार्यरत आहे.



--

Devnath Gandate

Reporter Sakal Newspaper

chandrapur

9922120599



http://kavyashilpa.blogspot.com













Wednesday, November 02, 2011

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 75 टक्के जलसाठा

चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी 75 टक्के जलसाठा

चंद्रपूर - यंदा उशिरा आणि अनियमित पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यांची पातळी दरवर्षीपेक्षा खालावलेली आहे. गत पाच महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजेच केवळ 82. 6 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सिंचन प्रकल्पात 75 टक्केच जलसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
जून-जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने पेरणी आणि रोवणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कोरडी पडलेली जलाशये भरून निघाली नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोनच महिन्यात पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 1194.3 मिमी. पावसाची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात 996 मिमी. इतका पाऊस झाला. ऑगस्टमध्ये आसोला, इरई, घोडाझरी हे प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दगा दिल्याने ऑक्‍टोबर अखेरपर्यंत जलसाठे 75 टक्‍क्‍यांच्या पुढे गेलेले नाहीत. इरई धरणाची जलक्षमता 160 दशघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत 155 दशघमी म्हणजेच 97 टक्के पाणी उपलब्ध आहे. यातून महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराची तहान भागविली जाते. याच जलसाठ्यावर 2012 मधील उन्हाळ्यातील तहान भागवायची आहे. 56 दशघमी क्षमता असलेल्या सावली तालुक्‍यातील आसोला मेंढा तलावात 35 दशघमी (61 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या तलावावर रब्बीची भिस्त असून, सावली, मूल, पोंभूर्णा तालुक्‍यातील शेतकरी अवलंबून आहेत. याच तलावात गतवर्षी 41 दशघमी इतका जलसाठा होता. 2009 मध्ये केवळ 7 दशघमी इतका अल्पसाठा राहिल्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. 140 दशघमी सिंचनक्षमता असून, आजच्या स्थितीत 106 दशघमी जलसाठा आहे. मागील आठवड्यात 118 दशघमी जलसाठा होता. त्यात 12 दशघमी पाण्याची घट झालेली आहे. 2009 मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने केवळ 45 दशघमी इतका कमी साठा शिल्लक होता. याशिवाय 88 लघू प्रकल्प असून, 103 दशघमी क्षमता आहे. आज 67 दशघमी पाणी शिल्लक आहे.

प्रकल्प........क्षमता........उपलब्ध साठा

(दशघमीमध्ये)

इरई..........160.........155

आसोलामेंढा.....56.......34

मध्यम प्रकल्प....140......106

लघू प्रकल्प..........103........67

Tuesday, November 01, 2011

फॅन्सीचे आकर्षण; घोंगडीनिर्मात्यांवर उपासमार

फॅन्सीचे आकर्षण; घोंगडीनिर्मात्यांवर उपासमार

चंद्रपूर - नव्या आकर्षक डिझाईनची वस्तू बाजारात आल्या की जुन्या कितीही चांगल्या असल्यातरी अर्थ उरत नाही. हिवाळ्याच्या दिवसात थंडीपासून बचाव करणारे लोकरी कपडेही प्रत्येकाला नवे कोरे पाहिजे आहे. बाजारात तिबेटीयननिर्मित लोकरी वस्तू विकू लागल्या आहेत. त्यामुळे लोकरीपासून कापड तयार करणाऱ्या धनगरांवर आता उपासमार आली आहे.

वाढते औद्योगिकीकरण कुटीर उद्योगांना ग्रहण ठरत आहे. एकेकाळी मागणी असणाऱ्या घोंगडी उद्योग यांत्रिकीकरणामुळे हतबल ठरला आहे. मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी, मफलर, स्वेटर, बसण्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. मेंढीपासून मिळणारी लोकर पिंजून काढल्यानंतर कुटुंबातील सदस्य चरख्यावर धागे काढून सुताच्या कांड्याना पाटी, ताना म्हणून पसरवीत. त्यावेळी ती 10 फूट लांब असते. नंतर ती मागावर लावून लांबीचे थान तयार होतात. याला पट्टी म्हटले जाते. दोन पट्ट्यांना जोडून एक घोंगडी तयार होते. ग्रामीण भागात घोंगडीला मागणी आहे. मात्र, शहरी भागात रेडिमेडची मागणी असल्याने विक्रीत मोठी घट झाल्याचे नवरगाव येथील व्यावसायिक शंकर कन्नावार यांनी सांगितले.



जिल्ह्यातील नवरगाव, नागभीड, वाढोणा, चांदापूर, खेडी, चिचबोळी, चांदली, गडीसुर्ला, जुनासुर्ला, नांदगाव, बेंबाळ, भंगाराम तळोधी, मूल शहरात, गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा, रामाळा, सगणापूर, चामोर्शी, तर भंडारा जिल्ह्यातील चिंचाळ, जैतपूर, नेरला, गोसे, रोहा, सिलेगाव, सिहोरा, मांढळ, मिटेवानी, खैरी, दांडेगाव, खापरी, पाथरी, तिरोडी येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. यातील बोटावर मोजण्याइतकेच कुटुंब घोंगडी उद्योग करतात. नवरगाव आणि खेडी येथे स्वेटर आजही तयार होत आहेत. मात्र, फॅन्सी आणि रेडिमेड कपड्यांमुळे व्यवसायाची गती मंदावली आहे. नवरगाव येथे सुकरू सिंगिरवार, जुनासुर्ला येथे मारुती कोरेवार, भंगाराम तळोधी येथील बिरा येग्गेवार, गडचिरोली येथील सुकरू कंकलवार आजही याच व्यवसायावर जीवन जगत आहेत.

Wednesday, September 28, 2011

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट



चंद्रपूर - महाविद्यालयातील वसतिगृहातून निघणारा कचरा एरवी रस्त्यावर फेकून दिला जायचा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न होता; मात्र प्राचार्यांच्या सुपीक डोक्‍यात एक कल्पना आली आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला प्रयोग साकार झाला. विद्यार्थ्यांनीच फेकलेल्या कचऱ्यातून त्यांच्याच वसतिगृहातील खोल्यांमध्ये आता लखलखाट होत आहे.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा प्रयोग साकार झाला आहे. "बायोमॉस टू इलेक्‍ट्रिसिटी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तीन वर्षांआधी या महाविद्यालयात सुरू करण्यात आला. पूर्ण क्षमतेने तो सुरू आहे. 15 किलोवॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. या विजेचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होत आहे. यासाठी वसतिगृहातील केरकचरा आणि शौचालयातील मलमूत्राचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शंभर किलोवॉटचा प्रकल्प येथे लावण्यात आला आहे. यासाठी 121.5 टन कचऱ्याची रोज आवश्‍यकता आहे. याला चंद्रपूर नगरपालिका पूर्ण सहकार्य करीत आहे. रोज न चुकता शहरातील गोळा केलेला कचरा महाविद्यालयात आणून टाकला जात आहे. या कचऱ्यातून "वेस्ट' वेगळे करण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा 25 लाख रुपयांचा प्रकल्प आहे. डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. यावर स्वत: महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणारे विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला महिन्याकाठी तीन लाख रुपये वीजबिल येते. आता हा आकडा कमी होईल, असे दीक्षित यांनी सांगितले. यासोबतच एकट्या वसतिगृहाचे वीजबिल 15 हजार रुपयांच्या घरात होते. आता ते शून्यावर आले आहे. विशेष असे की, काही वर्षांपासून या महाविद्यालयात अक्षय ऊर्जा पार्क सुरू करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत येथे सहा किलोवॉटचा सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे.
आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट

आता कचऱ्यापासून वसतिगृहात लखलखाट



चंद्रपूर - महाविद्यालयातील वसतिगृहातून निघणारा कचरा एरवी रस्त्यावर फेकून दिला जायचा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठाच प्रश्‍न होता; मात्र प्राचार्यांच्या सुपीक डोक्‍यात एक कल्पना आली आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिला प्रयोग साकार झाला. विद्यार्थ्यांनीच फेकलेल्या कचऱ्यातून त्यांच्याच वसतिगृहातील खोल्यांमध्ये आता लखलखाट होत आहे.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा प्रयोग साकार झाला आहे. "बायोमॉस टू इलेक्‍ट्रिसिटी' हा कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प तीन वर्षांआधी या महाविद्यालयात सुरू करण्यात आला. पूर्ण क्षमतेने तो सुरू आहे. 15 किलोवॉट वीजनिर्मिती सध्या होत आहे. या विजेचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होत आहे. यासाठी वसतिगृहातील केरकचरा आणि शौचालयातील मलमूत्राचा वापर केला जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शंभर किलोवॉटचा प्रकल्प येथे लावण्यात आला आहे. यासाठी 121.5 टन कचऱ्याची रोज आवश्‍यकता आहे. याला चंद्रपूर नगरपालिका पूर्ण सहकार्य करीत आहे. रोज न चुकता शहरातील गोळा केलेला कचरा महाविद्यालयात आणून टाकला जात आहे. या कचऱ्यातून "वेस्ट' वेगळे करण्यासाठी मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा 25 लाख रुपयांचा प्रकल्प आहे. डॉ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू आहे. यावर स्वत: महाविद्यालयाचे प्राचार्य कीर्तिवर्धन दीक्षित लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणारे विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला महिन्याकाठी तीन लाख रुपये वीजबिल येते. आता हा आकडा कमी होईल, असे दीक्षित यांनी सांगितले. यासोबतच एकट्या वसतिगृहाचे वीजबिल 15 हजार रुपयांच्या घरात होते. आता ते शून्यावर आले आहे. विशेष असे की, काही वर्षांपासून या महाविद्यालयात अक्षय ऊर्जा पार्क सुरू करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत येथे सहा किलोवॉटचा सोलर प्रोजेक्‍ट उभा केला जाणार आहे.
दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

चंद्रपूर - जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेली जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळे आणि 13 तीर्थस्थळे अद्याप उपेक्षितच आहेत. याच्या विकासासाठी जवळपास दहा कोटींची आवश्‍यकता आहे; मात्र यातील 20 टक्केसुद्धा निधी खर्च झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळे विकसित झाली असती, तर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या.
जिल्हा नियोजन समितीने 2007 मध्ये जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळांच्या विकासाची योजना हाती घेतली. यात चंद्रपूर तालुक्‍यातील रामाळा तलाव, जुनोना तलाव, मूल तालुक्‍यातील सोमनाथ, भद्रावती शहरातील प्राचीन मंदिरासह डोंगरगाव (खडी), मोहुर्ली (ताडोबा), ब्रह्मपुरी तालुक्‍यातील घोडाझरी प्रकल्प, राजुरा तालुक्‍यातील माणिकगड किल्ला आणि चिमूर तालुक्‍यातील आसोला (मेंढा) सिंचन प्रकल्पाचा समावेश होता. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. त्यांपैकी एक कोटी 86 लाख रुपयांचा निधी आतापावेतो मिळाला आहे. विकासाच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. तेव्हापासून याकडे लक्ष देण्यात आले नाही. सोमनाथ येथे धबधबा आहे. तिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात; मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने आता पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. आसोलामेंढा येथेही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. माणिकगड किल्ल्याची तर वाईट अवस्था आहे. भग्नावस्थेतेतील किल्ला आता चोरांचे माहेरघर झाले आहे; मात्र नियोजन समितीने याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला. त्यानंतर त्यांनाही याचा विसर पडला.
याच बैठकीत तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 13 तीर्थस्थळांना मंजुरी दिली आहे. यात महाकालीमंदिर, वढा, रामदेगी, अड्याळ टेकडी, आळगाव येथील त्रिवेणी संगम, नागभीड येथील शिवमंदिर टेकडी, जोगापूर, मराई पाटण, कोंडय्या महाराज देवस्थान, सात बहिणी जंगल, चिमूर घोडायात्रा, बालाजी देवस्थान, तपोवन भूमी गोंदेडा याचा समावेश आहे. यातील बहुतांश तीर्थस्थळी दरवर्षी यात्रा भरते; मात्र पुरेशा सोयी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. गोंडपिंपरी तालुक्‍यातील धाबा येथील कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात तर आंध्रप्रदेशातील भाविक येतात. महाकाली यात्रेसाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे येतात. त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो.
या तीर्थस्थळांच्या विकासासाठी जवळपास चार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत केवळ 15 लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी सन 2007 मध्ये 14 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आजघडीला ही किंमत आणखी वाढली आहे. यासाठी मिळणारा निधी केंद्र पुरस्कृत योजनांवर आधारित असतो. त्यामुळे यासाठी पुरेसा निधी प्राप्त होऊ शकत नाही. राज्य शासनाने हा निधी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी चालना मिळेल, असे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत असतात; मात्र यासाठी प्रयत्न कोण करणार, याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही
दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

दहा कोटींसाठी नऊ पर्यटनस्थळे '"भकास'

चंद्रपूर - जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेली जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळे आणि 13 तीर्थस्थळे अद्याप उपेक्षितच आहेत. याच्या विकासासाठी जवळपास दहा कोटींची आवश्‍यकता आहे; मात्र यातील 20 टक्केसुद्धा निधी खर्च झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळे विकसित झाली असती, तर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असत्या.
जिल्हा नियोजन समितीने 2007 मध्ये जिल्ह्यातील नऊ पर्यटनस्थळांच्या विकासाची योजना हाती घेतली. यात चंद्रपूर तालुक्‍यातील रामाळा तलाव, जुनोना तलाव, मूल तालुक्‍यातील सोमनाथ, भद्रावती शहरातील प्राचीन मंदिरासह डोंगरगाव (खडी), मोहुर्ली (ताडोबा), ब्रह्मपुरी तालुक्‍यातील घोडाझरी प्रकल्प, राजुरा तालुक्‍यातील माणिकगड किल्ला आणि चिमूर तालुक्‍यातील आसोला (मेंढा) सिंचन प्रकल्पाचा समावेश होता. या स्थळांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. त्यांपैकी एक कोटी 86 लाख रुपयांचा निधी आतापावेतो मिळाला आहे. विकासाच्या नावावर थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. तेव्हापासून याकडे लक्ष देण्यात आले नाही. सोमनाथ येथे धबधबा आहे. तिथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात; मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने आता पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. आसोलामेंढा येथेही मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. माणिकगड किल्ल्याची तर वाईट अवस्था आहे. भग्नावस्थेतेतील किल्ला आता चोरांचे माहेरघर झाले आहे; मात्र नियोजन समितीने याच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार केला. त्यानंतर त्यांनाही याचा विसर पडला.
याच बैठकीत तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 13 तीर्थस्थळांना मंजुरी दिली आहे. यात महाकालीमंदिर, वढा, रामदेगी, अड्याळ टेकडी, आळगाव येथील त्रिवेणी संगम, नागभीड येथील शिवमंदिर टेकडी, जोगापूर, मराई पाटण, कोंडय्या महाराज देवस्थान, सात बहिणी जंगल, चिमूर घोडायात्रा, बालाजी देवस्थान, तपोवन भूमी गोंदेडा याचा समावेश आहे. यातील बहुतांश तीर्थस्थळी दरवर्षी यात्रा भरते; मात्र पुरेशा सोयी नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. गोंडपिंपरी तालुक्‍यातील धाबा येथील कोंडय्या महाराजांच्या देवस्थानात तर आंध्रप्रदेशातील भाविक येतात. महाकाली यात्रेसाठीही राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येथे येतात. त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो.
या तीर्थस्थळांच्या विकासासाठी जवळपास चार कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. आतापर्यंत केवळ 15 लाख रुपयेच प्राप्त झाले आहेत. पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी सन 2007 मध्ये 14 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आजघडीला ही किंमत आणखी वाढली आहे. यासाठी मिळणारा निधी केंद्र पुरस्कृत योजनांवर आधारित असतो. त्यामुळे यासाठी पुरेसा निधी प्राप्त होऊ शकत नाही. राज्य शासनाने हा निधी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी चालना मिळेल, असे प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सांगत असतात; मात्र यासाठी प्रयत्न कोण करणार, याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही